Monday, March 18, 2019

जेन ऑस्टीन वाचण्याच्या निमित्ताने...

आयुष्यात काही गोष्टी वेळच्या वेळी होण्याला थोडा अर्थ आहे. खरं तर या विधानात तसं काही महत्त्वाचं असं नाहीच. कुठल्याही गोष्टीची एकच एक वेळ असते आणि ती तेव्हाच व्हावी वगैरे ठोकताळे विनोदीच. पण जरा पोक्तपणा आणायचा प्रयत्न म्हणून असं काहीतरी म्हणायचं, इतकंच काय ते.

पुस्तकांच्या वाचनाच्या बाबत या गोष्टीला थोडा गंमतीशीर अर्थ आहे. बदलत्या वयानुसार बदलत जाणार्‍या आवडीनिवडी, त्या त्या वयात महत्त्वाच्या-बिनमहत्त्वाच्या वाटणार्‍या गोष्टींचं वाचन यांमधली गंमत आता त्रयस्थपणे बघता येते.

मराठी माध्यमाच्या शाळेत शिकलो त्यामुळे "अंतरिक्ष फिरलो, पण..." अजून मराठी पुस्तकांची गोडी टिकून आहे खरी. ("अंतरिक्ष फिरलो, पण" या शब्दांचा शब्दशः अर्थ - अर्थातच - घेऊ नये. ती एका काव्यपंक्ती आहे इतकंच :-) ) मराठी पुस्तकांचं वाचन जे शाळा कॉलेजच्या दिवसांपासून सुरू झालं त्यात काही खंड पडला नाही. सुनीताबाई देशपांडेंनी आपल्या पुस्तकाच्या अर्पणपत्रिकेत म्हण्टलं होतं की "कवितांना ... ज्यांनी आयुष्यभर साथ केली." आता कवितांबद्दलच्या प्रेमाबद्दल आणि त्यांच्या आकलनाबद्दल आमच्यासारखे लोक सुनीताबाईंच्या पासंगापाशी पोचणार नाहीत. पण मराठी पुस्तकांच्या बाबत मात्र "त्यांनी आपली आयुष्यभर साथ केली" इतपत म्हणता येईल.

त्यामुळे मराठीपुरता विचार करायचा तर पुस्तकं, लेखक कळत्या वयात भेटले. काहींशी मनातल्या मनात कायमची जवळीक झाली. काही उपरे राहिले. काही जण काही काळानंतर फार जवळचे वाटेना झाले. काही दुर्मिळ बनले. वय वाढलं तसतसे नवे भेटत गेले. एकंदर हा सगळा वाढता वसा. "हे सरता संपत नाही चांदणे तुझ्या स्मरणाचे" का काय म्हणतात ते. अजूनही मराठीतली कितीतरी महत्त्वाची, मोठी, मैलाचा दगड असलेली, वेगवेगळ्या संदर्भातली उत्तम पुस्तकं वाचून व्हायची आहेत पण ती कधीतरी होतील अशी अंधुक आशा आहे. हा रस्ता आपल्या परिचयाचा आहे, आपलाच आहे, त्यावर डोळे झाकूनही चालता येईल अशी काहीतरी भावना आहे.

