Wednesday, November 23, 2011

२०११ दिवाळी : दिवाळी अंकांचा लेखाजोखा

२०११ सालची दिवाळी आली आणि गेली. दिवाळीशी संबंधित उत्सवाइतकंच तिच्या सांस्कृतिक संदर्भाचंही महत्व वेगळं सांगायला नको. फटाके, कपडेलत्ते, फराळ, स्नेहसंमेलनं यांच्या जोडीने रांगोळी , संगीताच्या मैफली आणि अर्थातच दिवाळी अंक हे येणारच. प्रस्तुत लेखात यंदाच्या दिवाळी अंकांबद्दल जी मतेमतांतरे बनत आहेत त्याबद्दल बोलावे असे वाटले म्हणून हा लिखाणाचा प्रपंच.

मराठी आंतरजालावरही दिवाळी अंकांची परंपरा चांगलीच जोम धरते आहे. बहुतेक सर्व सुप्रसिद्ध मराठी स्थळांचे दिवाळी अंक प्रसिद्ध झालेले आहेत. प्रस्तुत लेखात मात्र, अनेक दशकांची परंपरा असलेल्या छापील मराठी दिवाळी अंकांबद्दल थोडं बोलेन म्हणतो.

दिवाळी उलटून पंधरा-वीस दिवस झाले तरी पोस्टाने मागवलेले अंक पोचायचं चिन्ह नव्हतं. शेवटी एकदाचे पोचले. आल्याआल्या सर्वच्या सर्व अंक एकामागोमाग एक चाळले. मुखपृष्ठ, आतील मजकूराचं स्वरूप , त्याची छपाई , सजावट , आणि मुख्य म्हणजे एकेका अंकाचा सूरताल समजून घेण्याचा प्रयत्न केला. थोडक्यात , एखादं गुर जसं समोर ठेवलेल्या गवताच्या अनेक भार्‍यांना सुरवातीला चिवडतं आणि मग एकेका भार्‍यातल्या "माला"ला तोंडात भरून नंतर सावकाश रवंथ करतं त्यातला प्रकार.

अजून सर्वच्या सर्व दिवाळी अंक अथ पासून इतिपर्यंत वाचून व्हायचे आहेत. ही प्रक्रिया पूर्ण व्हायला अनेक आठवडे जावे लागतील. मात्र आतापावेतो काही "फर्स्ट इम्प्रेशन्स" झालेली आहेत. अनेक ठिकाणी निव्वळ चाळायला सुरवात झाली आणि एखादं लिखाण पूर्ण वाचल्याशिवाय थांबता आलं नाही. समग्र वाचन झाल्यानंतर कदाचित संपूर्णत्वाचं कलम भागेल, परंतु , ताज्या ताज्या लिखाणातली मजा जाईल. म्हणून हा लेखाजोखा आताच मांडावा असं वाटलं.

असो. माझ्याकडे खालील अंक आलेले आहेत :
मुक्तशब्द, मौज , अक्षर, प्रहार , चिन्ह , इत्यादि, संपूर्ण अनुवाद , लोकमत-दीपोत्सव , मटा, लोकसत्ता, साप्ताहिक सकाळ , कालनिर्णय , लोकप्रभा, पद्मगंधा , साधना.

काही निरीक्षणं/मतं मांडतो. विरोधी मतं , अधिक, वेगळी माहिती या सर्वांचं अर्थातच स्वागत आहे.

अजून खरं म्हणजे असं विधान एकदम करणं धाडसाचं होईल , पण "मुक्तशब्द"च्या प्रेमात मी सध्या आहे आणि मला हा अंक सर्वात अधिक आवडलेला आहे. प्रस्तुत वार्षिक प्रकाशन माझ्या माहितीप्रमाणे गेली पाचेक वर्षेच प्रसिद्ध होतं आहे. या पाच वर्षांत या प्रकाशनाने जमा केलेले लोक , त्यांनी केलेलं लिखाण , त्याची गुणवत्ता , या सार्‍याबद्दल मला अत्यंत आदर वाटतो. मुंबईचे श्री येशू पाटील या अंकाचे सर्वेसर्वा आहेत (संपादकपदीही तेच आहेत. ) सुरवातीला मेघना पेठेंनी यांचं संपादकत्व निभावलं होतं. त्यानंतर मुकुंद कुळे यांनी. आता श्री पाटीलच संपादकाच्या पदावर दिसतात. दर वर्षी कुठलं ना कुठलं "फीचर" हा अंक करतो. गेल्या वर्षी ( की दोन वर्षांमागे ) "प्रत्येक क्षेत्रातले खलनायक" असा विषय होता. त्यावेळी उद्योगक्षेत्रातल्या मुकेश अंबानी पासून ते साहित्यातल्या भालचंद्र नेमाडे यांच्या पर्यंतच्या अनेकांच्या कारकिर्दीवर कठोर प्रहार करणारं लिखाण आलेलं होतं. यंदाची "थीम" होती "विचारतुला" , अर्थात, विचारांची तुलना. विविध क्षेत्रांमधले दोन मान्यवर घेऊन त्यांच्यावर लिहिण्याचा उपक्रम. या फीचरमधल्या लेखाची यादीच देतो म्हणजे त्याच्या वैविद्ध्याची कल्पना येऊ शकेल.

"श्रीकृष्ण/जरासंध" - रविंद्र गोडबोले
"ज्ञानेश्वर/चक्रधर" - मुकुंद कुळे
"न्यूटन/लिब्नीझ" - अच्युत गोडबोले
"नेहरू/आंबेडकर " - नामदेव ढसाळ
"पलुस्कर/भातखंडे" - श्रुति सडोलीकर
"भीमसेन/कुमार" - मुकुंद संगोराम
"सॉमरसेट मॉम /गी द मोपासा" रेणु गावस्कर
"इरावती कर्वे/दुर्गा भागवत" - ज्ञानदा देशपांडे
"भालचंद्र नेमाडे/विलास सारंग" - नितीन रिंढे
"जयवंत दळवी/पु ल देशपांडे" - मुकुंद टाकसाळे
"नामदेव ढसाळ/राजा ढाले" - राहुल कोसंबी
"कुमार केतकर/ अरुण टिकेकर" - मुकुंद टाकसाळे
"अंतोनिओनी/बर्गमन" निखिलेश चित्रे
"ग्रेस/महानोर" रणधीर शिंदे
"विजया मेहता/सत्यदेव दुबे" - शफाअत खान
"धीरुभाई अंबानी/नारायण मूर्ती" - नितीन पोतदार
"नसीर/ओम पुरी" - श्रीकांत बोजेवार
"पतौडी/सौरभ गांगुली" - द्वारकानाथ संझगिरी

याखेरीज मुक्तशब्द हा अंक मला विशेष आवडण्याचं कारण म्हणजे रमेश इंगळे उत्रादकरांसारख्यांच्या कविता, जीके ऐनापुरे , कृष्णात खोत यांच्या सारख्यांच्या कथा, यांचा परिचय या अंकामुळे मला झाला. यंदासुद्धा ही परंपरा चालू आहेच. त्याशिवाय अनुवादित कथांचा वेगळा विभागही यंदा आहे. या सर्वांच्या दर्जाबद्दल दुमत होणे शक्य आहे परंतु हा सर्व , साहित्याच्या क्षेत्रातल्या नव्या लोकांमधल्या उत्तम लोकांपर्यंत पोचण्याचा , त्यांच्या कडून लिहवून घेण्याचा एका गंभीर पातळीवरचा प्रयत्न आहे या बद्दल माझ्या मनात शंका नाही.

वादग्रस्त होण्याचा धोका स्वीकारून मला हे विधान करावेसे वाटते की, प्रस्तुत घटकेला या अंकाकडे वैचारिक नेतृत्व आल्यासारखे वाटते आहे. पन्नाशीच्या दशकात सत्यकथा आणि मौज प्रकाशनाने ज्या प्रकारे नवीन लोकांना एकत्र आणून नवं घडवण्याचा प्रयत्न केला त्या जातीचं काम चालू आहे असं मला वाटतं. असो.

इतर काही अंकांकडे वळतो. "चिन्ह" या , चित्रकलेला - खरे सांगायचे तर फाईन आर्टस् असं म्हणायला हवं - वाहिलेल्या प्रकाशनाचा बरेच महिने गाजत असलेला अंक या दिवाळीला प्रसिद्ध झालेला आहे. दृष्यकलेमधल्या विचारांना मराठीतून वाव मिळावा, नामवंत लोकांचं काम आणि त्यांचे विचार मराठीतून मांडले जावेत म्हणून श्री. सतीश नाईक हा अंक गेलं दशकभर (की अधिक ?) काढत आहेत. हे प्रकाशन वार्षिक आहे आणि त्यांचा प्रत्येक अंक संग्राह्य असतो. प्रभाकर कोलते , सूझा , आरा , गायतोंडे अशा आंतराष्ट्रीय ख्यातीच्या कलावंतांच्या कामाची ओळख , प्रसंगी प्रदीर्घ मुलाखती आणि प्रत्येक वार्षिक अंकात भरगच्च आर्टप्लेट्स. पाश्चात्य देशात आणि भारतातल्या इंग्रजी माध्यमामधे जो प्रकार मोठ्या प्रमाणावर होतो त्या दर्जाचं काम मराठीतून होणं , ते आपल्याला पहायला मिळ्णं ही एक अत्यंत आनंदाची बाब आहे असं मानतो. "चिन्ह"चा यंदाचा अंक नग्नतेबद्दल आहे आणि या प्रकाराची परंपरा , या प्रकाराचे भारतीय संदर्भ, त्या प्रकाराला जोडून आलेली वादग्रस्तता, हुसैन सारख्यांचा अपरिहार्यपणे येणारा विषय , भारतीय चित्रकारांनी या क्षेत्रांत पूर्वी आणि आता केलेले काम , त्यातल्या नैतिक/सामाजिक/राजकीय गुंतागुंती या सार्‍यांचा उत्तम आर्टप्लेट्स सकट दिलेला एक श्रीमत् अनुभव म्हणजे चिन्ह. चिन्ह बद्दल - किंबहुना मी उल्लेख करत असलेल्या प्रकाशनांपैकी अनेकांबद्दल - स्वतंत्र लेख लिहिणे योग्य होईल. ते जमेल न जमेल म्हणून सध्या इतपत माहिती देतो आहे.

२०११ चे दिवाळी अंक वाचताना , एकंदरीत अलिकडच्या वर्षांमधल्या दिवाळी अंकांच्या ट्रेंड्स बद्दल विचार करताना काही गोष्टी जाणवल्या.

अ. ललित वाङ्मयाचा घसरलेला टक्का : एकंदरीत सर्व सुप्रतिष्ठित अंकांवर नजर टाकली असतां हे सहजच कळतं की नॉन-फिक्शन ने ६०, ७०, ८० टक्के - आणि "साधना"सारख्यांच्या संदर्भात बोलायचे तर १०० टक्केसुद्धा - मजकूर व्यापलेला आहे. यातून अनेक शक्यता नोंदवता येतील.
१. दर्जेदार ललितलिखाणाचा अभाव
२. ललित लिखाणाला अलिकडच्या काळात सातत्याने सोसावी लागलेली घसरत्या लोकप्रियतेची झळ
३. एकंदरीतच , माहिती, ज्ञान , इत्यादि गोष्टींचे ललितकृतींवर झालेले वर्चस्व.

या सर्वांबाबत मला एकट्याला निश्चित मतप्रदर्शन करता येईलच असे नाही. पण "द रायटिंग इज ऑन द वॉल" हे खरं.

