Thursday, May 24, 2007

आठ वर्षांनी ...

महाराष्ट्राचे अत्यंत लाडके लेखक पु . ल. देशपांडे यांना जाऊन येत्या जून मध्ये सात वर्षें होतील.
गेल्या सात वर्षांत त्यांच्या स्मरणार्थ , त्यांच्या एकूण कारकीर्दीचा मागोवा , आढावा घेणारी , त्यांचा आठवणींना उजाळा देणारी , त्यांच्या अप्रकाशित लेखनाची अनेक पुस्तके आली आणि ही सर्व पुस्तके उत्तम खपली. पु. लं. ची कितीतरी जुनी पुस्तके , गाणी , नाटके या गेल्या सात वर्षांत अगदी चांगली खपली ; आणि हा ट्रेंड थांबण्याची चिन्हे नाहीत.

पु. लं. ची हिमालय-सदृष्य सावली गेल्या शतकाच्या शेवटच्या चार -पाच दशकांवर पडली. त्यांच्या प्रतिभेचा सूर्य उणीपुरी पन्नास वर्षे ते हयात असतानाच तळपत होता. हा सगळा इतिहास सर्वज्ञात आहे.
आज सात वर्षांनी , ही सावली दूर गेल्यानंतर , त्यांच्या मृत्यूनंतर आलेल्या त्यांच्या प्रेमाच्या पुराची लाट किंचितशी ओसरल्यासारखी झाल्यानंतर त्यांच्या आपल्या आताच्या आयुष्याशी राहिलेल्या नात्याबद्दल आपल्याला काहीशा समतोलपणे बोलता येईल असे वाटते. त्यांच्याबद्दलचा "रेव्हरंस" लोपलेला नाही ; परंतु त्यांच्या "रिलेव्हन्स" बद्दल बोलावे इतपत काळ उलटला आहेसे वाटते.

त्यांच्या लिखाणाकडे मागे वळून पहाताना, काही प्रश्नांचा धांडोळा घ्यावासा वाटतो ...आपल्या सध्याच्या जगण्याच्या संदर्भात पु. ल. कुठे उभे आहेत? त्यांच्या लिखाणातील काय काय अजूनही आवडते ? काय काय मार्मिक वाटते ? "ओल्ड रेलीक" वाटावा असा कुठला भाग वाटतो ? एकंदर जगण्याबद्दलचे त्यांचे कुठले विचार चिरकाल टिकून आहेत असे वाटते ?

माझ्या प्रश्नांची दिशा थोडीशी तुमच्या आमच्या जगण्याशी संबंधित आहे. पु. लं. च्या लिखाणातून जगण्याची काही एक पद्धती, काही मूल्ये , यांचे दर्शन घडते. त्यांनी या तत्त्वांचा म्हणा , मूल्यांचा म्हणा , वेगळा असा उद्घोष कधी केला नाही. पण "तुझे आहे तुजपाशी" सारख्या कृतींतून उघडउघड तर अन्य ललित लिखाणांतून प्रच्छन्नपणे त्यांच्या जगण्यबद्दलच्या दृष्टिकोनाचे दर्शन घडले आहे.

मराठी मनावर या वृत्तीचा नक्कीच प्रभाव पडत आला आहे. गेल्या काही पिढ्या याची साक्ष देतील. बदलत्या काळात, पु. लं. च्या पश्चात, त्यांनी स्वीकारलेली कुठली मूल्ये टिकतील ? पु. ल. कितपत "रेलेव्हंट" वाटतील ? आणि जर का त्यांचा ठसा पुसट होत असेल तर , त्यांनी स्वीकारलेल्या जगण्याबद्दलच्या दृष्टिकोनातील कुठला भाग कालातीत होता काय ?

पुलंच्या लिखाणातील काही गोष्टींचा या निमित्ताने परामर्श घ्यावासा वाटतो.