इंग्रजी भाषेशी नातं कुतुहलाचं, आदराचं, (अभ्यासाच्या पुस्तकांच्या बाबत गरजेचं!), पण एकंदरीत काठावरचं. मायमराठीच्या नदीत मनसोक्त डुंबण्यासारखं म्हणता येणं कठीण. कारण कुठलंही इंग्रजी पुस्तक - मग ते कितीही रंजक, उद्बोधक, रसाळ, मती गुंगवणारं, थरारक, बुद्धीमान असं काहीही असलं तरी ते शेवटी उपरंच म्हणून हाती येतं. अगदी अजूनही. आता अगदीच डिक्शनरी हाती घ्यावी लागत नाही पण "वाट तरी सरळ कुठे, पांदीतील सारी" ही भावना काही समूळ नष्ट होत नाही. दुसरं म्हणजे इंग्रजी भाषेतलं चांगलंचुंगलं - अगदी प्रातिनिधिक स्वरूपाचं, नमुनेवजा तरी - सगळं कधीच वाचून होणार नाही याची शंभर टक्के खात्री आहे. गेली चार पाचशे वर्षं प्रचंड मोठ्या प्रमाणात लोकांनी केलेलं काम आणि मग देशीविदेशी हर प्रकारच्या भाषेच्या लेखकांच्या कामाची इंग्रजीमधे होत गेलेली भाषांतरं हे सर्व जमेस धरलं तर इंग्रजीमधे मामुली फेरफटकाही मारून होणार नाही हे आपल्यापुरतं ठरलेलं आहे. किमान या बाबत काही अवास्तव कल्पना उराशी नाहीत हेही नसे थोडके. हा विषय फार म्हणजे फारच मोठा आणि असल्या टीचभर टिपणात सामावणारा नाही.

हे सर्व सुचायला निमित्त झालं जेन ऑस्टीनच्या अलिकडे केलेल्या "प्राईड अँड प्रेजुडीस" या कादंबरीच्या वाचनाचं. कादंबरी वर्ल्ड क्लासिक्समधे गणलेली. कादंबरी प्रसिद्ध होऊन - इतकंच नाही तर जेन ऑस्टीनचं निधन होऊन - दोनशे वर्षं होऊन गेलेली आहेत. दोनशे वर्षांच्या या मोठ्या काळात ही कादंबरी सुरवातीला इंग्लिश समाजात आणि नंतर क्रमाक्रमाने युरोप, अमेरिका आणि मग जगाच्या अन्य भागांमधे कशी पसरली, सुरवातीला ती लोकप्रिय पण कलात्मकदृष्ट्या फारशी दखलपात्र कशी नव्हती, आणि मग इंग्रजी साहित्याच्या इतिहासातली मैलाचा दगड बनलेली कशी झाली हाही इतिहास मजेशीर आहे. शाळा कॉलेजांमधून ती शिकवली गेली आणि अजूनही ती "लावलेली" असतेच. १९४० च्या दशकापासून त्यावर सिनेमे आणि टीव्हीचं युग सुरू झाल्यावर सिरियल्स बनत आहेत. अगदी बॉलीवूडपर्यंत तिच्यावर सिनेमे बनवले जात आहेत. १९८० च्या दशकात दूरदर्शनवर "तृष्णा" नावाची सिरियल त्यावर येऊन गेलेली होती.

१९९५ साली बीबीसीने काढलेली ८ भागांची सिरियल म्हणजे या कादंबरीवरचं आजतागायत झालेलं सर्वोत्कृष्ट काम असं म्हणायला हरकत नाही. कॉलीन फर्थ याने रंगवलेल्या डार्सीने देशविदेशीच्या लाखो करोडो स्त्रियांचा कलिजा खलास झाला. कॉलिन फर्थ जो आंतरराष्ट्रीय पातळीवरचा सुपरस्टार बनला तो या एका घटनेने. या सिरियलमधल्या एलिझाबेथ रंगवलेल्या नटीचं कामही उत्तम होतं पण चांदी झाली ती "डार्सीची" :-)

"फॅन फिक्शन" आणि "नव्या आकलनांच्या" बाबतसुद्धा ही कादंबरी आघाडीवर आहे. खूनखराबा, (पी डी जेम्स या ख्यातनाम लेखिकेने या कादंबरीतल्या गावामधे एकामागोमाग खून होतात असं कथानक रचलं आहे!) माणसं खाणारे "झाँबीज्" अशा काय वाटेल त्या गोष्टी तिच्यावर रचल्या गेलेल्या आहेत. त्याहून अधिक निर्मितीच्या शक्यता बहुदा शेक्सपीयरच्या नाटकांनीच नोंदवल्या असतील.