ब. छापील माध्यमांनी ऑनलाईन मराठी लिखाणाची अतिशय स्पष्टपणे घेतलेली दखल : छापील आणि ऑनलाईन प्रकाशनांमधल्या लोकांचा एकमेकांच्या सदर्भातला सवतासुभा नवा नाही. छापीलवाले ऑनलाईन वाल्यांकडे गांभीर्याने पाहात नाहीत आणि ऑनलाईनवाल्यांना छापीलवाले सरंजामशाही सारखे , उच्चभ्रू , रटाळ , एकदिशीय वाटतात. यंदा मात्र प्रहार , अक्षर यांच्या सारख्यांनी ऑनलाईन माध्यमाची दखल निश्चित घेतलेली आहे. रामदास आणि चिंतातुर जंतू यांचे ऑनलाईन माध्यमातल्या मराठी लिखाणासंबंधातले लेख प्रहार ने छापलेले आहेत. अक्षरने सुद्धा एक संपूर्ण विभाग या बाबत दिलेला आहे. या लिखाणांमधून ऑनलाईन माध्यमातल्या लोकांच्या शक्तीस्थानांची , या माध्यमाच्या भविष्यकालीन अधिकाधिक मोठ्या सहभागाची नोंद घेतलेली तर आहेच. अभिजित ताम्हाणेंसारख्या ज्येष्ठ पत्रकाराने "अधिक गुणी मराठी ब्लॉग असावेत, अधिकाधिक प्रगल्भ लोकांनी मराठी ब्लॉग लिहावेत अशी अपेक्षा व्यक्त केलेली आहे". विश्राम गुप्तेंनी आपल्या एका लेखात "ब्लॉगलिखाण म्हणजे निव्वळ बडबड" अशी टिप्पणीही केल्याचं दिसतं आहे. थोडक्यात अजून अढी पूर्ण संपलेली नाही. अनेक दिवाळी अंकांमधल्या लेखाच्या अखेरीस लेखकाचा इमेल पत्ता दिला गेलेला आहे. (एका दिवाळी अंकात फक्त इमेल पत्ताच दिला आहे. बाकी डिटेल्स नाहीतच. )

क. कलेची गुणवत्ता आणि मार्केटेबिलिटीचा घातला गेलेला मेळ : या संदर्भात वेगवेगळ्या दिवाळी अंकांनी वेगवेगळे मार्ग चोखाळलेत असं म्हणायला हवं. साधनाचा गेल्या वर्षीचा दिवाळी अंक अर्थातच वाचनीय होता. परंतु इतरांपेक्षा बराच जाड असलेल्या या अंकात जाहिराती बेसुमार होत्या. यंदा या अंकाचा साईज जरा नॉर्मल आहे. पण तरी जाहिरातींचा टक्का मोठाच दिसतो. महाराष्ट्र टाईम्स ने वर म्हण्टल्याप्रमाणे , मुखपृष्ठसुद्धा स्पॉन्सर केल्यासारखे दिलेले आहे (त्यात सिरियलचं बॅनर नाही इतकंच ). मार्केटिबिलिटीचा मुद्दा केवळ जाहिरातीपुरता मर्यादित नाही, हा मुद्दा "लोकमत"च्या दिवाळी अंकातून उत्तम रीतीने देता येईल. या अंकाचे अतिथिपद शोभा डेंकडे आहे. त्याच्या मुखपृष्टावर डे बाईंबरोबर अमिताभ बच्चन, करीना कपूर , नीता अंबानी (!) यांच्या सारख्यांच्या नावाची जंत्रीच आहे. संपूर्ण दिवाळी अंक महागड्या ग्लॉसी पेपरवर छापला गेलेला आहे. अर्थात आतमधे उपरोल्लेखित चमकदमकत्या नावांखेरीज रामचंद्र गुहा यांच्या सारख्यांचेही (प्रसंगी अनुवादित) लेख देऊन बॅलन्स साधण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे. मेघना ढोके या तरुण पत्रकाराचा या अंकात प्रदीर्घ लेख आहे आणि एक स्वतंत्र लेख म्हणून तो या अंकातला सर्वात चांगला ठरावा. शोभा डें नी केवळ "मी माहेरला आलेले आहे" अशा स्वरूपाचे मांगल्यवाचक गोऽड टिपण लिहिले आहे इतकाच त्यांचा सहभाग. बाकी बच्चन, अंबानी, कपूर यांचा संपर्क साधून देणे इतकंच काम केलेलं दिसतं. बच्चन , अंबानी , कपूर यांचे "लेख" अर्थातच भाषांतरित तर आहेतच पण ते मूळ लेख सुद्धा त्यांनी "लिहिलेले" नाहीत, शब्दबद्ध केलेले आहेत. या अंकाच्या दहा दहा हजाराच्या चार एडीशन्स खपल्या आहेत असं मला कळलं. किंमत केवळा शंभर रुपये - जी अर्थातच पेपर क्वालिटी लक्षांत घेता अत्यंत कमी आहे. याचा अर्थ सर्व पैसे जाहिरातीतून . ब्रँड च्या मार्केटीबिलिटीचं याहून उत्कृष्ट उदाहरण दिवाळी अंकांच्या संदर्भात मला सापडणं प्रायः अशक्य आहे.



दिवाळी अंकांबद्दलची प्रस्तुत चर्चा पहिली नाही. इतरांनीही या विषयाबद्दल लिहिलं आहे. प्रस्तुत ब्लॉग एंट्रीचं उदाहरण पहा. हा लेख यंदाच्या दिवाळी आधी आलेला होता.
http://ramjagtap.blogspot.com/2011/09/blog-post_17.html

उपरोल्लेखित लेखाबद्दल :

"दिवाळी अंकांचा दर्जा घसरला आहे" अशा स्वरूपाची मते असणे सहज शक्य आहे. तशी मते मांडण्यालाही हरकत नाही. बरीच नावं घाऊक प्रमाणात घेतली गेली आहेत. हे सर्व ग्राह्यतेच्या कक्षेत यायला कसलीच ना नाही. मात्र "अमुक लेखक/लेखिकांनी आता लिहू नये" असं म्हणणं काहीसं रोचक आहे. मला व्यक्तिशः अशा स्वरूपाची विधाने आवडत नाहीत खरी.

दिवाळी अंकाना - आणि एकंदर सांस्कृतिक पर्यावरणामधे - मांद्य आलेले आहे. ही सद्दी सुमारांची आहे अशा स्वरूपाची मते अधून मधून मांडली जात असतात. माझ्यामते या सर्व चक्रमेनिक्रमेण घडणार्‍या गोष्टी आहेत. काही क्षेत्रांमधे काही काळ एकंदर अ‍ॅक्टिव्हिटीज् कमी होतात. काही काळ तेजीचा असतो. "सध्याचा काळ मोठा वाईट आला" अशा स्वरुपाच्या विधानांमधे स्मरणरंजनपर चुका तर होत नाहीत ना ? "जुने ते हिरण्मय, नवे ते टाकाऊ" अशी एकांगी भूमिका आपण घेत नाही आहोत ना ? हे तपासून पहाणे महत्त्वाचे. ज्या काळात आपण जगतो त्या काळाचे मूल्यमापन त्याच चालू क्षणी करू शकणे हे कठीण काम आहे. जगतापांनी "अमुकांचे लिखाण वाईट होते. यांनी थांबावे" असं म्हणताना लेखकांची जंत्री दिली आहे. त्याबरोबर त्यांनी नव्या जोमाच्या किंवा अनेक वर्षं लेखन करतानाही नवनवीन वाटा धुंडाळणार्‍या व्यक्तींची नावे लिहिली असती तर बरे झाले असते. आपण हे विसरता नये की, आसाराम लोमटे, समर खडस, जयंत पवार, निखिलेश चित्रे, जयदेव डोळे, कृष्णात खोत, यांच्यासारखे लेखक आपल्याला अलिकडच्या दिवाळी अंकांमार्फतच भेटलेले आहेत. या सर्वांनीही आपल्या लेखण्या मोडाव्यात असे त्यांचे म्हणणे आहे काय ? :)

असो. जगतापांनी टाकलेले क्षकिरण साठीच्या दशकातल्या अशोक शहाण्यांपासून अलिकडे हर्डीकरांपर्यंत अनेकांनी टाकलेले आहेत आणि अशा स्वरूपाचा रिअ‍ॅलिटी चेक चांगलाच. मात्र, सुक्याबरोबर ओल्यालाही जाळणे, "throwing the baby out with the bath water" या संदर्भातला रिअ‍ॅलिटी चेक क्षकिरणाच्या उपकरणांनी करायला हरकत नाही :)

Wednesday, March 9, 2011

"रॉय "

खरं तर 'रॉय' हे क्रिश्चनांमधे , अमेरिकनांमधे माणसाचं नाव असतं हे मला माहिती नव्हतं. (रॉय कॅम्पबेल वगैरे नावं मी नंतर वाचली.) त्यामुळे रॉय विल्सन हे नाव पहिल्यांदा ऐकलं तेव्हा गंमत वाटली होती. रॉयचा नि माझा परिचय झाला ती गोष्ट योगायोगाची म्हणता येईल.

आम्ही आमच्या पहिल्या घरात राहात होतो. घर लहान असले तरी तेव्हा आम्ही दोघेच असल्याने पुरेसे होते. घरात पहिले छोटे पाहुणे येणार याची चाहूल लागली आणि या घराचे बेसमेंट फिनिश करून घ्यावे असा विचार मनात घोळायला लागला होता. या संदर्भात कायकाय करावे लागते , एकंदर खर्च काय येतो याची चौकशी मी केली. वेगवेगळ्या स्वरूपाची एस्टीमेट्स घेतली. कामाचे स्वरूप आणि प्रमाण पाहता माझ्यासारख्याला हे झेपणार नाही याची खूणगाठ तर मी बांधलेलीच होती.

उन्हाळ्याचे दिवस. मी घरासमोर कसले तरी छोटेमोठे काम करत होतो. आमच्या शेजारच्या घराला शिडी लावून एक माणूस काम करत होता. वर्णाने काळ्या असलेल्या या माणसाला मी याआधी कधी पाहिले नव्हते; त्यामुळे हा कुणी कामकरी आहे हे मला जाणवतच होते. घराच्या कौलांचे कसलेसे काम चाललेले होते. मी हातातले काम करता करता त्याला हलो म्हणालो नि त्यानेही प्रतिसाद दिला. माझे काम संपवून मी घरात आलो नि मला काय वाटले कोण जाणे, मी परत बाहेर आलो नि त्याला विचारले , "तू कसली कसली कामं करतोस ?" त्याने काम थांबवले नि तो म्हणाला , "मी कुठलीही कामं करतो, कॉन्ट्रॅक्टिंग ची". मग मी म्हणालो , "आमचे बेसमेंट फिनिश करायचा माझा विचार आहे". तो म्हणाला, "थोड्या वेळाने मी आत येतो नि एकदा पाहून जातो."

थोड्या वेळाने बेल वाजली. दारात हा गडी. एकंदर अमेरिकन लोकांचा सरसकट अंदाज येणं कठीण , पण हा पंचेचाळीस-पन्नासचा असावा. दणकट बांधा, मध्यम उंची. उन्हात काम करून घामाघूम झालेला. काहीसे मळकट कपडे घातलेले. घरात आल्यावर मी त्याला खाली नेले. त्याने एकंदर पाहाणी केली नि तो वर आला. " मी तुला माझे एस्टिमेट देतो." असं म्हणून गेला. जाताना माझा फोन नंबर घेऊन गेला.