स्मरणरंजन : इंग्रजीत ज्याला नॉस्टाल्जिया म्हणतात त्याचे दर्शन पुलंच्या जवळजवळ प्रत्येक लिखाणात दिसेल. त्यांच्या लेखक म्हणून ऐन बहरात असण्याच्या कालात या मुद्द्याचे अपील खूप मोठे होतेच ; पण ऐंशी-नव्वदीच्या दशकात जेव्हा पुलंनी जवळजवळ लेखनाच्या मुख्य प्रवाहापासून संन्यास घेतला होता, त्या काळातील पिढ्यांवर सुद्धा , या स्मरणरंजनाचा प्रभाव कमी नव्हता. बालगंधर्व, पुलंचे आजोबा, अगदी बोरकरसुद्धा ..... या साऱ्यांना कधीही न पाहिलेली मंडळी त्याना पहात होती पुलंच्या चष्म्यातून. वसंतराव देशपांडे , केसरबाई केरकर यांसारख्यांना या पिढीतील लोकांनी ओझरते पाहिले असेलही ; पण ते त्यांच्या उतारवयात , कारकीर्द आटोपताना. पण त्यांची व्यक्तिचित्रे अगदी अलिकडील पिढ्यांमढ्ये लोकप्रिय होती.
पुलंच्या अस्तानंतर या स्मरणरंजनाची जादू लोप पावत असल्यासारखी का वाटत असेल? माझ्या मते, त्याचे एक उत्तर असे असेल की, पुलंच्या अस्तानंतर जवळजवळ लगेच, त्यांना पाहिलेल्यांची, त्यांच्याबरोबर काम केलेल्यांची , त्यांचे कर्तृत्त्व घडताना ते अनुभवणाऱ्यांची पिढीच काळाच्या पडद्याआड गेली. हे संक्रमण जास्त जाणवले ते पुलंच्या एक्झिटमुळे. याचा अर्थ या पिढीतील सर्वच्या सर्व माणसे इतक्या थोड्या कालावधीत देवाघरी गेली, असा कुणी शब्दशः अर्थ काढू नये. पण ही पिढी जीवनाच्या क्रीडांगणातून निवृत्त होत गेली आणि पुलंच्या लिखाणातील स्मरणरंजनाच्या एका मोठ्या भागाचे संदर्भ विरल्यासारखे झाले असे मला वाटते.

भाषेची एकूण सांस्कृतिक संदर्भातील स्थिती, तिचे वाङ्मयव्यवहारातील आणि मुख्य म्हणजे एकूण सामाजिक, राजकीय व्यवहारातील स्थान हे सर्व प्रश्न गुंतागुंतीचेच. मराठी सारस्वतात आता जे काही थोडे लोक राहिले आहेत त्यांच्यामधे हा विषय सर्वात महत्त्वाचा आहे यात शंका नाही. पण केवळ एका अत्यंत लोकप्रिय दिवंगत लेखकाबद्दलच नव्हे , तर त्या लेखकाने आपल्या लिखाणातून वर्णन केलेल्या जीवनसरणीबद्दल , जगण्याच्या एका भूमिकेबद्दल हा विचार चाललेला आहे.

अलिकडेच मला काही लोकांशी संवाद करताना असे दिसले की,"असामी असा मी" , "बटाट्याची चाळ" यांसारखे ललित लिखाण काही लोकाना संदर्भहीन वाटते. मला व्यक्तिश: तसे वाटत नाही हा भाग अलाहिदा. (किंबहुना, बटाट्याची चाळ मला पुलंची एक स्वतंत्र कलाकृती, जिचे मराठी साहित्यातील स्थान चिरकाल टिकून राहील असे वाटते.) परंतु, हे असे वाटणे या गोष्टीचे निदर्शक आहे की, पुलंचा रिलेव्हन्स तपासणे हे नक्कीच अभ्यसनीय ठरते.

काग़झी है पैरहन....