तर अशी, कॉलेजच्या दिवसांमधे राहून गेलेली जगप्रसिद्ध कादंबरी. "बेटर लेट दॅन नेव्हर" म्हणून प्रौढत्वी वाचायला घेतली त्याबद्दलचे हे विचारतरंग. इतकंच या टिपणाचं स्वरूप.

दोनशे वर्षं झालेल्या कादंबरीचं कथानक नव्याने देणं ही एक फॉर्मॅलिटी आणि कथानक देत आहे असं डिस्क्लेमर देणं ही आणखी एक. ती करतो.

१७७५च्या आसपासचं इंग्लंडमधल्या जमीनधारी उच्च आर्थिक स्तरातलं वातावरण. जमिनीच्या भाड्यातून येणारं सर्वांचं उत्पन्न. कुणाला कामधंदे करायलाच हवेत असं काही नाही. या वर्गातलं कुणी काम करत असतानाचं चित्रण कादंबरीत बहुदा अभावानेच. अशाच प्रकारच्या कुटुंबांमधल्या बेनेट दंपतीच्या पाच मुली. वयात येत असलेल्या. त्यांच्या लग्नाची काळजी बेनेट्बाईंना आहे. बेनेटबुवा तसे काळजीग्रस्त नाहीत. (इथे 'पडोसन' सिनेमातल्या ओमप्रकाशच्या "बिंदूकी माँ, जब जब जो जो होना है, तब तब सो सो होता है" या वाक्याची आठवण येते :-) ) कादंबरीच्या सुरवातीला आलेलं वाक्यच कमालीचं लोकप्रिय आणि इंग्रजी भाषेतल्या सुप्रसिद्ध वचनांपैकी एक ठरलं : "It is a truth universally acknowledged, that a single man in possession of a good fortune, must be in want of a wife." जेन ऑस्टीनच्या अप्रतिम शैलीची आपल्याला इथेच चुणूक मिळते. तर या पाच बहिणींपैकी एलिझाबेथ बेनेट ही कादंबरीची नायिका. पाचही बहिणींमधली सर्वात बुद्धीमान, शहाणी, स्वतःचं असं व्यक्तिमत्त्व असलेली, स्वतःचा आब राखणारी, स्वाभिमानी, ठसठशीत, स्पष्ट मतं असलेली (आणि पटकन मतं बनवत असल्यामुळे चुकीचे निर्णय कधीकधी घेण्याच्या धोक्यात सापडणारी - पण स्वतःच्याच विवेकामुळे त्या धोक्यांमधून बाहेरही पडणारी.) कादंबरीचा नायक फिट्झविल्यम डार्सी. याच उमराव वर्गातला. गर्विष्ठ तिरसट वाटणारा, नक्कीच घुमेपणा करणारा, अबोल, मात्र कुठल्याही प्रकारच्या खोटेपणा, दिखाऊपणापासून दूर राहाणारा, कुठल्याही प्रकारच्या फसवाफसवीवजा वर्तनापासून दूर राहाणारा. क्वचित हसणारा, तत्कालीन समाजाचा स्थायीभाव असलेल्या नृत्य आदि गोष्टींपासून फटकून वागणारा - आणि म्हणूनच एलिझाबेथला ज्याच्याबद्दल गैरसमज उत्पन्न झालेला आहे असा. या समज-गैरसमजांची कोळिष्टकं दूर होतात आणि अंतिमतः नायक नायिकेचं मीलन होतं. मग या सव्यापसव्यात अर्थातच इतर बहिणी, डार्सीचा मित्र, त्याचं एका बेनेट बहिणीबरोबर जमलेलं सूत, इतर विनोदी किंवा खलत्वाकडे झुकणारी वाटतील अशी पात्रं. असा एकंदर हिशेब.