पुढच्या शनिवारी मला फोन करून दुपारच्या वेळी आला. यावेळी त्याच्याबरोबर एक तरुण मुलगा होता. तोही कृष्णवर्णीयच. रॉयने दिलेले एस्टीमेट मी पाहिलेल्या आताच्या एस्टीमेट्पेक्षा निश्चितच कमी होते. त्याने या एस्टीमेट्बरोबर आधीच्या क्लायंट्सनी दिलेली शिफारसपत्रेही आणलेली होती. प्लंबिंग आणि इलेक्ट्रिक फिटींग ची कामे तो इतराना देणार होता - थोडक्यात आउटसोर्स करणार होता.

हे काम मी रॉयला दिले. पुढच्याच आठवड्यात काम सुरु झाले. एक गोष्ट माझ्या लक्षात यायला लागली होती. रॉय कधीच एकटा ड्राईव्ह करून येत नाही. त्याच्याबरोबर कुणीतरी असतंच. त्याला राईड देणार्‍या व्यक्ती त्याच्याबरोबर काम क्वचितच करतात. बहुतांशी त्याला सोडण्यापुरत्याच त्या येतात. सामान आणणे/नेणे याकरता लागणारा मोठासा ट्रक रॉयपाशी नाही. पुढे सुमारे महिनाभर चाललेल्या या कामादरम्यान रॉयचे आमच्या घरी येणे अपरिहार्य होतेच; पण काही प्रसंगी त्याला मधूनच बाहेर पडावे लागणेही आवश्यक असयाचे. अशा वेळी त्याला ने आण करणार्‍या लोकांची वाट बघण्याऐवजी मीच त्याला नेऊ आणू लागलो. यात माझा वेळ जायचा खरा पण एकंदर काम वेळेत होण्याकरता ही नैमित्तिक गैरसोय मी सहन केली.

त्याला नेण्याआणण्याच्या दरम्यानच माझा नि रॉयचा संपर्क अधिक दृढ बनला. आतापावेतो झालेले बोलणे कामापुरते होते. कामाचे स्वरूप आणि प्रमाण निश्चित करणे , पैशाची देवाणघेवाण , कामाच्या निरनिराळ्या अवस्था, त्याची प्रगती वगैरे. त्याला नेता आणताना एकमेकांबद्दल थोडे बोलणे झाले.

"सो, रॉय. तू ड्राईव्ह करत नाहीस. ही काय भानगड आहे ?"
"काय सांगू ? माझी होती गाडी काही वर्षांपूर्वी. आता नाही."
"काय झालं ?"
"अरे काय सांगू. दारू पिऊन गाडी चालवत होतो. पोलिसाने पकडलं".
"बाप रे. ड्रंक ड्रायव्हिंग. किती वर्षं झाली ?"
"झाली ना पाचेक वर्षं. नक्की आठवत नाही आता."
"पाच वर्षं !! ड्रंक ड्रयव्हिंग करता पाच वर्षं !"
"आय डिड टाईम मॅन".
हॉलिवूडपट पाहिल्याने याचा अर्थ मला माहितीच होता. मी दोन मिनिटं स्तब्ध.
"दारू प्यायल्याबद्दल डायरेक्ट 'आतमधे' !?"
"अरे.. मी निव्वळ दारू प्यालो असतो तर ठीक आहे. पण झालं असं की मी पोलिसाशी भांडलो."
"अरे , तुला तर माहिती आहे, इथे आर्ग्युमेंट चालत नाही बाबा. पण एकदम जेल ?"
"नाही... भांडण नुसतं शाब्दिक नव्हतं"
बाबौ.
त्याने माझं मन जणू वाचलं. तो पटकन म्हणाला ,
" हे मॅन. डोंट वरी. त्यानंतर माझं रेकॉर्ड एकदम क्लीन आहे. तू ती रेकमेंडेशन लेटर्स वाचलीस ना ?"
त्यानंतरच्या दिवसांमधे मी थोडा काळजीमधे होतो खरा.

एकंदर काम पार पडले. दिलेल्या एस्टीमेट्च्या खर्चापेक्षा किंचितच अधिक खर्चात ; पण एस्टिमेट मधे दिलेल्या वेळेच्या नक्कीच अधिक वेळेत. रॉयकडे वाहन नव्हते हेच त्याचे उघडउघड कारण होते. पण फार भयंकर उशीर झाला नाही आणि एकंदर कामाचा दर्जा समाधानकारक होता.

हे काम चालू असताना काही प्रसंग असे आले की काम उशीरापर्यंत चालायचे. अशावेळी रॉयला घरी सोडायचा प्रसंग आला. या सर्व प्रवासात माणसे हळुहळू एकमेकांशी बोलायला लागतात , मोकळी होतात तेच आमचेही झाले.

"मग रॉय, तुझं वय काय रे ?"
"मी बावन्न वर्षांचा आहे. "
"वॉव. तुझ्यापेक्षा पंधरा-सतरा वर्षांनी लहान आहे मी"
"हो मला दिसतंच आहे. तुला तर मुलंही झाली. आम्ही तसेच."
"अरे मुलं म्हणजे.. दोन एकदमच ना ! नाहीतर एकच तर असतं."
"मुद्दा तो नाही आहे, आणि तुलाही माहिती आहेच" - इति रॉय.
"अँड व्हॉट इज द पॉईंट रॉय ?" - मी.
"अरे दोन ब्यागा घेऊन येता तुम्ही. घरं बांधता. लगीन करता. मुलं होतात तुम्हाला. पुढची पीढी आता इथेच. आणि आम्ही काळे लोक. चोर्‍यामार्‍या करतो. एकंदर रखडतो. "
हम्म. जी गोष्ट मी ऑफिसातल्या गोर्‍या माणसांच्या नजरेत वाचतो तीच गोष्ट एक कामकरी वर्गातला काळा माणूस विनासंकोच सांगत होता.
"अरे रॉय, हे खराय की आमच्या गाड्या नि घरं दिसतात. पण गाडी तर सगळ्यांची असतेच ना अमेरिकेत."
हे बोललो नि मनातल्या मनात जीभ चावली. काही क्षण गेले.
"अरे, तू काय मुद्दाम बोलला नाहीस मला माहिती आहे. घाबरू नको. धिज ब्लॅक मॅन इज नॉट गोईंग टू जंप यू. रिलॅक्स."
आम्ही दोघेही हसायला लागलो.
"रॉय अरे इतर सगळ्यांप्रमाणेच आम्हीही मॉर्ट्गेज घेऊनच घरं घेतो बाबा. आयुष्यभराचं कर्ज."
"हो ना. पण त्याच्याकरता देशाबाहेरून आलेल्या तुम्हा इंड्यन आणि चायनीज माणसाना सरकार पैसे देतं ना !" - इति रॉय.
बाबौ !
"वोह वोह वोह रॉय. व्हॉट आर यू टॉकिंग अबाऊट मॅन !"
"तुला ठाऊकाय मी काय म्हणतो ते. पैसे मिळतात ना तुम्हाला सरकार कडून. आम्हा काळ्यना काही नाही !"
या पुढचे सगळे संभाषण त्याला "असले काही नसते" हे सांगण्यात गेले.

रॉयला नेण्या आणण्याच्या दिवसांत त्याचं राहातं घर मी एकदा पाहिलं होतं. एका मध्यमवर्गीय भागातल्या घरात पेईंग गेस्ट म्हणून तो राहायचा. त्याला सोडायला घरात गेलो तर त्याच्या घरमालकीण बाईना हलो म्हण्टलं. सत्तरीला आलेली एक गोरी अमेरिकन बाई. एकटीच राह्यची. तिला रॉयची भरपूर मदत व्हायची. आणि बहुदा रॉयकडून ती घेत असलेले भाडे बरेच कमी असावे.

रॉयची पहिली ओळख नि पहिले काम करवून घेणे या गोष्टीना सुमारे आठ वर्षे झाली. या नंतरच्या काळात माझ्या नि रॉयच्या वर्षाकाठी किमान चार पाच भेटी तरी झाल्याच. भेटी कामानिमित्तच व्हायच्या. काही कामे वर्षाकाठची तर काही नैमित्तिक. यातून रॉयच्या आयुष्यात झालेले बदल मला कळत नकळत जाणवत होते. मी दिलेल्या कामामुळे त्याला एक जुनाट का होईना , पण गाडी घेता आली. काय मौज आहे पहा. माझ्या कामादरम्यान गाडीची नितांत गरज होती पण गाडी घेता आली काम संपल्यावरच. पण त्यामुळे का होईना यापुढच्या भेटीत त्याला गाडीतून नेण्या आणण्याचे प्रसंग काही काळ आले नाहीत.

हळुहळू , मला असा कुणीतरी स्वस्तात काम करून देणारा माणूस भेटला आहे या गोष्टीची खबर - जशी कुठल्याही डीलची खबर सर्वात आधी जिथे पोचते त्या - माझ्या देसी बांधवांपर्यंत पोचलीच. यांपैकी कुणी मग रॉयला डेक दुरुस्त करण्याचे , तर कुणी बाथरूम चे तर कुणी बगिच्याचे काम दिले. अशा प्रकारे , रॉयला नियमित काम मिळवून देण्यात मदत केल्याबद्दल रॉयचा आणि प्रसंगी सस्त्यात काम करून मिळाल्याबद्दल माझ्या देशबांधवांचा दुवा मी मिळविला. अर्थात क्वचित प्रसंगी या पुष्पगुच्छांबरोबर वीटाही खाव्या लागल्या.

"अरे रॉय, तू त्या अमक्याअमक्याबरोबर काय भांडण केलेस ?"
"म्हणजे ? तू त्याला ओळखतोस ?"
"रॉय , तो इंडियन आहे !"
"आय शुड हॅव नोन. नाहीतर मला कुणा इंडियनकडून कॉल येईल कसा !"
"अरे पण काय झालं ?"
"यू इंडियन्स. यू गाईज थिंक यू आर बेटर दॅन अस."
"रॉय. लास्ट आय चेक्ड, मी पण इंडियन आहे"
"नॉट यू मॅन . आय नो यू डोंट थिंक लाईक दॅट".
(मी मनातल्या मनात : "दॅट्स प्रॉबेबली बीकॉज आय अ‍ॅम नॉट बेटर दॅन यू".)
"बट दॅट गाय मॅन. ही वॉज टॉकिंग टू मी लाईक आय अ‍ॅम स्टुपिड !" - रॉय.
"हाऊ डू यू नो रॉय ? "
" अ ब्लॅक मॅन नोज , रॉज !" - इति रॉय.

हो ते सांगायचं राह्यलंच : त्याला राज हे माझे घासून गुळगुळीत झालेले संक्षिप्त नाव कधी म्हणता आले नाही. तो नेहमी "रॉज" "रॉज" करतो.

असो. आमच्या आतापर्यंतच्या सहवासात असे अनेक संवाद झडले. अमेरिकन समाजात असलेले कन्व्हेन्शनल विस्डम , पोलिटिकल करेक्टनेस या गोष्टी त्याच्याकडे अभावाने आहेत हे आतापावेतो मला नीट समजलेले आहे. मात्र असे असूनही त्याच्याकडून मी नक्कीच काहीतरी शिकलो आहे. काही तांत्रिक गोष्टी तो कसा करतो आहे हे नीट पाहून शिकलो नि नंतर त्या गोष्टींकरता परत त्याला बोलावले नाही. म्हणजे थोडक्यात , भारतीय कंपन्या जे करतात तेच मी करत आहे की ! अर्थात काही अंगमेहनतीच्या किंवा किचकट कामांकरता त्याला कधीतरी बोलावणे होतेच.