"घटना घडतात.पुरातल्या ओंडक्यासारखी माणसं त्यात वाहून जातात.घडायचं ते घडून जातं..पण तरीही पर्याय असतातच ठाकलेले. तडफडण्याचे.. हसण्याचे.. रडण्याचे.. हरण्याचे..जिंकण्याचे..क्षमेचे... सूडाचे... स्वीकृतीचे... तुकण्याचे... साक्षित्वाचे.त्यातला एकच निवडता येणार असतो, आणि निवडावा तर लागणारच असतो !पर्यवसान ठाऊक नसताना अंधारात घ्यावी लागणारी उडी...माणसाच्या आयुष्यात नियत आहे ते हे.यालाच आपण स्वातंत्र्य म्हणतो !"
वरील उतारा आहे मराठी कथालेखिका मेघना पेठे यांच्या एका कथेतील. नव्वदीच्या दशकात पेठे यांच्या कथा प्रकाशित व्हायला सुरुवात झाली. दोन कथासंग्रह आणि एका कादंबरीनंतर "मराठीतील अग्रगण्य लेखिका" म्हणून त्या आता गणल्या जाऊ लागल्या आहेत. माणसामाणसांमधील संबंधांची , नात्यांची चित्रणें , त्या नातेसंबंधांतील निरर्थकतेची (किंवा अतार्किक , गूढ वाटेल अशा अर्थांची) दर्शने, आणि या साऱ्यातून आपल्या समग्र अस्तित्वाकडे पहाण्याची काव्यात्म, चिंतनगर्भ संवेदनशीलता हा जणू प्रत्येक हाडाच्या, सच्च्या लेखकाचा स्थायिभाव असतो. पेठे यांच्या लिखाणाला या सर्वांवर नक्की दावा सांगता येईल.

कसे आहे हे लेखिकेच्या कथांमधील जग? बहुतांश कथा आजच्या मुंबईच्या पार्श्वभूमीवर घडतात. पेठे यांना अतिशय परिचयाचा हा शहरी भाग त्यांच्या कथेचा एक अविभाज्य भाग आहे. हे शहर,त्याचे युध्यमान दैनंदिन आयुष्य, त्याचा बिनचेहेऱ्याचा, गिळंकृत करणारा निर्मम बकालपणा हा या कथेतील बोधस्वर आहे. कधीकधी तर कथांचे हे पर्यावरण जणू एक पात्र बनून येते : कथेचे ते पर्यावरण नसते; तर त्या पर्यावरणातच ती कथा घडते. आशयामध्ये वातावरणाला बेमालूम मिसळण्याच्या लेखिकेच्या कौशल्याची तुलना जी. ए. कुलकर्णींशी करायचा मोह इथे होतो...

कुणाकुणाच्या कहाण्या लेखिका सांगते? औरंगाबादेतून आलेला, प्रायोगिक नाटकांमधील एक हाडाचा, हिऱ्यासारखी गुणवत्ता असलेला "स्ट्रगलर" , ज्याने या वेडापोटी, या मृगजळापाठी आयुष्य पणाला लावलेले आहे...त्याचे वेड , त्याची मजबूरी...या निर्दय शहराने त्याची केलेली धूळधाण; त्याची कहाणी. या शहराच्या बकालपणात रोजचा झगडा करणाऱ्या, संसाराच्या ओढगस्तीत पिचून गेलेल्या, मोलकरणीचे काम करणाऱ्या मंजुळाबाई - या रखरखाटात , एका सड्या , फ्लॅटमधील तरुणाशी घडलेला संग, त्या संगातही कळत-नकळत त्यांनी दिलेले वात्सल्याचे दान - त्या दानाची कहाणी. लग्नाचे वय उलटून गेलेल्या , शारीर सुखाच्या अनुभवानंतर , आशा-निराशेचा पूल ओलांडून झाल्यावर आपल्या साथीदाराच्या निवडीकडे शहाणपणाने बघणाऱ्या पस्तीशीच्या मुलीला आलेल्या शहाणपणाची कहाणी. आणि अशा कितीतरी.

