Monday, March 18, 2019

जेन ऑस्टीन वाचण्याच्या निमित्ताने...

आयुष्यात काही गोष्टी वेळच्या वेळी होण्याला थोडा अर्थ आहे. खरं तर या विधानात तसं काही महत्त्वाचं असं नाहीच. कुठल्याही गोष्टीची एकच एक वेळ असते आणि ती तेव्हाच व्हावी वगैरे ठोकताळे विनोदीच. पण जरा पोक्तपणा आणायचा प्रयत्न म्हणून असं काहीतरी म्हणायचं, इतकंच काय ते.

पुस्तकांच्या वाचनाच्या बाबत या गोष्टीला थोडा गंमतीशीर अर्थ आहे. बदलत्या वयानुसार बदलत जाणार्‍या आवडीनिवडी, त्या त्या वयात महत्त्वाच्या-बिनमहत्त्वाच्या वाटणार्‍या गोष्टींचं वाचन यांमधली गंमत आता त्रयस्थपणे बघता येते.

मराठी माध्यमाच्या शाळेत शिकलो त्यामुळे "अंतरिक्ष फिरलो, पण..." अजून मराठी पुस्तकांची गोडी टिकून आहे खरी. ("अंतरिक्ष फिरलो, पण" या शब्दांचा शब्दशः अर्थ - अर्थातच - घेऊ नये. ती एका काव्यपंक्ती आहे इतकंच :-) ) मराठी पुस्तकांचं वाचन जे शाळा कॉलेजच्या दिवसांपासून सुरू झालं त्यात काही खंड पडला नाही. सुनीताबाई देशपांडेंनी आपल्या पुस्तकाच्या अर्पणपत्रिकेत म्हण्टलं होतं की "कवितांना ... ज्यांनी आयुष्यभर साथ केली." आता कवितांबद्दलच्या प्रेमाबद्दल आणि त्यांच्या आकलनाबद्दल आमच्यासारखे लोक सुनीताबाईंच्या पासंगापाशी पोचणार नाहीत. पण मराठी पुस्तकांच्या बाबत मात्र "त्यांनी आपली आयुष्यभर साथ केली" इतपत म्हणता येईल.

त्यामुळे मराठीपुरता विचार करायचा तर पुस्तकं, लेखक कळत्या वयात भेटले. काहींशी मनातल्या मनात कायमची जवळीक झाली. काही उपरे राहिले. काही जण काही काळानंतर फार जवळचे वाटेना झाले. काही दुर्मिळ बनले. वय वाढलं तसतसे नवे भेटत गेले. एकंदर हा सगळा वाढता वसा. "हे सरता संपत नाही चांदणे तुझ्या स्मरणाचे" का काय म्हणतात ते. अजूनही मराठीतली कितीतरी महत्त्वाची, मोठी, मैलाचा दगड असलेली, वेगवेगळ्या संदर्भातली उत्तम पुस्तकं वाचून व्हायची आहेत पण ती कधीतरी होतील अशी अंधुक आशा आहे. हा रस्ता आपल्या परिचयाचा आहे, आपलाच आहे, त्यावर डोळे झाकूनही चालता येईल अशी काहीतरी भावना आहे.