रॉयच्या निमित्ताने एक निराळी अमेरिका मी पाहतो. आतापर्यंत पाहिलेली अमेरिका ऑफिसमधली किंवा शेजारपाजारचे लोक किंवा आता मुले थोडी मोठी होऊ लागल्यावर त्याच्या वर्गातल्या मुलांचे पालक. हे सर्व लोक पांढरपेशा आहेत. त्यांचे प्रश्न , त्यांची त्यानी शोधलेली उत्तरे , त्यांचे जीवनमान, चालीरीती टिपिकल अमेरिकन सबर्बिया मधल्या. रॉय आणि त्याच्या अनुषंगाने भेटलेल्या लोकांची दुनिया वेगळी. विकसित देशांमधेही एकंदर विकासाची फळे न चाखलेल्या , रस्ता हरवलेल्या नि सदा रस्ता शोधावा लागलेल्या लोकांकडे पाहायची माझी खिडकी म्हणजे रॉय. आजही अमेरिकेत असे रॉय आहेत ज्यांच्याकडे कवडीचेही सेव्हिंग नाही. त्यांचं पोट अक्षरशः हातावर असतं. एकदा अनेक आठवडे रॉयने माझ्या फोन कॉलना नि मेसेजेस ना उत्तर दिलं नाही. तेव्हा कळलं तो कुठे काम करत असताना पडला. हॉस्पिटलमधे होता. इन्शुरन्स वगैरे असण्याचा काही संबंध नव्हता. आता त्याला सुमारे साठेक हजारांचे बिल फेडायचे आहे. कितीतरी वर्षांत तो डेंटिस्ट कडे गेलेला नाही. इतकंच काय , कितीतरी वर्षांत त्याने टॅक्स भरण्यासारखी मूलभूत गोष्ट केलेली नाही.

अशा व्यक्तींची सामाजिक, राजकीय मते हा एकंदर मजेदार प्रकार असतो. दोन वर्षांमागे ओबामा निवडून आल्यावर मी रॉयला विचारले. तो म्हणतो :
"मला त्याचे काय ? आणि हे लोक तर बहुदा त्याला मारूनच टाकतील."
"हे लोक ? कोण लोक ?" - मी.
"दीज व्हायटीज् , मॅन !".

एकदा कसलेही काम नसताना त्याचाच फोन मला आला. संध्याकाळी वेळ असेल तर भेटू म्हणून. मला काय वाटले माहिती नाही. मीही गेलो.
अंधारी खोली. त्यात रॉयचे दोन मित्र बसले होते. रॅपम्युझिक चालू होते. धूर भरलेला. माझी त्याने ओळख करून दिली. मी बीअर घेतली. रॉय ने मला जळती सिगरेट दिली.
"मी सिगरेट स्मोक करत नाही रॉय. तुला माहिती आहे."
"धिस इज नॉट सिगरेट मॅन."
"ओह. तरीच मला भयंकर वाटत होता वास मारियुआनाचा."
"धिस इज नॉट दॅट."

मी लगेच गाशा गुंडाळला. "अदिओस, वामोस". त्यानंतर परत पार्टीला जायची हिंमत केली नाही.

कधीकधी रॉयचा विचार करतो तेव्हा वाटतं , मार्क्सने ज्याचं वर्णन प्रोलिटॅरिएट असं केलं ते याच्यापेक्षा काय वेगळं असणार. रॉयसारख्या माणसांच्या हातून बोल्शेव्हिक क्रांती होईल असा एक गमतीदार विचार माझ्या डोक्यात येऊन गेला. नारायण सुर्व्यांच्या कविता वाचताना "भाकरीचा चंद्र शोधण्यात जिंदगी बरबाद झाली" असे शब्द येतात. याचा नक्की अर्थ काय याचे जिवंत उदाहरण माझ्या डोळ्यासमोर आहे. रॉयच्या आईला मी एकदा भेटलो आहे. थंड कोरड्या नजरेतल्या सर्व अपेक्षा संपलेल्या. दे गॉट नथिंग टू लूज. दे जस्ट गॉट नथिंग...

परवाच माझ्याकडे काही कामानिमित्त आलेला होता. माझी बायको मुलाना घेऊन जात होती. कुठे जात आहेत याची त्याने चौकशी केली. पोरं कसल्याशा सॉकर प्रॅक्टिस ला जात होती. "नाईस रॉज , नाईस. ब्लॅक किड्स वेअर देअर हूड्स अँड लर्न टू ब्रेक इन्टू समवन्स हाऊस. युअर किड्स गो टू सॉकर. हा हा हा"

मग नेहमी प्रमाणे आम्ही बसून एक बीअर घेतली.

Saturday, November 27, 2010

अश्विनी कुलकर्णी यांची मी घेतलेली मुलाखत

"कीं घेतले व्रत न हे अम्ही अंधतेने"

महाराष्ट्राची महती गाणारी अनेक गाणी आहेत; सुवर्णमहोत्सवाच्या या वर्षात आपल्या राज्याच्या प्रगतीचा लेखाजोखा घेतला जाईलच. मात्र या सार्‍या बिरुदांमध्ये माझ्या दृष्टीने सगळ्यात महत्त्वाची उपाधी म्हणजे, महाराष्ट्र हे कार्यकर्त्यांचे मोहोळ म्हणून मानले गेलेले आहे. सामाजिक उन्नयनाच्या विविध बाबींकरता झटणार्‍या कार्यकर्त्यांच्या पिढ्यांमागून पिढ्या जिल्ह्याजिल्ह्यातून येथे काम करताना दिसतात. अनिल अवचट, अभय बंग, आमटे परिवार ही नावे आपल्या सर्वांना अपरिचित बिलकुल नाहीत. या सर्वार्थाने मोठ्या माणसांच्या नंतर आलेल्या पिढीतल्या , नव्या दमाच्या लोकांची ओळख प्रस्तुत सदरावाटे करून देण्याचा, हा एक नम्र प्रयत्न.

या उदात्त परंपरेचाच वारसा सांगणार्‍या एका तडफदार आणि बुद्धिमान कार्यकर्तीची आपण एका मुलाखतीद्वारे ओळख करून घेणार आहोत. नाशिकच्या 'प्रगती अभियान' या संस्थेच्या अध्वर्यू अश्विनी कुलकर्णी यांच्याशी केलेली ही बातचीत. रोजगार हमी योजना आणि माहितीचा अधिकार या योजनांचा जनकल्याणाकरता उपयोग करून देण्याकरता झटणार्‍या या कार्यकर्तीचे नाव अलीकडे प्रकाशात आले, ते 'लोकमत' व 'लोकसत्ता'मध्ये त्यांनी लिहिलेल्या लेखांमुळे. ज्यांनी माहितीच्या अधिकाराच्या कायद्याचा वापर करून स्वच्छ, पारदर्शी व्यवहाराची अपेक्षा प्रशासनाकडून ठेवली, 'व्यवस्थे'त, कार्यप्रणालीत आमूलाग्र बदल घडवण्याचा प्रयत्न केला, काही प्रमाणात घडवला; त्यांनाच 'लक्ष्य' करून संपवण्याचे प्रकार आता सुरू झाले आहेत.अश्विनीबाईंचे कार्य हे आता केवळ एका विधायक कामाचेच राहिलेले नसून, या भीषण घटनांमुळे त्याला आता पराक्रमाचेच स्वरूप प्राप्त झालेले आहे. उपक्रमाने या कामाची उत्तम दखल घेतलेली आहे. दुवा : http://mr.upakram.org/node/2706 . उपक्रमावरच्या या लेखातून प्रेरणा घेऊनच प्रस्तुत मुलाखत घेतली गेली हे इथे आवर्जून नमूद केले जायला हवे.

मुलाखतीचे प्रमुख अंश पुढीलप्रमाणे :

प्रश्नकर्ता : नमस्कार. तुम्ही आवर्जून देत असलेल्या वेळाबद्दल आभार. तुम्ही लिहिलेला लेख वाचनात आला. २००५ पासून अस्तित्वात आलेल्या माहितीच्या कायद्याबद्दल आता पुष्कळ माहिती उपलब्ध आहे. या कायद्याचा वापर करून सरकारी आणि इतर कंत्राटदार-धंदेवाईक लोकांनी केलेले अपप्रकार उघडकीला आल्याच्या कथा आता इंटरनेटवर वारंवार वाचायला मिळतात. मात्र तुम्ही जो लेख लिहिलात तो अतिशय धक्कादायक होता. या लेखामुळे तुमच्याशी बोलणे महत्त्वाचे वाटले.

सर्वप्रथम, तुमच्या संस्थेबद्दलची माहिती www.pragatiabhiyan.org या साईटवर आम्ही वाचली. तुमच्या या कामाबद्दल थोडी प्राथमिक माहिती सांगता का ?

अश्विनी : आमची संस्था नवी आहे. मात्र तिच्या स्थापनेच्या आधीपासून सुमारे वीस वर्षे काम चालू आहे. हे सर्व काम नाशिक परिसरातल्या ग्रामीण भागाशी संबंधित आहे. रोजगार हमी योजना , रेशनव्यवस्था, माहितीचा अधिकार आणि शेतीविषयक सरकारी धोरणे या संदर्भात काम चालू आहे. यापैकी रोजगारासंबंधी आम्ही केलेले काम बर्‍याच मोठ्या प्रमाणातले आहे.

प्रश्नकर्ता: "रोहयो" या नावाने ओळखली जाणारी रोजगार हमी योजना ही महाराष्ट्राकरता बरीच जुनी आहे, नाही का ? महाराष्ट्र सरकारने अभिमान बाळगावा असा तो प्रकल्प होता. आजचे वास्तव काय आहे ?

अश्विनी : २००५ मध्ये हा कायदा राष्ट्रीय पातळीवर अस्तित्वात आला. मात्र महाराष्ट्रात १९७० व १९८०च्या दशकांत रोहयो अतिशय उत्तम पद्धतीने राबवली गेली. ज्या सर्व पायाभूत सोयी दिसतात त्या त्यामुळेच. पश्चिम महाराष्ट्रात सिंचन, बारमाही पिके, कच्चे-पक्के रस्ते, कालवे यासारख्या मूलभूत गोष्टी दिसतात, त्या सर्वाचे प्रमुख श्रेय हे त्या काळातल्या रोहयोचे आहे. एकीकडे लोकांच्या हातात क्रयशक्ती मिळवून देणे आणि दुसरीकडे गावात मूलभूत सोयी निर्माण करणे हे मॉडेल उत्तम रीतीने राबवले गेले. मात्र नव्वदीच्या दशकात यात बरीच पीछेहाट झाली. जिथून मागणी आहे तिथेच नोकरशाही काही करत नाही अशी परिस्थिती निर्माण झाली. रोहयोची खरी गरज कुणाला? तर भूमिहीन, अल्पभूधारक असा जो नडलेला , पीडित वर्ग आहे त्याला. असा सगळ्यात दुबळा जो वर्ग - सरकारच आपल्याला मदत करत नाही, म्हणून या वर्गातल्या माणसाकडून काही लढा, आंदोलने होतील ही अपेक्षाच चूक आहे. तर असा हा वर्ग आणि दुसरीकडे मुजोर नोकरशाही या विपरीत परिस्थितीमुळे ही गुणी योजना सपशेल बारगळली. २००५ साली केंद्र सरकारचा कायदा आल्यावर त्याला नवसंजीवनी मिळाली. आता कुठे परत महाराष्ट्रात हालचाल सुरु झाली आहे. मी गेल्या वर्षभरात आंध्र प्रदेशचा अभ्यास करते आहे. मूलभूत सुविधा निर्माण करण्याकरता , या योजनेचा अतिशय उत्तम रीतीने वापर खेडोपाडी होताना त्या राज्यात दिसतो आहे.