आणि ही दर्शने घडविताना मग अनेक संकेतांचे बांध त्यांच्या लिखाणात मोडलेले दिसून येतात. पण "स्त्री-पुरुषांच्या लैंगिक संबंधांचे धीट चित्रण करणारी लेखिका" किंवा "स्त्रीवादी लेखिका" हे सर्व शिक्के त्यांच्याबाबतीत अपुरे, एकांगी आणि म्हणूनच अन्यायकारक आहेत. मायक्रोस्कोपखाली दिसणाऱ्या जंतुंकडे पहाताना ज्याप्रमाणे एखाद्या शास्त्रज्ञाकडे एक वस्तुनिष्ठ दृष्टिकोन असतो, त्याचप्रमाणे आयुष्याच्या सोसाट्याकडे, महापूरामध्ये साचून आलेल्या लव्हाळ्यांकडे पहाण्याचा लेखिकेचा दृष्टिकोन आहे. त्या दर्शनामध्ये ना फाजील गळेकाढूपणा , ना शारीर वासनांना कुरवाळणे. निसर्गाच्या न-नैतिकतेइतकेइतकीच लेखिकेच्या आविष्काराची न-नैतिकता. इथे इमान दिसते ते केवळ संकेतांना चिरत जाणाऱ्या सत्यान्वेषणाला.
सत्याच्या शोधाची , त्याच्या दर्शनाची बंदिश घडते प्रतिमा-प्रतिकांनी, काव्यात्म संदर्भांनी. या लिखाणात ठायीठायी दिसणाऱ्या मराठी , इंग्रजी , उर्दू काव्याचे संदर्भ लिहिणाऱ्याच्या रसिकतेची खात्री देतात; सगळ्या आशयाला संपन्नता देतात. म्हणूनच , या लिखाणाला सलाम करताना गालिबच्या दोन ओळींनी समारोप करणे योग्य होईल : "नक्श फरीयादी है किसकी शोखी-ए-तेहेरीर का काग़झी है पैरहन हर पैकरे तस्वीर का"
(आपला जन्म हेच जणू गाऱ्हाणे आहे. हे गाऱ्हाणे घेऊन जन्माला आलेले आपण सगळे कुणाच्या (परमेश्वराच्या ? नियतीच्या?) हातची खेळणी आहोत ? शेवटी काय , सगळ्या चित्रांना रूप घ्यावे लागते कागदी कपट्यांचेच !)