स्पॉयलर अलर्ट इथे संपला असं समजायला हरकत नाही.

कादंबरीच्या कथानकावरून, "या अशा कथा आपण यत्ता दहावीच्या आसपास वाचत होतो" हा विचार मनात आल्यावाचून राहात नाही. जेन ऑस्टीनची लिहिण्याची शैली अप्रतिम आहे हे मात्र खरंच. मी वर कादंबरीचं पहिलंच वाक्य दिलेलं आहे. जवळजवळ सगळी कादंबरी एलिझाबेथ बेनेटच्या दृष्टीकोनातून लिहिलेली आहे. बहुतांश घटना तिच्या उपस्थितीमधे घडतात. निवेदिका म्हणून लेखिकेची वर्णनं जिथे येतात ती एलिझाबेथने केलेली आहेत असं समजून मी बहुतांश कादंबरी वाचली. (हे माझं मत ठार चुकीचं असल्यास चूभूदेघे.)

"प्राईड अँड प्रेजुडीसचं भाषासौंदर्य" यावर गेल्या २०० वर्षांत किती रीसर्च पेपर झाले असतील देवास ठाऊक. अमीर उमरावांची भाषा म्हणून ती त्या समाजाचं वास्तव चित्रण करणारी - आणि म्हणून त्या अंगाने ग्रेसफुल - ती आहेच. पण आपल्या वर्गापुरतंच मर्यादित चित्रण करताना जेन ऑस्टीनचा उपरोध, विसंगती टिपण्याची क्षमता, ती विसंगती व्याजोक्तीने, आब राखून, मिष्कील पद्धतीने एखाद्या बुद्धीमान व्यक्तीने टिपावी याची उदाहरणं पहिल्यापासून शेवटाच्या पानापर्यंत दिसतात. संवाद रचण्याचं लेखिकेचं कौशल्य अजोड आहे. बटबटीतपणा, घिसाडघाई, अप्रस्तुत बोलणं, तोल ढळणं, या प्रकाराला जेन ऑस्टीनच्या लिखाणात स्थान नाही. एकंदर जेन ऑस्टीनचं जगच बर्‍यापैकी त्या उमरावी वर्गाने बंदिस्त केलेलं. त्या जगातल्या खलप्रवृत्तीच्या वाटणार्‍या व्यक्तींची वर्णनंसुद्धा खलत्वाशी अगदीच दूरान्वयाने संबंध असलेली. फारफार तर खोटं बोलणारी माणसं ती वाईट. याहून अधिक खलत्वाचं चित्रण नाही.

आणि एकंदरच तत्कालीन कादंबरीमधे नोकर येतात, जातात त्यांचं कुठेही अर्थपूर्ण असं दर्शन नाही. जणू ते अदृष्य आहेत. कुठेही हे उमराव आणि त्यांची पिलावळ आपल्या वर्गाच्या बाहेरच्या वर्गाबाहेरच्या कुणाशी साधं बोलतानाचं चित्रण मला आठवत नाही. आपल्याच वर्गात कोण उच्च आणि कोण खालचे याची सदोदित चर्चा करणार्‍यांची चित्रणं येत राहातात. अगदी एखादा माणूस जमीनधारी उमराव नसून व्यवसाय किंवा कामधंदा करून उपजीविका करणारा असला तर - अगदी तो कितीही सुखवस्तू असला तरी - उमरावी जिभा लगेच त्याबद्दल उपहासाने वळवळणार. (अर्थात असं करणार्‍यांबद्दल आत्यंतिक उपरोधाने लेखिका लिहिते. अशा प्रकारच्या pettinessचं विसंगतीयुक्त आणि मार्मिक चित्रण ही जेन ऑस्टीनची सर्वात अधिक परिणामकारक , शक्तीमान बाजू.) कादंबरीतले जे काही संघर्ष, ताणेबाणे आहेत ते लग्नं जुळवण्यापुरते. कुठल्या व्यक्तीचे कुणाबद्दल काय समज गैरसमज झालेले असतील त्याचे. "आधी तो मला असा वाटला पण आता असा वाटतोय" अशा प्रकारची रेलचेल असलेली वर्णनं. या दृष्टीने, २०व्या शतकाच्या सुरवातीला गडकरी वगैरे लोकांनी लिहिलेल्या "सामाजिक आशयाच्या" मराठी नाटकांमधल्या नायकांची नायिका मिळवण्याकरताची धडपड असलेली कथानकं आठवतात. मात्र, गडकर्‍यांसारख्यांचा sense of Evil बर्‍यापैकी ठाशीव आणि एकंदर कथानकाला गडद रंग देणारा होता. जेन ऑस्टीनमधे म्हणजे गडद छटा जवळजवळ नाहीच! इथे एकमेकांना दुखवण्यातून फारफार तर नशीबात काय येतं ते हिरमुसलेपण. जगण्यामरण्याचा संघर्ष - किमान या कादंबरीत - विशेष असा काही नाही. post-colonial ,फेमिनिस्ट लोकांनी ऑस्टीनच्या कायकाय चिंधड्या उडवल्या असतील त्या कधीकाळी वाचायला मजा येईल. :-)