प्रश्नकर्ता : तुम्हाला थोडे मधेच अडवतो. नव्वदीच्या दशकात झालेल्या आर्थिक धोरणविषयक बदलाचा काही संबंध येथे आहे काय?

अश्विनी : एक गोष्ट खरीच की १९९१ साली आलेल्या नव्या वार्‍यांमुळे "मार्केट वुइल टेक केअर ऑफ एवरीथिंग" अशा प्रकारचे विचार सरकारी पातळीवर पुढे येऊ लागले. या धोरणांमुळे एकंदर आर्थिक घोडदौडही सुरू झालीच. या विकासाच्या कक्षेत सर्वजण येतील आणि यातून अंतिमतः सर्वांचाच विकास होईल अशी धारणा होती. मात्र १९९१ सालच्या आर्थिक धोरणांच्या घोषणेनंतर , २००५ साली रोजगार हमीचा कायदा राष्ट्रीय पातळीवर यावा लागतो याचा अर्थच असा की, या आर्थिक धोरणांचा फायदा हवा तसा तळागाळापर्यंत पोचू शकला नाही. गरीब-श्रीमंतांमधली दरी वाढली. मुक्त बाजारपेठेशी गरीबांना जोडले जाण्याचा रस्ता उपलब्ध नाही असे चित्र निर्माण झाले. या परिस्थितीत गरीबांच्या हातात साधने यावीत म्हणून ही योजना आली असे म्हणावे लागते.

प्रश्नकर्ता : या सगळ्या संदर्भात , तुमचे काम कुठे येते ?

अश्विनी : आम्ही नाशिकच्या परिसरातल्या आदिवासी भाग , इतर ग्रामीण भाग यांना रोहयो आणि इतर गोष्टींची माहिती पुरवतो. वेगवेगळ्या योजना काय, त्यांचा फायदा कसा घेता येईल, यात तुमच्या अडचणी काय, त्यांचे निवारण कसे करता येईल, सरकारी नियम, कागदपत्रे, तक्रारी नोंदवण्याची सोय या सर्वांबद्दलची अद्ययावत माहिती तळागाळातल्या लोकांना पुरवण्याचे काम आम्ही सतत करतो. रोहयो, रेशन वितरणव्यवस्था याचा सतत पाठपुरावा करणार्‍या कार्यकर्त्यांची फळी आता उभी झाली आहे. याचबरोबर महाराष्ट्रातून जेव्हा संघटना बोलावल्या जातात तेव्हा त्यांना प्रशिक्षण देण्याच्या कामात पुस्तिका, पोस्टर्स याद्वारे महत्त्वाचा हातभार आम्ही लावतो. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे या प्रश्नांबाबतचे भान राज्यकर्त्यांना येत राहावे म्हणून वर्तमानपत्र व नियतकालिकांमधे या संदर्भात लिखाण मी करते.

प्रश्नकर्ता : थोडे माहितीच्या अधिकाराबद्दल. २००५ साली अस्तित्वात आलेला हा कायदा तुमच्यासारख्यांना वापरता यावा याबद्दलचे तुमचे "व्हिजन" काय आहे ?

अश्विनी : हा कायदा म्हणजे आम्हाला वरदान आहे. पूर्वी सरकारी कारभारात अमुक अमुक गोष्टी होत नाहीत हे नुसते बोलावे लागायचे. आता हे सर्व जिल्हा-तालुका-गावाच्या पातळीवर आकडेवारीसकट सांगता येणे शक्य झालेले आहे. हा नेमकेपणा आल्यामुळे आमच्या मागण्यासुद्धा नेमक्या झाल्या. ज्या माहितीच्या आधारे सरकारने निर्णय घ्यायला हवेत तीच माहिती आता तुम्हालाही मिळते ! मग या माहितीच्या आधारे आम्हाला वाटाघाटींच्या टेबलावर येण्यासाठी "अ‍ॅम्युनिशन"च मिळालेले आहे असे म्हणा ना !

प्रश्नकर्ता: हम्म. याचा अर्थ इंग्रजीत "लेवलिंग द फिल्ड्स" असे म्हणता येईल. कार्यकर्ते आणि एकंदर प्रशासकीय-राजकीय पातळीमधे पूर्वी जो असमतोल होता तो आता या कायद्यामुळे दूर झाला असे म्हणता येईल.

अश्विनी : अगदी अगदी! सर्वात महत्त्वाचे म्हणजे हा एकमेव कायदा असा आहे की ज्याला दंडात्मक शक्ती आहेत. जो सरकारी कर्मचारी माहिती पुरवत नाही त्याला त्याच्या पगारातून दंड होण्याची तरतूद या कायद्यात आहे आणि असे दंड केले जात आहेत! "तुम्ही जनतेचे सेवक आहात" याची जाणीव करू देणारे अधिकारच जणू आम्हाला मिळालेत. आम्हांला काही त्यांच्याशी वैर करायचे नाही. हे सरकार आपलेच आहे. "तुम्ही आम्ही मिळून सकारात्मक बदल घडवू" असेच आम्हाला यातून म्हणायचे आहे. कितीतरी मोठ्या प्रमाणावरची माहिती आता http://nrega.nic.in/netnrega/home.aspx या वेबसाईटवर आता मिळेल . आता भारतातल्या कुठल्याही गावात कुठलीही योजना आली की त्याची माहिती इथे येते. मग त्या योजनेच्या सर्व बारीकसारीक तपशीलांमधून त्याचा पाठपुरावा कार्यकर्त्याना घेता येतो. पब्लिक डॉमेन मधे सतत येणार्‍या या माहितीचे स्वरूप म्हणजे माहितीच्या अधिकाराचा खरा वापर.

प्रश्नकर्ता : या बाबतीत प्रशासन "फारच लोक एकदम माहिती विचारतात . मग ती कशी पुरवायची ?" अशा तक्रारी करताना ऐकतो.

अश्विनी : हा प्रश्नच अप्रस्तुत आहे. हे असे का होते ? कारण रेकॉर्ड-कीपींग बरोबर नाही. कंप्युटाराजेशन नाही. तुमचा डेटाबेस नीट असेल तर अशा सर्व अडचणी येणारच. त्यावर व्यवस्था अद्ययावत करणे हे खरे उत्तर आहे. माहिती विचारण्यापासून परावृत्त करणे नव्हे!

प्रश्नकर्ता : व्हिसलब्लोअर कायद्याचे विधेयक लवकरच पास होईल. याचा फायदा होईल का ?

अश्विनी : नक्कीच. माहितीचा अधिकार फक्त माहितीच देतो. परंतु एखाद्या गैरव्यवहारासंदर्भातली माहिती जरी हाताशी आली तरी तिचे काय करावे हे हा कायदा सांगत नाही. आता व्हिसलब्लोअर अ‍ॅक्ट नंतर अशा स्वरूपाची अथॉरिटी अस्तित्वात आली तर कार्यकर्त्याना न्यायदानाची पुढची पायरी नक्की गाठता येईल. या करता असणारी अनामिकता व्हिसल ब्लोअर अ‍ॅक्ट देऊ शकेल. सद्यस्थितीत जनहितार्थयाचिका हे साधन फार अपुरे आहे.

प्रश्नकर्ता : आता थोडेसे संवेदनशील भागाबद्दल. तुम्ही तुमच्या लेखात म्हटल्याप्रमाणे , या कायद्याचा वापर करू पाहाणार्‍या व्यक्तींच्या हत्या होत आहेत - अगदी आपल्या महाराष्ट्रात !

अश्विनी : हे प्रकार होत आहेत हे सत्य आहे. हत्या झालेले लोक एक प्रकारे सामाजिक कार्यकर्तेच म्हणायला हवेत. माहितीचा अधिकार वापरून जंगले, खाणी यांसारख्या राष्ट्रीय संपत्तीचा अपहार केल्याची माहिती केवळ मिळवल्यामुळे हे लोक प्राणाला मुकले. यांनी माहितीचा वापर करायच्या आधीच, केवळ या संदर्भात माहिती मिळवली म्हणून. एकाची हत्या हायकोर्टात झाली. पुण्यातल्या एकाची हत्या एका नगरसेवकाचे अपप्रकार उघडकीला आणल्यावर दिवसाढवळ्या.

प्रश्नकर्ता : म्हणजे हे पूर्ण बजबजपुरीचे वातावरण आहे का? या संदर्भात तुम्ही लेख लिहिलात तेव्हा तुम्हाला भीती वाटली का?

अश्विनी : अजून परिस्थिती हाताबाहेर गेलेली नाही. या सर्व हत्यांना नाही म्हटले तरी वैयक्तिक वैमनस्याचा रंग आहे. सरकारी व्यवस्थेतल्या समस्या उघडकीला आणणे आणि अशा गैरव्यवहार करणार्‍या व्यक्तीला उघडे पाडणे, यांच्या हेतू आणि परिणामांमधे फरक आहेच. सरकारी व्यवस्थेतल्या अपप्रकारांना सुधारण्याचे विधायक स्वरूपाचे काम करणार्‍यांना अजून तरी धोका आहे असे दिसत नाही. एकाच व्यक्तीला लक्ष्य करून भारतातला भ्रष्टाचार नष्ट होणे अशक्य आहे. याउलट व्यवस्थेतले दोष दुरुस्त करून केवढे तरी विधायक काम करणे शक्य आहे.

प्रश्नकर्ता : या संदर्भात हौतात्म्य न पत्करण्याबद्दल आणि एकंदर मोठे व्हिजन डोळ्यासमोर ठेवल्याबद्दल मी तुमचे अभिनंदनच करतो ! आता थोडे पुन्हा तुमच्या संस्थेबद्दल. तुमच्या डोळ्यासमोर काही योजना आहेत का?

प्रश्नकर्ता : धन्यवाद. प्रगती अभियानाला यंदा सरकारकडूनच बोलावणे आलेले आहे. आम्ही केलेल्या कामाचेच मॉडेल विस्तृत प्रमाणात कसे वापरता येईल, याबद्दल सरकारकडूनच आम्हांला विचारणा आता होत आहेत ! आमचे रेशनिंग व्यवस्थेबद्दलचे काम उत्तम रीतीने चालू आहे , तेच मोठ्या प्रमाणात करायचे मनात आहे. यंत्रणांमधे मूलभूत बदल करण्याची संधी मिळेल अशी आशा निर्माण झाली आहे. रेशनिंग व्यवस्थेला पर्याय म्हणून "फूड स्टँप्स" किंवा गरीब लोकांकरता अन्नाकरता "क्रेडीट" कार्डसदृश्य व्यवस्था असे काही सुचवण्याचे चाललेले आहे. एकंदर सगळा प्रवास "गुड गव्हर्नन्स" कडे आहे. असे कार्यक्रम राबवत राहाणे हेच ईप्सित आहे.

प्रश्नकर्ता : मदत मिळवण्याकरता ८०-जी आणि परदेशातून मदतीच्या दृष्टीने तुम्ही पावले उचलली आहेत काय ?