Monday, May 14, 2007

शाश्वताचें प्रकाश-संश्लेषण : सूर्य पाहिलेला माणूस

कलेच्या व्यवहारात बहुशः समाजपुरुषाच्या रंजनाचे ब्रीद घेतलेल्या शिलेदारांची चलती असणे याचे, मला वाटते सर्वात मोठे प्रमाण अलिकडील मराठी रंगभूमीच्या स्थितीमध्ये सापडावे. तेंडुलकर , एलकुंचवार यांनी मांडलेले प्रश्न खरोखरच खूप मोठे होते. नाटकाच्या माध्यमातून, सामाजिक , राजकीय संदर्भातील जळजळीत प्रश्नांची धगधगती चित्रे आणि त्या संदर्भांच्या पलीकडची , माणसांबद्दलची , माणसांच्या समूहांची तिसऱ्या डोळ्याने पाहिल्यासारखी दर्शने त्यानी घडवली. खानोलकरांसारख्या विचक्षण कलावंताने "आपुले मरण... " सारख्या रौद्र नाट्यातून माणसाच्या एका आदिम सत्याचा वेध घेतला...
"ते हि नो दिवसाः गताः" च्या या घडीला या अस्सल बावनकशी परम्परेशी नाते सांगणारे काही अलिकडेच पहायला मिळाले. अनेक वर्षानी हे जे नवल वर्तले, त्याबद्दल मजसारख्या लघुत्तम सामान्य वाचकाला जे जाणवले, ते जमेल तसे विशद करावे, म्हणून ही लेखनकामाठी.
मकरंद साठे यांच्या "सूर्य पाहिलेला माणूस" या नाटकाचा नाट्यपट पाहायचा योग अलिकडे आला. ग्रीक तत्ववेत्ता सॉक्रेटीस याची जीवनमूल्ये आणि त्या मूल्यांकरता त्याने स्वीकारलेले वीरमरण या सूत्रावर बेतलेल्या या नाटकाला अनेक पदर आहेत.
नाटक सुरु होते ते ३ व्यक्तींच्या, काहीशा खमंग अशा संभाषणाने. या ३ व्यक्तीना , त्यांच्या संभाषणाला, कुठल्याही काळाचे , ठिकाणाचे संदर्भ नाहीत. त्यांच्या वरकरणी खटकेबाज अशा संवादांतून 'दिसायला' लागतात त्या, ते represent करणाऱ्या प्रवृत्ती.. कुणी सिनिकल , तर कुणी भाबडा.. कुणी बेरकी , तर कुणी सरळ धारेचा.. कुणी विदुषकी व्यंगातून आयुष्याची वैयर्थता प्रकट करणारा , तर कुणी आपली बाजू हिरीरीने मांडणारा... आणि 'आपली बाजू' म्हणजे तरी कसली बाजू ? त्याला राजकीय , सामजिक असा कुठलाच संदर्भ नाही.. मात्र या प्रवेशातून , 'आंधळे आणि हत्ती' यांचे रूपक ठसविले जाते. आणि साऱ्या ज्ञानशाखा ज्या प्रश्नांकडे वळतात , त्या प्रश्नांच्या समेवर हा प्रवेश येतो.. हे प्रश्न कुठले ? तर 'हे सारे काय आहे ?' , 'या साऱ्याचा अर्थ तरी काय ?' , 'सत्य म्हणजे काय ?' 'सत्याचे आणि आपले नाते काय ?' हे आणि असे प्रश्न.
आणि 'सत्या'बद्दलच्या , या मूलभूत प्रश्नोपनिषदाला , अगदी अलगद अशी,एका प्रखर अशा प्रकाश-स्त्रोताची रूपकात्मकता नकळत मिळून जाते; आणि मग जाणवते: या साऱ्या 'बोलणाऱ्या माणसाना' संदर्भ आहे,तो प्लेटोच्या dialogues मधील चिरंतन गुहांचा , त्यातील आदिम अंधारात चाचपडणाऱ्या , प्रकाशरूपी सत्याच्या शोधाचा.
'सत्य म्हणजे काय ? त्याचे आपले नाते काय ? सत्यासारखी दाहक , अति-प्रखर गोष्ट कुणाला पेलवली आहे काय ?' अशा मालिकेतून , गोष्ट सुरू होते ती सत्यापासून न चळलेल्या , 'सूर्य पाहिलेल्या माणसाची' , सॉक्रेटिसची.
तत्कालीन ग्रीक संस्कृतिचा इतिहास हा अति-मर्यादित लोकशाही आणि दडपणारी राजसत्ता यांच्या रस्सीखेचेचा इतिहास आहे. अतिशय मर्यादित अशा वैचारिक स्वातंत्र्याच्या या कालखंडात सॉक्रेटिस मात्र, अथेन्स मधील तरुणाना सतत आपल्या तत्त्वशोध पद्धतीने, सत्याचा मागोवा घेण्यास उद्युक्त करीत होता. विद्यार्थी, मित्र, आणि अमीर-उमरावांच्या वर्गातील अनेक तरुण त्याच्या विचारानी प्रभावित होत होते. प्लेटोने ग्रंथित केलेल्या या सर्व संवादांमधून, 'श्रेयसा'च्या शोधाचे , ते प्राप्त करण्यासाठीच्या वाद-विवाद प्रधान अशा मंथनाचे दर्शन घडते.