( त्याकाळी - म्हणजे अगदी २०० वर्षांपूर्वी - स्त्री पुरुषांमधे मैत्री होणं, एकमेकांशी उघडउघड गप्पा मारू शकणं, तरुण तरुणींनी नृत्यात एकमेकांचा हात मागणं, सतत पार्ट्या करणं, प्रत्यहि एकमेकांबरोबर नृत्यं करणं - हे सर्व वाचताना , आमच्या काळी मुलामुलींच्या साध्या बोलण्यावर बंदी किंवा किमान भ्रूकुटीभंगाचा धोका असल्याच्या आठवणी येऊन, तत्कालीन डार्सी आणि इतर नायकांबद्दल तीव्र मत्सर दाटला होता हे येथे प्रामाणिकपणें नमूद करणं आवश्यक आहे :-) )

Every artist or author is a product of their times. जेन ऑस्टीन त्याला अपवाद नाही. २०० वर्षांनंतर, आख्खं विसावं शतक उलटून गेल्यावर, त्या शतकामधे ब्रिटीश साम्राज्यच नव्हे तर अखिल जगाचा निरागसपणाच लयाला गेल्यासारखा झाल्यानंतर जेन ऑस्टीन वाचणं यामागे एक गमतीशीर विसंगती आहे. मात्र जेन ऑस्टीनच्याच ग्रेसफुल नजरेने आपण या - अगदी ढळढळीत असलेल्या - विसंगतीकडे दोन घटका पाहू शकतो. त्या विसंगतीला काही काळ बाजूला ठेवून एका बुद्धीमान, शैलीदार, आपल्या समाजावर आसूड न ओढणार्‍या परंतु मिष्किल नजरेने त्यावर टिप्पणी करणार्‍या, विवेकी पण तीव्र संवेदनशीलतेच्या, जेन ऑस्टीनची जणू Alter ego असलेल्या, एलिझाबेथ बेनेटच्या जगाचा एक भाग बनू शकतो. डार्सी आणि एलिझाबेथच्या नाजूक पण एकमेकांच्या हृदयीच्या तारांशी एकमेकांनी चालवलेल्या खेळामधे घटकाभर तल्लीन होऊन राहू शकतो. तशा तर अनेकानेक पलायनवादी गोष्टी आपण ऐकतो-वाचतो-पाहतो- करतो. ऑस्टीनच्या तात्कालिक सामाजिक संदर्भांनी बांधल्या गेलेल्या, त्या काळाचा अपरिहार्य भाग असलेल्या या कादंबरीला मी escapist reading म्हणणार नाही. भाषिक सौंदर्याचा नमुना म्हणून ऑस्टीन अजोड आहे. उत्तम कशीदाकाम केलेल्या एखाद्या भरजरी उंची वस्त्राला स्पर्श करावा, घटकाभर ते ल्यावं अशा धर्तीचा हा अनुभव आहे.