अश्विनी : ही दोन्ही रस्जिस्ट्रेशन्स झालेली आहेत. आम्हाला कुठलीही सरकारी मदत मिळत नाही. मात्र सरकारी विकासकामांकरता, सरकारबरोबर काम करणे चालू आहे. याचीच पुढची पायरी म्हणून सरकारची योजना आम्हालाच राबवण्याची संधी मिळाली आहे. महाराष्ट्रात काम करणार्‍या लोकांची, कामाची बिलकुल उणीव नाही. अजूनही वेगवेगळ्या कार्यकर्त्यांचे मोहोळ अस्तित्वात आहे. विधिमंडळाच्या बाहेरचे घटकच आता सरकारला जाब मागत आहेत.

प्रश्नकर्ता: तुमच्या व्यग्र दिवसातून वेळ दिल्याबद्दल अनेक आभार. तुमच्या माहितीइतकीच तुम्ही आम्हांसारख्यांना दिलेली प्रेरणा आम्हांला महत्त्वाची आहे.

Monday, June 21, 2010

"आत्मा ते जनुक"

मराठी भाषेच्या एकंदर स्थितीचा विचार करताना ज्ञानाच्या निरनिराळ्या शाखांमधला गहन आशय सोप्या भाषेत परंतु विषयाची यथायोग्य ओळख करून देणार्‍या पुस्तकांच्या अभावाचा उल्लेख येतो. इंग्रजीच्या तुलनेमधे या गोष्टीमधे नक्की तथ्य आहे; परंतु त्याचवेळी जे काम चालले आहे त्याचा वेधसुद्धा घेणे महत्त्वाचेच.

मराठीमधे अर्थातच अशा प्रकारचे लिखाण होत असते. थोडा शोध घेतला तर आपल्याला जाणवते की अशा प्रकारच्या लिखाणाला आता मराठीमधे बाजारपेठही चांगली आहे. विविध प्रदर्शनांमधे, पुस्तकांच्या दुकानांमधे अशा पुस्तकांना ग्राहकवर्ग मिळताना दिसतो.

आज या प्रकारच्याच एका पुस्तकाची ओळख करून द्यावी म्हणतो.

आज ज्याला आधुनिक वैद्यक मानले जाते त्याचा ज्ञात इतिहास सुमारे अडीच हजार वर्षांचा आहे. विविध संस्कृतींमधे वेगवेगळ्या टप्प्यांमधे कायकाय नि कसकशी प्रगती झाली, त्यात महत्त्वाचे टप्पे काय होते, ज्ञानाची प्रगती कसकशी झाली , त्यात काय अडथळे आले, हा सगळा अर्थातच एका नव्हे तर अनेक खंडांच्या आवाक्यात आरामात बसेल इतका गहन आणि विस्तृत असा विषय आहे. विविध भाषांमधे अनेक ज्ञानकोष या विषयाला वाहिलेत.

डॉ. चंद्रकांत वागळे यांनी लिहिलेल्या "आत्मा ते जनुक" या पुस्तकाचा विषय ढोबळ मानाने हाच आहे. अनेक शतकांच्या इतिहासातले महत्त्वाचे टप्पे थोडक्यात दाखवल्यामुळे , या छोट्याशा पुस्तकाला एका नकाशाचे स्वरूप आलेले आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे , ज्ञानाच्या या ब्रह्मांडाचे दर्शन या पुस्तकरूपी पिंडात करताना, त्यांनी एक महत्त्वाचे सूत्र राखलेले आहे. आणि सगळा प्रवास या सूत्राने होतो. कोणते बरे हे सूत्र ?

मानवजातीच्या प्रगतीचा वेध घेताना सामान्यतः असे मानले जाते की, माणसाला निसर्गातल्या गोष्टींचे कुतुहल होते. ज्ञानविज्ञानाच्या प्रगतीमागे या कुतुहलाचा मोठा भाग होता आणि आहे. निसर्गातल्या घटनांमागची मीमांसा जोवर करणे शक्य नव्हते, त्यामागची कारणे जोवर अज्ञात होती तोवर त्याना परमेश्वराचे स्वरूप देण्यात आले. सजीवत्व हा देखील या कुतुहलाचाच विषय होता. या सजीवत्वाच्या, चेतनेच्याबद्दलच्या चिंतनातूनच "आत्मा" ही संकल्पना अस्तित्वात आली. विसाव्या शतकात जनुकांचा शोध लागेपर्यंत, सजीवत्त्वाचा शोध चालूच होता, मात्र त्याला स्वरूप होते तत्वज्ञानविषयक संकल्पनांचे. जनुकांच्या शोधाने सचेतनत्वाचे कोडे उलगडले आणि काही विशिष्ट परिस्थितीत काही प्रोटीन्स आणि न्युक्लिक अ‍ॅसिड्स या दोन अचेतन रासायनिक द्रव्यांमधून सचेतन जीवसृष्टीची निर्मिती होऊ शकते हे सिद्ध झाले. म्हणजे जडतत्वापासूनच सजीवत्व निर्माण होते हे पुराव्याच्या आधारे सिद्ध झाले. शतकानुशतके विचारांची घुसळण चालू असलेल्या एका अतिशय अ‍ॅबस्ट्रॅक्ट संकल्पनेचे रूपांतर काँक्रीट स्वरूपी सिद्धतेपर्यंत कसा झाला याचा हे पुस्तक वेध घेते.

विषयाची व्याप्ती घेता , पुस्तक २०० पानी म्हणजे अगदीच टीचभर मानायला हवे. मात्र लेखकाने केलेला सम्यक अभ्यास, हे पुस्तक सादर करत असताना नेमके काय मांडायचे आहे याचे त्याने ठेवलेले भान , आणि महत्त्वाच्या टप्प्यांबद्दल , निर्णायक शोधांबद्दल दिलेली नेमकी माहिती या मुळे या प्रदीर्घ प्रवासाच्या नकाशाने आपले काम अचूक बजावलेले आहे.

हिप्पोक्रीटसच्या शपथेपासून जो प्रवास सुरू होतो तो वेसालिअसच्या पहिल्यावहिल्या शरीरशास्त्रीय अभ्यासाला , दुसर्‍या शतकात गॅलेनने मांडलेल्या रक्ताभिसरणाच्या संकल्पनेला गवसणी घालतो. आणि इथे सगळ्यात आश्चर्यकारक भाग येतो. तिसर्‍या शतकात गॅलनने जी थिअरी मांडली त्यात "शरीरात रक्त वहाते" इतकाच भाग बरोबर होता. बाकी सगळे अंदाजपंचे असल्याने चुकीचेच होते. गॅलनच्या या थिअरीला उलथून लावण्याकरता १६वे शतक उजाडावे लागले ! १६ ते १९वे शतक केवळ अ‍ॅनाटॉमीचा अभ्यास चालू होता. या सगळ्यादरम्यान शवविच्छेदनावरील बंदीमुळे अनेक शतके अंधारातच गेली. त्यानंतर मात्र पाश्चात्य जगतात प्रयोग-नीरीक्षणे-संशोधन- सिद्धांत मांडणी या प्रक्रियेला वेग येत गेला. विल्यम हार्वे, मॉरग्ननी यांनी रक्ताभिसरणाचे रहस्य उलगडले. फर्को नावाच्या जर्मन संशोधकाने पेशीचा सिद्धांत मांडला. सूक्ष्मदर्शक यंत्रे जन्माला आली. लुई पाश्चर ने सूक्ष्मजीवांचे अस्तित्व सप्र्योग सिद्ध केले , रेबीज वरची लस शोधून काढली. क्षयजंतूंवर संशोधन झाले. लिस्टरने निर्जंतुकीकरण शोधल्याने शस्त्रक्रिया विकसित व्हायला महत्त्वाचे वळण मिळाले स्टेथोस्कोप अस्तित्त्वात आले. हे सर्व होता होता वेदनाहरण करणार्‍या क्लोरोफॉर्मचा, पहिल्या इसीजीचा शोध लागला. भौतिकशास्त्रज्ञानी क्ष किरणाअंसारख्या गोष्टींचा शोध लावला. आणि पेनिसिलीन आणि अन्य अँटीबायोटीक्सचे युग अवतरायला , विसावे शतकही उजाडले. फ्रॉईड बाबाने मनोविकारशास्त्रात क्रांती घडवून आणली. मेंडेलसारख्या संशोधकांमुळे आनुवांशिकतेचे रहस्य उलगडण्याला सुरवात झाली आणि जनुकांचे युग अवतरले. विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात , डीएने सारख्या संकल्पनांचे अस्तित्त्व सिद्ध झाले आणि ह्युमन जीनोम पर्यंत जेनेटीक एंजिनियरींग येऊन पोचले.

हे सगळे संक्षिप्त आहे, अगदी थोडक्यात आहे, परंतु अत्यंत रोचक रीतीने मांडलेले आहे. अक्षंड परिश्रम, प्रयोग, संशोधनाला आयुष्याचे मिशन बनवून केलेले काम या सार्‍यामुळे आपल्या सर्वांचे जीवनमान वाढायला , आपले आयुष्य वेदनारहित करायला , सुखकर बनवायला कसकशी क्रमाक्रमाने प्रगती झाली हे सारे उत्तम रीतीने मांडलेले आहेच. पण त्याचबरोबर केवळ मनन-चिंतनाच्या पातळीवर असलेल्या सचेतनत्वाच्या संकल्पनेचा प्रवास तत्वज्ञानाचय ग्रंथांमधून , धर्मग्रंथांच्या नि धर्मपीठांच्या कचाट्यातून , प्रयोगशाळॅपर्यंत आणि संशोधनसिद्ध काँक्रिट पुराव्यांपर्यंत कसा झाला हे अतिशय उद्बोधक आहे.

हे पुस्तक सर्वव्यापी नाही, सगळे आवाक्यात घेणारे नाही. त्याचा तसा दावाही नाही. मात्र हा एक उत्तम आरंभबिंदू आहे.

शीर्षक : आत्मा ते जनुक
लेखक : डॉ. चंद्रकांत वागळे.
प्रकाशन : पॉप्युलर
पृष्ठे : २२०.
किंमत : रु २१०

Saturday, April 10, 2010

"दुष्काळ आवडे सगळ्यांना"

".. या पुस्तकातली माणसं म्हणजे भारतीय समाजाच्या एका भल्या मोठ्या हिश्शाचे प्रतिनिधी आहेत. त्यांच्या जीवनावर हुकूमत गाजवणार्‍या लोकसंख्येतलं प्रमाण फक्त १० टक्के आहेत. पण त्यांच्यापेक्षा कितीतरी विशाल अशा या समाजघटकापर्यंत उच्चभ्रूंच्या दृष्टीचा पल्ला पोचत नाही. आणि त्या समाजाशी संबंध तुटलेल्या वृत्तपत्रांची, माध्यमाची झेपही तिथपर्यंत जात नाही."

हे शब्द आहेत आंतरराष्ट्रीय ख्यातीचे भारतीय पत्रकार, २००७ च्या मॅगसेसे पुरस्काराचे विजेते पी.साईनाथ यांचे. "Everybody loves a good drought" या त्यांच्या पुस्तकाच्या मराठी अनुवादातून वरचा उतारा घेतलेला आहे.