प्रत्येक गोष्टीला तार्किक , अति-कठोर अशा तात्विक भिंगाखाली घालण्यास तरुण पिढीस उद्युक्त करणार्क्ष्या या माणासामुळे लोकशाहीच्या बुरख्या-आडून निरंकुश सत्ता हाकू पाहणाऱ्या तत्कालीन राज्यकर्त्यांची झोप न उडती तर नवल. अथेन्सतर्फे त्याच्यावर रीतसर खटला भरण्यात आला. ग्रीक दैवतांची पायमल्ली आणि अथेन्सच्या युवकाना बहकवणे असे दुहेरी आरोप त्याच्यावर लादण्यात आले. प्लेटोने आपल्या ग्रन्थात या खटल्याचे सविस्तर चित्रण केले आहे. या खटल्याच्या दरम्यान आपल्या विरोधकांची केलेली उलट-तपासणी, त्यांच्या प्रत्येक आरोपाचे खंडन आदि भागातून सॉक्रेटिसची न्याय्य बाजू सिद्ध तर झालीच आहे; पण या खटल्याच्या अंती सॉक्रेटिसने केलेल्या निवेदनात त्याने आयुष्यभर केलेल्या तपश्चर्येचे जणू सारच एकवटले आहे.प्लेटो हा सॉक्रेटीसचा शिष्यवर. ज्ञान हे डबक्यातल्या पाण्यासारखे स्थिर नसून , ती एक प्रवाही गोष्ट आहे, असली पाहिजे , वाद-विवादातूनच तत्वबोध होतो अशा आपल्या ठाम विश्वासांमुळे सॉक्रेटीसने लिहिलेले काहीही इतिहासाच्या दस्त-ऐवजामध्ये सापडत नाही. प्लेटोने मात्र आपल्या Republic या , पाश्चात्य तत्त्वज्ञानातील अत्यंत महत्त्वाच्या गणल्या जाणाऱ्या ग्रन्थामध्ये सॉक्रेटीसच्या विचारांचा , त्याच्या "वाद-संवादीय पद्धत्ती" (Dialectic Method)चा, उत्तम आलेख काढला आहे.
नाटकाचा जो घटनाप्रधान , संवादप्रधान भाग आहे तो आहे सॉक्रेटीसच्या आयुष्यातील अंतिम पर्वाचा,त्याच्या हलाखीबद्दलचा,त्याच्यावरील खटल्याबद्दलचा. त्याला झालेल्या ; नव्हे, त्याने स्वीकारलेल्या शिक्षेचा. अर्थातच , हा सर्व भाग डॉ. श्रीराम लागू यानी रंगविलेल्या सॉक्रेटीसच्या लखलखीत अशा परफॉर्मंस ने उजळून टाकला आहे.त्यांची आतापर्यंतची कारकीर्द म्हणजे एकाहून एक उंच अशी हिमशिखरे आहेत. 'नटसम्राट' , 'हिमालयाची सावली' , 'उध्वस्त धर्मशाळा' , 'एकच प्याला'... नावे तरी किती घ्यायची. पण , आपल्या कारकीर्दीच्या जवळ जवळ अखेरीस केलेल्या या भूमिकेने या सर्वांवर कळस चढला असे म्हण्टले तरी चूक होणार नाही. ख़्याल गायकीमध्ये असंख्य मैफ़ली गाजवून सोडलेल्या एख़ाद्या गवयाने , अगदी वृद्धापकाळी सुद्धा स्वरांची निराळी दुनिया दाखवावी , तसे लागूंनी अनुभवांचे नवे प्रदेश दाखविले आहेत अर्थात , लागूंचा हीरा बसवायला कोंदण हवे ते अस्सल संहितेचे.. त्याबद्दल बोलण्यासारखे प्रचंड आहेच. नवनवे प्रयोग करणाऱ्या समृद्ध अशा मराठी रंगभूमीवरसुद्धा अभिनव ठरेल असे हे , ज्ञानशाखांच्या गाभ्याला हात घालणारे शिव-धनुष्य होते.. ते उचलण्याचे धाडस करणाऱ्या मकरंद साठे या नाटककाराचे , अतुल पेठे या दिग्दर्शकाचे कौतुक करावे तेवढे थोडेच.
इतके बोलून झाल्यवरसुद्धा, काही विचार मनात येतात ते बोलून दाखवल्याशिवाय राहावत नाही ... सॉक्रेटीसची , त्याच्या तत्वांबद्दलच्या लढ्याची बाजू पुरेशा ताकदीने मांडूनसुद्धा काही ताणांचा विलय झाल्यासारखे वाटत नाही. उदाहरणार्थ , सॉक्रेटीसची बायको झांटीप्पेची व्यथा पुरेशा पूर्णत्वाने उतरली नाहीसे वाटते.सत्याकरिता वीरमरण स्वीकारणे हे श्रेयास्पद खरेच. पण सत्याकरिता मरण,की सत्याच्या तडजोडीच्या छायेतील जीवन यातील निवड ही heroic असली तरी व्यामिश्र आहे का?. सामान्य माणसाच्या आयुष्यात याहून अधिक जटील असे choices येतात आणि ते निवडण्याचे निकष असण्याइतपत सॉक्रेटीस आपण नसतो. अशावेळी 'सत्य' , 'स्वातंत्र्य' या गोष्टींचे , कचकड्यासारखे अर्थ दिसायला लागतात ... झांटीप्पेचीची व्यथा अशा स्वरूपाची, कदाचित तशीच जटील असावी असे वाटते... साठे यांच्यासारख्यानी अशा जटील प्रश्नांचाही कधी वेध घ्यावा असे वाटून जाते...
असे हे , मराठी नाट्यभूमीचा नवीन माप-दंड ठरेल असे नाटक. आपल्या सर्वानी जरूर पहावेसे... आपल्या नाट्यविषयक, आणि वैचारिक facultiesना समृद्ध करणारे.