Thursday, March 7, 2019

कहाणी स्त्रीपुरुष समानतेची

ऐका स्त्रीपुरुष समानते तुमची कहाणी.

आटपाट नगर होतं. त्या नगरांत एक ब्राह्मण होता. तो नित्य लाईक, कमेंटी, वावाचान आणायला सोशल मिडियावर जात असे. तिथं नागकन्या देवकन्या वसा वसत होत्या. ब्राह्मणानं विचारलं,”काय ग बायांनों, कसला वसा वसतां? तो मला सांगा.” ” तुला रे वसा कशाला हवा? उतशील, मातशील, घेतला वसा टाकून देशील.” ब्राह्मण म्हणाला, “उतत नाहीं, मातत नाहीं, घेतला वसा टाकीत नाहीं.” तेव्हां त्या म्हणाल्या, “८ मार्च येईल, तेव्हां पहिल्या आदितवारीं मौन्यानं (मुकाट्यानं) उठावं, सचीळ (वस्त्रासहित) स्नान करावं, अग्रोदक पाणी आणावं. विड्याच्या पानावर रक्तचंदनाची सिमॉन दी बुव्हा काढावी. सहा रेघांचं मंडळ करावं, सहा सुतांचा तातू करावा. त्याला सहा गांठी द्याव्या. पानफूल वहावं, पूजा करावी. कल्चरल फेमिनिझमचा विडा, मार्क्सिस्ट फेमिनिझमच्या फुलांचा झेला, रॅडिकम फेमिनिझमचा धूप, लिबरल फेमिनिझमचा नैवेद्य दाखवावा, सहा मास चाळावी, सहा मास पाळावी, माघी रथसप्तमीं संपूर्ण करावं. संपूर्णाला काय करावं? इको फेमिनिझमच्या पोळ्या, ब्लॅक फेमिनिझमच्या बोटव्यांची खीर, इंडिव्हिज्युअल फेमिनिझमच्या लोणकडं तूप, मेहूण जेवूं सांगावं. असेल तर चिरचोळी द्यावी, नसेल तर जोडगळसरी द्यावी, ती नसेल तर दोन पैसे दक्षणा द्यावी आणि आपल्या वशाचं उद्यापन करावं.” असा वसा ब्राह्मणानं केला. त्याला स्त्रीपुरुष समानता प्रसन्न झाली.

ताराबाई शिंदे स्वप्नांत आली. तेव्हां राजाच्या राणीनें ब्राह्मणाला बोलावूं धाडलं, ब्राह्मण जाते वेळेस भिऊं लागला. कांपूं लागला. तेव्हां राजाच्या राणीनं सांगितलं, ” भिऊं नका, कांपू नका, तुमच्या मुली आमचे येथें द्या” “आमच्या मुली गरीबाच्या, तुमच्या घरीं कशा द्याव्या? मिसॉजिनी कराल, शोव्हेनिशम कराल, दासी बनवाल , बटकी बनवाल.” राणी म्हणाली, ” मिसॉजिनी करीत नाहीं, शोव्हेनिशम करीत नाहीं. ब्रा बर्निंग करू. स्लटवॉक करू. मुलगी झाली हो करू. ”