जवाहरलाल नेहरू विद्यापीठातून इतिहास विषयात एम.ए. ही पदवी मिळवल्यानंतर ते १९८० साली युनायटेड न्युज ऑफ इंडीया या वृत्तसंस्थेत वार्ताहर म्हणून रुजू झाले. पुढे "द डेली" या दैनिकात आंतरराष्ट्रीय घडामोडींचे संपादक आणि "द ब्लिट्झ" या साप्ताहिकात उपमुख्य संपादक म्हणून त्यांनी काम पाहिले. १९९३ साली त्यांना भारताच्या ग्रामीण भागातल्या दारिद्र्याचा अभ्यास करण्यासाठी "टाइम्स ऑफ इंडिया"ची शिष्यवृत्ती मिळाली. त्यांनी केलेले हे संशोधन जगभर नावाजले गेले. त्या संशोधनातून जन्माला आलेला रिपोर्ट म्हणजे हे पुस्तक.

गरीबी आणि विवंचना यांची वर्णने बहुदा घटनेच्या रूपात आपल्यासमोर येतात. म्हणजे एखादी आपत्ती कोसळते , लोक मृत्यू पावतात, तेव्हा. पण गरीबी म्हणजे केवळा भूकबळी किंवा दुष्काळजन्य परिस्थिती नव्हे. अनेक घटनांच्या एकत्रित परिणामातून गरीबी जन्माला येते. त्यात प्रदेश, समाज , संस्कृती यांमधल्या भिन्नतेतून घटकांचं वजन कमी जास्त होतं. पण गाभ्याशी ठराविक घटकच असतात. त्यात उत्पन्न, पोषणद्रव्यं यांचबरोबर , जमीन, आरोग्य, शिक्षण, साक्षरता , बालमृत्यूचं प्रमाण आणि अपेक्षित आयुर्मान यांचाही समावेश होतो.

गरीबीकडे एक घटना न पाहता प्रक्रिया म्हणून बघणं हे या पुस्तकांचं सर्वात मोठं वैशिष्ट्य. म्हणूनच हे पुस्तक वाचणं हा एक दाहक अनुभव ठरतो.घटना घडून जाते, इतर घटनांच्या मागे दडून जाते. प्रक्रिया सततची असते. ती आहे, हे एकदा मान्य झालं की तिची दखल घेणं हे आवश्यकच ठरतं. गरीबीकडे घटना म्हणून बघताना नेमकं हेच आपण आपल्या नकळत टाळत असतो. प्रस्तुत पुस्तकासारखे दस्तावेज नेमके हेच साधतात.

साईनाथ म्हणतात , "गरीबीची व्याख्या, दारिद्र्यरेषा, गरीबीच्या प्रमाणाची वेगवेगळया संदर्भांमधली आकडेवारी या सर्व गोष्टींचे महत्त्व मला मान्य होतेच ; परंतु मला आकड्यांवर नव्हे तर माणासांवर प्रकाश टाकायचा होता. यांचा एकमेकांशी संबंध नाही असे मला बिलकुल म्हणायचे नाही."

भारतातल्या गरीबांपैकी ४० टक्के भूमीहीन शेतमजूर आहेत. ४५ टक्के अल्पभूधारी शेतकरी आहेत. ७.५ टक्के ग्रामीण कारागीर. बाकीचे "इतर" वर्गातले. साईनाथांचा अभ्यास पहिल्या दोन वर्गांचा आहे.

पुस्तकातल्या विभागांची शीर्षके मोठी मार्मिक आहेत. एकेका विभागामधे एकेका वर्गाची उदाहरणे आहेत. प्रत्येक उदाहरणामधून दिसते अनास्था, धोरणांचा ढिसाळपणा, अंमलबजावणीचा अभाव , आरोग्य सेवेच्या नावाने चालवली गेलेली चेष्टा , हिवतापासारख्या रोगांमधे सतत होत असलेली वाढ, शिक्षणाच्या निधीचे गायब होणे. एक आख्खा विभाग आहे "विकास प्रकल्पांच्या" बळींचे. राहत्या घरातून , कसत्या जमिनीतून उचकटले गेलेल्यांचा लेखाजोखा. जंगलांची, पाना-वृक्षांच्या नाशाचे एकेक अध्याय. जर का भ्रष्ट , हावरट यंत्रणेकडून काही शिल्लक राहिलेले असेल तर उरलेल्यातून जी अंमलबजावणी होते त्यामधे निर्बुद्धपणा नि अनास्था यांचे भीषण मिश्रण आढळते. या अशा अंमलबजावणीतून गुराढोरांच्या जातीप्रजातीपासून, जंगलांपर्यंतचा नष्टांश आणि नको असलेल्या रस्त्यांपासून भलत्याच ठिकाणी कुपोषिताना दिल्या गेलेल्या सायकलींपर्यंतच्या कहाण्या.

कल्याणकारी योजना म्हणजे तर पळवाटीचे डावपेचच. जनतेला जेव्हा जमीनसुधारणा देता येत नाही तेव्हा संकरित गायी दिल्या जातात (ज्यांच्या प्रजाती लवकरच मरतात) शिक्षणाकरता शाळा देता येत नाहीत तेव्हा "पठडीबाहेरच्या" शिक्षणाचे प्रयोग केले जातात.

लक्षांत घ्या. हे सर्व किस्से नव्हेत. कथा नव्हेत. एका माणसाने दुर्गम भागांमधे जाऊन, प्रत्यक्ष लोकांना भेटून, त्याकरता सुमारे १ लाख किलोमिटरचा प्रवास चार वर्षे करून हा अहवाल बनवलेला आहे.

पुस्तकाच्या शेवटचा उपसंहार डोळ्यांमधे झणझणीत अंजन घालणारा आहे. "पंधरा टक्क्यांनी मिळून केलेली पंचाऐंशी टक्केवाल्यांची फसवणूक" इतक्या परिणामकारकरीत्या क्वचित मांडली गेली असेल. हे सर्व लिहिताना साईनाथ कुठे भडक होत नाहीत. जे सांगायचे आहे त्याकरता छद्माचा आधार त्याना घ्यावा लागत नाही. जे आहे ते समोर आहे. प्रत्यक्ष उदाहरणे आहेत. दाखले आहेत. निव्वळ आकडेवारी नव्हे.

एका माणसाने एकहाती केलेले हे काम छाती दडपून टाकणारे. आज साईनाथ यांची प्रतिमा म्हणजे, भारतातल्या विवेकाचा आवाज अशी आहे. आंतरराष्ट्रीय प्रकाशनांमधे आणि परीषदांमधे त्यांना आमंत्रण असते , लिखाण चालू असते.

अशा या दस्तावेजाला मराठीमधे आणल्याबद्दल आपण हेमंत कर्णिकांचे ऋणी असायला हवे.

"दुष्काळ आवडे सर्वांना"
मूळ लेखक : पी. साईनाथ.
अनुवाद : हेमंत कर्णिक
अक्षर प्रकाशन
किंमत ३००/- रुपये.

पी साईनाथ विकी : http://en.wikipedia.org/wiki/Palagummi_Sainath

Monday, June 1, 2009

"दसविदानिया"

डिस्क्लेमर : पुढील काही परिच्छेदांत , चित्रपटाच्या कथानकादि घटकांबद्द्ल माहिती आहे. ज्यांना त्याबद्दल वाचायचे टाळायचे असेल त्यांनी वाचू नये.

तर , चित्रपटाच्या ह्या गमतीशीर नावामागे आहे "दो स्विदानिया" या , रशियन वाक्प्रचारावरील श्लेष. "दो स्विदानिया" म्हणजे भेटीअंती निरोप घ्यायचे शब्द :" गुड् बाय्" या अर्थी. "कॅन्सरने अकाली मरू घातलेल्या एका पस्तीशीच्या अविवाहित माणसाने , आपल्या शेवटच्या दिवसांत बनवलेली कामांची यादी आणि त्या कामांची पूर्तता" अशा एका ढोबळ कथासूत्रात चित्रपटाचे सार सामावते.

अर्थातच , विनय पाठक या नटाने केलेली "अमर कौल" ही या सिनेमातली मध्यवर्ती भूमिका. या नटाबद्दल , त्याने केलेल्या आधीच्या कामांमुळे विलक्षण कुतूहल आणि आदर वाटत् होताच. माझ्यापुरते म्हणायचे तर या चित्रपटाकरता , त्याने आपले सर्व कौशल्य म्हणा , अभिनयाची जाण म्हणा , एकूण जगण्याबद्दलचे भान म्हणा या सर्वांतील उत्कृष्ट म्हणता येईल ते पणास लावले , या भूमिकेचे सोने केले असे मी म्हणेन.

मृत्यूविषयक चिंतन , "मरणात खरोखर जग जगते" , "मृत्यूस कोणी हासे , मृत्यूत कोणी हासे" वगैरे वगैरे वचने या सर्व गोष्टी खरे तर नवीन नाहीत. खुद्द हिंदी चित्रपटांत सुद्धा , मृत्यूविषयक चित्रपट कमी नाहीत. दिलीप कुमार पासून शारुख खान पर्यंत , ऐन तारुण्यात मरणारे नायक आपण पाहिलेत. "आनंद" सारख्या चित्रपटावर कुसुमाग्रजांसारख्या मातबर कवीला एक चिंतनगर्भ नाटक लिहावेसे वाटले. "दसविदानिया" या परंपरेतला असेही एका अर्थाने म्हणता येईल.

मात्र , यातला नायक , कुठल्याही उत्तुंग शोकांकितेत शोभावा असा नाही. त्याच्याकडे ट्रॅजेडी किंगचा रुबाब नाही , सत्तरीमधल्या सुपरस्टारचा करिष्मा नाही , शारुख खान सारखा शेकडो कोटींचा वायदा हा चित्रपट स्वप्नात करत नाही. नायकाचे दिसणे , त्याचे कर्तृत्व , मृत्युची सावली पडायच्या आधीचा त्याचा जीवनविषयक दृष्टीकोन , इतरांना त्याच्याविषयी - इतरांनाच काय , त्याला स्वतःलासुद्धा - त्याच्याविषयी फार आदर , प्रेम , दरारा असे काहीच वाटत नाही. मात्र , मर्ढेकरांच्या कवितेतली "तू एक मुंगी , मी एक मुंगी" मृत्यूच्या छायेत वावरताना , अचानक संपत आलेल्या जीवनरसाच्या शेवटच्या थेंबाना पीताना , मुक्ताबाईच्या "मुंगी उडाली आकाशी" शी , क्षणैक का होईना , पण नाते सांगून जाते.