मार्गेश्वराचा महिना आला. ब्राह्मणानं फेमिनिष्ठांना मुली दिल्या, एक राजाचे घरीं दिली. दुसरी प्रधानाचे घरीं दिली. गेल्या पावलीं मुलींचा समाचार घेतला नाहीं. बारा वर्षांनीं समाचारास ब्राह्मण निघाला. राजाच्या घरी गेला. लेंकीनं बसायला पाट दिला, पाय धुवायला पाणी दिलं. “ बाबा बाबा, गूळ खा पाणी प्या.” गूळ खात नाहीं, पाणी पीत नाहीं. माझी कहाणी करायची आहे ती तूं ऐक.” तुझी कहाणी ऐकायला मला वेळ नाहीं. राजा अपर्णा तीर्थंकरांकडे जाणार आहे. त्याला जेवायला उशीर होईल. तोच त्याचे मनांत राग आला. तेथून निघाला प्रधानाच्या घरीं गेला. तिनं पाहिलं, आपला बाप आला. म्हणून बसायला पाट दिला; पाय धुवायला पाणी दिलं. “बाबा, बाबा, गूळ खा, पाणी प्या.” ” गूळ खात नाहीं पाणी पित नाहीं, माझी कहाणी करायची आहे, ती तूं अगोदर ऐक. ” तुझी कहाणी नको ऐकूं तर कोणाची ऐकूं?” घरांत गेली, उतरडींची सहा मोत्यें आणलीं. तीन आपण घेतलीं. तीन बापाच्या हातांत दिलीं. त्याने मनोभावें सेकंड सेक्स वाचली लेकीनं चित्तभावें ती ऐकली. नंतर जेवून खाऊन बाप आपल्या घरीं आला. बायकोनं विचारलं, ” मुलींचा समाचार कसा आहे?” जिनं कहाणी ऐकलीं नाहीं, ती राखी सावंत बनली. धिनचाक पूजा बनली. बुरसटलेपणानं व्यापली. जिनं कहाणी ऐकली होती, ती भाग्याने जगते आहे. विदा वाचून वाचून बेभान होते आहे. ज्योती म्हापसेकर झाली आहे. प्रमिला दंडवते झाली आहे. मृणाल गोरे झाली आहे. ”

इकडे राखी सावंत जी झाली होती, तिनं आपल्या लेकीला सांगितले. “मावशी घनघोर नांदत आहे, तिकडे जाऊन कांहीं दिलं तर घेऊन ये.” पहिल्या आदितवारीं पहिली मुलगी उठली, तळ्याच्या पाळीं जाऊन उभा राहिली.” अग अग दासींनों, तुम्ही दासी कोणाच्या?” ” आम्ही दासी प्रधानाच्या. प्रधानाच्या राणीला जाऊन सांगा, तुमच्या बहिणीची मुलगी आला आहे.” “कशी आली आहे? तळ्याच्या पाळीला उभी राहिली आहे.” ‘परसदारनं घेऊन या.’ परसदारानं घेऊन आल्या. न्हाऊं माखूं घातलं, साडीचोळी नेसवली, जेवू खाऊं घातलं. कोहोळा पोखरला, होनमोहोरा भरल्या. “वाटेस आपली जाऊं लागली. तों बेटी फ्रीडमन परीक्षा घेण्याकरता आली. हातींचा कोहोळा काढून नेला. घरीं गेली. आईनं विचारलं, ” काय रे बाबा, मावशीनं काय दिलं?” दैवें दिलं, कर्मानं नेलं. कर्माचं फळ पुढं उभं राहिलं. मावशीनं दिलं होतं. पण सर्व गेलं.

पुढं दुसर्‍या आदितवारीं दुसरा मुलगा गेला. तळ्याच्या पाळीं जाऊन उभा राहिला. “अग अग दासींनो, तुम्ही दासी कोणाच्या?” “आम्ही दासी प्रधानाच्या.” प्रधानाच्या राणीला निरोप सांगा. त्यांनी सांगितला. मग प्रधानाच्या राणीनं त्याला घरीं नेऊन न्हाऊं माखूं घातलं पीतांबर नेसायला दिला, जेवूं खाऊं घातलं. काठी पोखरून होनामोहोरांनीं भरून दिली. ” बाबा, ठेवूं नको. विसरूं नको. जतन करून घरीं घेऊन जा, ” म्हणून सांगितलं. वाटेंत सावित्रीबाई फुले परीक्षा घेण्याकरता आली, हातची काठी काढून घेतली. घरीं गेला, झालेली गोष्ट राणीला सांगितली. “दैवें दिलं, तें सर्व कर्मानं नेलं.”

पुढं तिसरे आदितवारीं तिसरा मुलगा गेला, तळ्याच्या पाळीं उभा राहिला. त्यालाही पहिल्यासरखं प्रधानाचे घरीं नेऊन न्हाऊं माखूं घातलं, पीतांबर नेसायला दिला, जेवूं खाऊं घातलं, नारळ पोखरून होनमोहोरांनीं भरून दिला. ” ठेवू नको, विसरूं नको.” म्हणून सांगितलं, घरीं जाताना विहिरींत उतरला. तों नारळ गडबडून विहिरींत पडला. घरीं गेला. आईनं विचारलं. ” काय रे बाबा, मावशीनं काय दिलं?” आई ग, मावशीनं दिलं, पण दैवानं तें सर्व बुडालं.”

चवच्या आदितवारी चवथा मुलगा गेला. तळ्याच्या पाळीं उभा राहिला. त्यालाही प्रधानाच्या राणीनं घरीं नेऊन न्हाऊं माखूं घातलं, पीतांबर नेसायला दिला. जेवूं खाऊं घातलं. त्याला दह्याची शिदोरी होनामोहोरा घालून बरोबर दिली. वाटेल माया अँजेलो परीक्षा घेण्याकरता आली. हातची शिदोरी घेऊन गेला. घरीं गेला. आईनं विचारलं, “काय रे बाबा, मावशीनं काय दिलं?” “आई मावसशीनं दिलं, पण दैवानं तें सर्व नेलं.”

पांचव्या आदितवारीं आपण उठली, तळ्याच्या पाळीं उभी राहिली. दासींनीं तिचा निरोप तिच्या बहिणीला सांगितला. बहिणीनं तिलाही परसदारानं घरीं नेलं. न्हाऊं घात्लं. माखूं घातलं, पाटाच बेसायला दिला. प्रधानाची राणी स्त्रीपुरुष समानतेची कहाणीकरूं लागली. ” काय वसा करतेस तो मला सांग.” बहीण म्हणाली, “अग अग चांडाळणी, पापिणी, बापाची कहाणी ऐकली नाहींस, म्हणून तुला दरिद्र आलं.” राजाच्या राणीनं विचारलं, “याला बहिणीच्या घरीं राहिली. ८ मार्च आला. सांगितल्याप्रमाणं स्त्री पुरुष समानतेची पूजा केली. इकडे राजाला भाग्य आलं. राजानं बोलावूं धाडलं. “मावशी मावशी, तुला छत्रं आलीं, चामरं आलीं, ग्लास सीलिंग फुटलं. इक्वल पे आला. स्त्रियांचं सर्व शिक्षण मोफत झालं. गर्भजल परीक्षा थांबली. स्त्रीभ्रूणहत्या थांबली. बालविवाह थांबले. रेप कल्चर गेलं. हुंडाबंदी आली. ” “मला रे पापिणीला छत्रं कोठली? चामरं कोठलीं? पाईक कोठले? परवर कोठे?” बाहेर जाऊन दाराशीं बघतात, तो राजा बोलावूं आला आहे. राजा आला तशी घरीं जायला निघाली. एकमेकींना बहिणीबहिणींनीं अहेर केले. वाटेनं जाऊं लागलीं.

दोहो बहिणींना आणि बाकी कित्येकींना कोणा डोळा मांसाचा गोळा, इतक्यांना जशी स्त्रीपुरुष समानता प्रसन्न झाली , तशी तुम्हां आम्हां होवों. ही साठां उत्तराची कहाणी, पांचां उत्तरीं सुफळ संपूर्ण.