स्वतःला जपून असलेला हा माणूस शेवटच्या दिवसांमधे गिटार शिकतो , मोटार घेतो , नोकरीला लाथ मारतो (आणि नोकरीला लाथ मारताना संवेदनाहीन बॉसलाही) हेसगळे तर ठीकच. पण त्याचबरोबर महत्त्वाचे म्हणजे , अशा अनेक गोष्टी करतो , ज्या एरवी स्वभावजन्य भीड , "इन्फेरियॉरिटी कॉम्प्लेक्स्"मुळे त्याने केल्या नसत्या. उदाहरणार्थ , जिच्यावर बालपणापासून प्रेम केले, त्या , आता एका मुलीची आई झालेल्या आपल्या मैत्रीणीला तो सांगतो की , "तुझे आताचे आयुष्य दृष्ट लागण्यासारखे सुंदर आहे खरे ; पण मी मात्र तुझ्यावर प्रेम केले - अगदी लहानपणापासून." आणि एखादी लढाई जिंकल्याच्या आनंदात पावसात निघून जातो. आपल्या एकेकाळच्या जीवलग मित्राला १२ वर्षांनी भेटण्याकरता रशियाला त्याच्या आलिशान घरी जातो . त्याच्या बायकोला वाटते , हा फुकट ट्रीटमेंट मागायला आलाय. तर तो कुणावरही न चिडता शांतपणे त्या घराबाहेर पडतो . नंतर आपल्या त्याच मित्राला अगदी शांतपणे सांगतो : "तुला भेटायचे होते , ते भेटलो. याहून काही नको होते. तुझ्या बायकोला भेटण्याइतका आता वेळ नाही , तिलाही माझा नमस्कार सांग"

माझ्या दृष्टीने , जर या चित्रपटाचे काही यश असेल तर , ते हेच की , अरे , लिस्टा बनवायच्या तर "गीझर दुरुस्त करायचाय्" , "ऑफिसात अमुक रिपोर्ट् अमुक तारखेपावेतो द्यायचाच आहे" असल्या गोष्टींचाच नका करू फक्त. हेच करत रहायचे असेल तर मग आणखी ४ महिने जगलो काय आणि ४० वर्षे जगलो काय , काय फरक पडतो ? "या जन्मावर , या जगण्यावर शतदा प्रेम करावे" या ओळी ऐकून ऐकून जर सवयीच्या होत असतील आणि आपण काडेचिराईताचे आयुष्य सोडणार नसू , तर काय उपयोग आहे या ओळींचा ?

हे झाले चित्रपटाच्या अस्तिपक्षी. काही गोष्टी टाळता आल्या असत्या. मुद्दाम रडू आणण्याचा प्रयत्न केलेले ("टीअर जर्कींग्") काही प्रसंग , रशियात , मित्राच्या घराबाहेर पडल्यावर एका वेश्येबरोबर घालवलेला काळ , तिने त्याला निराशेपोटी करत असलेल्या आत्महत्येपासून परावृत्त करणे इ. इ. भाग अतिरंजित वाटू शकतो. मात्र एकूण पटकथेचे हलकेफुलके , सहज स्वरूप , पाठकसकट सगळ्यांनी केलेला अभिनय , मृत्युविषयक भाष्याला कठोपनिषद-सदृष् अतिगंभीर , किंवा सामुदायिक हंबरडेवजा स्वरूप देण्याचे टाळून , त्यातल्या विसंगतींना नर्म विनोदाच्या शिडकाव्याने रंगविणे यामुळे , एकूण सकारात्मक बाबींचे पारडे माझ्या हिशेबाने जड ठरले.

Sunday, April 19, 2009

"लक बाय चान्स"

हा चित्रपट येऊन काही महिने उलटले तरी पहाण्याचा योग कालपर्यंत आला नव्हता. अनेक चित्रपट पाहिले जातात पण थोडेसेच लिहिण्यासारखे असतात. "लक बाय चान्स" हा त्यापैकी एक.

डिस्क्लेमर : पुढील काही परिच्छेदांत , चित्रपटाच्या कथानकादि घटकांबद्द्ल माहिती आहे. ज्यांना त्याबद्दल वाचायचे टाळायचे असेल त्यांनी वाचू नये.

हा चित्रपट एका होतकरू , चित्रपट-नायक बनू पहाणार्‍या तरुणाच्या - "स्ट्रगल"च्या दिवसांची कहाणी रेखाटतो. एका बिनचेहर्‍याच्या , बिननावाच्या अस्तित्त्वापासून पदार्पणाच्या यशापर्यंत त्याचा प्रवास कसा घडतो आणि या प्रवासादरम्यान त्याचे त्याच्या आजूबाजूच्या लोकांशी नाते कसे घडते ? हे झाले स्थूलमानाने कथानक. या सगळ्या नात्यांमधे त्याचे सगळ्यात महत्त्वाचे नाते (अर्थातच) त्याचे प्रेमपात्र असलेल्या , जवळजवळ त्याच्याइतक्याच नवी असलेल्या मुलीबरोबरचे. चित्रपटात असे वळण येते की चित्रपट या नायकाचा म्हणून सुरू तर होतो ; पण त्याच्या या प्रेयसीचा बघता बघता होऊन जातो .... मला वाटते , कथानक याच्यापेक्षा सांगणे अयोग्य होईल.

कथानक पूर्ण

चित्रपटाची संकल्पना आणि दिग्दर्शन आहे झोया अख्तरचे. झोया म्हणजे जावेदसाबांची मुलगी आणि फरहानची बहीण. सिनेमाचा नायक आहे फरहान आणि नायिका आहे कोंकोणा सेन.
झोयाबाईना हा चित्रपट सुचला सुमारे ७ वर्षांपूर्वी. या संकल्पनेला प्रत्यक्षात यायला इतकी वर्षे गेली. दरम्यानच्या काळात नायक-नायिका बदलत गेल्या. शेवटी फरहान-कोंकोणा यांनी हा चित्रपट केला.

तर अशा या चित्रपटाबद्दल मुद्दामहून लिहावे असे काय ? तर अर्थातच , चित्रपटाची , कथानकाची हाताळणी.

सर्वप्रथम सांगायचे तर हा चित्रपट पहाणे हा अतिशय आनंददायक अनुभव बनला , याचे कारण , चित्रपटाच्या टायटल्स पासून शेवटच्या प्रसंगा-फ्रेम पर्यंत जपलेली अर्थपूर्णता. (सटल्टी ला योग्य मराठी शब्द काय ?) हिंदी चित्रपट बर्‍याचदा गाळून गाळून पहावा लागतो. अर्थहीन तण कापत कापत. इथे म्हणजे प्रत्येक प्रसंग आस्वाद घ्यावा असा.

या चित्रपटाचा एक अतिशय महत्त्वाचा पैलू म्हणजे हिंदी चित्रपटसृष्टीबद्दल केलेली ही एक टिप्पणी आहे. आणि ही टिप्पणी आहे अर्थातच , नर्मविनोदी. इथल्या माणसांमधल्या , त्यांच्या व्यवहारांमधल्या विसंगती, स्पर्धा, स्वार्थ , असूया , खोटेपणा , यशापयश, नातेसंबंध, त्या संबंधांमधला तात्पुरतेपणा इ. इ. बद्दलची टिप्पणी. आणि यात कुठेही , भडक, बटबटीतपणाचा स्पर्श नाही. म्हणजे , प्रसंगी माणसे बटबटीत वागतात, ढोंगीपणा दाखवतात ; पण त्याचे चित्रण मात्र अगदी अलगदपणे केलेले आहे. किंवा एरवी ढोंगी , बटबटीत वागणार्‍या कुणाचे ठसठसते दु:ख कधीकधी व्यक्त होते. या चित्रपटाचा मला सगळ्यात आवडलेला पैलू म्हणजे , ही नजाकत. अशा छोट्या छोट्या क्षणांना शब्दबंबाळपणा किंवा आचरटपणा यांचा शाप नाही.

चित्रपटात उपरोक्त सर्वात महत्त्वाच्या दोन पात्रांशिवाय अक्षरशः डझनावारी पात्रे आहेत. ऋषि कपूर, डिंपल , जुही चावला , संजय कपूर , हृतिक रोशन आणि नवतारका इशा श्रावणी यांच्या भूमिका या दोघांच्या खालोखाल महत्त्वाच्या. यांच्या व्यतिरिक्त शाहरुखखान पासून आमीर खान पर्यंत आणि करीनाकपूर पासून बोमन इराणी पर्यंत अनेकानेक लोकांची एकेका प्रसंगापुरती हजेरी आहे. या सार्‍यांना "ओम शांति ओम" सारखे , एकाच लांबच लांब गाण्यात गुंफण्यापुरते आणलेले नाही , तर या सर्वांच्या प्रसंगांना चित्रपटाच्या "थीम" च्या संदर्भात अर्थपूर्ण स्थान आहे. या मोठ्या मोठ्या स्टार्स च्या "कॅमीओज" इतकेच महत्त्वाचे आहेत अनेक इतर , अनोळखी सहकलाकारांचे छोटे छोटे प्रसंग. मग ती एखादी नायिकेची मैत्रीण असो , नायकाचे मित्र असोत , कुणाचे पी ए असोत , एखादी नृत्यदिग्दर्शिका असो ... कोणाच्याही छोट्याशा संवादामधे आनंद घेण्यासारखे , काहीतरी नर्मविनोदी किंवा अर्थपूर्ण असे काहीतरी आहेच. सगळ्यांना आपल्या मिळालेल्या तुकड्याचे चीज करायला मिळाले आहे. संजय कपूर , ऋषि कपूर यांना माझ्या मनात फार मोठे अभिनेते म्हणून स्थान नव्हते. मात्र या चित्रपटात त्यांना मिळालेल्या महत्त्वाच्या भूमिकेत ते फिट्ट बसतात , त्यांना मिळालेले प्रसंग खरोखरच एंजॉय करण्यासारखे.

अर्थात , उपरोल्लेखित वास्तववादी चित्रण , किंवा अर्थपूर्ण हाताळणी हाच काही या चित्रपटाचा एकमेव मानबिंदू नव्हे. किंबहुना , त्याच्याइतकेच महत्त्वाचे आहेत काही असे चर्चिलेले मुद्दे जे कथानकाच्या ओघाने येत रहातात. हे मुद्दे जुने आहेत - जसे , "तकदीर की तदबीर ?" म्हणजेच , "नशीब की कर्तृत्व ?" किंवा " फेट् की चॉइस?" . मात्र चित्रपटात चितारलेल्या एकूण अनिश्चिततेच्या , उमेदवारीच्या , जीवघेण्या स्पर्धेच्या चित्रणात , एकूण कथानकात हे प्रश्न अलगदपणे गोवले जातात . म्हणूनच अर्थपूर्ण वाटतात.

जवळजवळ सगळा चित्रपट नायकाच्या पर्स्पेक्टीव्हने मांडला जातो. मात्र शेवटच्या प्रसंगात नायिकेचा नि नायकाचा जो संवाद होतो तो प्रसंग सोन्याचा. त्या एका प्रसंगाने नायिकेच्या पात्राला एका निराळ्य प्रतलावर नेऊन ठेवतो - आणि चित्रपटाच्या एकंदर परिणामालाही.

कोंकोणा सेन आणि फरहान अख्तर दोघांचीही कामे उत्तम यात वेगळे सांगायला नको. मात्र शेवटी काहीही झाले तरी हा चित्रपट झोया अख्तरचा आहे. चित्रपटाच्या संकल्पनेपासून एकेका फ्रेमवर तिचे गोंदण उमटलेले आहे. आणि एकेक पैलू निरखून पारखून घेतलेला.

इतके सगळे गुणगान गाइल्यावर अर्थातच काही न आवडलेले रहातेच. काही बाबींवर अगदी काहीच इलाज नाही. उदा. फरहान अख्तरचा आवाज. या नटाचा पडद्यावरचा वावर एकदम जबर. पण तो बोलायला लागतो आणि अर्रर्रर्रर्र.... आपण हुकतो एकदम. एखाद दोन गाणी टाळली असती तर बरे झाले असते. त्या गाण्यांच्या चालींमधेही फार काही लक्षात ठेवण्यासारखे नाही. आणि माझे चुकत नसेल तर कोंकोणाताई अंमळ "खात्या-पित्या घरच्या" दिसतात. ( यात काही चूक आहे असे नाही ; पण मला व्यक्तिशः थोडे खटकले खरे. )

असो. हा चित्रपट मला आवडला. तुम्हाला आवडेल याची शाश्वती नाही. पण कुणी पाहिला असल्यास त्यांच्या मताशी ताडून पहायला नक्की आवडेल.