इंग्रजी भाषेशी नातं कुतुहलाचं, आदराचं, (अभ्यासाच्या पुस्तकांच्या बाबत गरजेचं!), पण एकंदरीत काठावरचं. मायमराठीच्या नदीत मनसोक्त डुंबण्यासारखं म्हणता येणं कठीण. कारण कुठलंही इंग्रजी पुस्तक - मग ते कितीही रंजक, उद्बोधक, रसाळ, मती गुंगवणारं, थरारक, बुद्धीमान असं काहीही असलं तरी ते शेवटी उपरंच म्हणून हाती येतं. अगदी अजूनही. आता अगदीच डिक्शनरी हाती घ्यावी लागत नाही पण "वाट तरी सरळ कुठे, पांदीतील सारी" ही भावना काही समूळ नष्ट होत नाही. दुसरं म्हणजे इंग्रजी भाषेतलं चांगलंचुंगलं - अगदी प्रातिनिधिक स्वरूपाचं, नमुनेवजा तरी - सगळं कधीच वाचून होणार नाही याची शंभर टक्के खात्री आहे. गेली चार पाचशे वर्षं प्रचंड मोठ्या प्रमाणात लोकांनी केलेलं काम आणि मग देशीविदेशी हर प्रकारच्या भाषेच्या लेखकांच्या कामाची इंग्रजीमधे होत गेलेली भाषांतरं हे सर्व जमेस धरलं तर इंग्रजीमधे मामुली फेरफटकाही मारून होणार नाही हे आपल्यापुरतं ठरलेलं आहे. किमान या बाबत काही अवास्तव कल्पना उराशी नाहीत हेही नसे थोडके. हा विषय फार म्हणजे फारच मोठा आणि असल्या टीचभर टिपणात सामावणारा नाही.

हे सर्व सुचायला निमित्त झालं जेन ऑस्टीनच्या अलिकडे केलेल्या "प्राईड अँड प्रेजुडीस" या कादंबरीच्या वाचनाचं. कादंबरी वर्ल्ड क्लासिक्समधे गणलेली. कादंबरी प्रसिद्ध होऊन - इतकंच नाही तर जेन ऑस्टीनचं निधन होऊन - दोनशे वर्षं होऊन गेलेली आहेत. दोनशे वर्षांच्या या मोठ्या काळात ही कादंबरी सुरवातीला इंग्लिश समाजात आणि नंतर क्रमाक्रमाने युरोप, अमेरिका आणि मग जगाच्या अन्य भागांमधे कशी पसरली, सुरवातीला ती लोकप्रिय पण कलात्मकदृष्ट्या फारशी दखलपात्र कशी नव्हती, आणि मग इंग्रजी साहित्याच्या इतिहासातली मैलाचा दगड बनलेली कशी झाली हाही इतिहास मजेशीर आहे. शाळा कॉलेजांमधून ती शिकवली गेली आणि अजूनही ती "लावलेली" असतेच. १९४० च्या दशकापासून त्यावर सिनेमे आणि टीव्हीचं युग सुरू झाल्यावर सिरियल्स बनत आहेत. अगदी बॉलीवूडपर्यंत तिच्यावर सिनेमे बनवले जात आहेत. १९८० च्या दशकात दूरदर्शनवर "तृष्णा" नावाची सिरियल त्यावर येऊन गेलेली होती.

१९९५ साली बीबीसीने काढलेली ८ भागांची सिरियल म्हणजे या कादंबरीवरचं आजतागायत झालेलं सर्वोत्कृष्ट काम असं म्हणायला हरकत नाही. कॉलीन फर्थ याने रंगवलेल्या डार्सीने देशविदेशीच्या लाखो करोडो स्त्रियांचा कलिजा खलास झाला. कॉलिन फर्थ जो आंतरराष्ट्रीय पातळीवरचा सुपरस्टार बनला तो या एका घटनेने. या सिरियलमधल्या एलिझाबेथ रंगवलेल्या नटीचं कामही उत्तम होतं पण चांदी झाली ती "डार्सीची" :-)

"फॅन फिक्शन" आणि "नव्या आकलनांच्या" बाबतसुद्धा ही कादंबरी आघाडीवर आहे. खूनखराबा, (पी डी जेम्स या ख्यातनाम लेखिकेने या कादंबरीतल्या गावामधे एकामागोमाग खून होतात असं कथानक रचलं आहे!) माणसं खाणारे "झाँबीज्" अशा काय वाटेल त्या गोष्टी तिच्यावर रचल्या गेलेल्या आहेत. त्याहून अधिक निर्मितीच्या शक्यता बहुदा शेक्सपीयरच्या नाटकांनीच नोंदवल्या असतील.

तर अशी, कॉलेजच्या दिवसांमधे राहून गेलेली जगप्रसिद्ध कादंबरी. "बेटर लेट दॅन नेव्हर" म्हणून प्रौढत्वी वाचायला घेतली त्याबद्दलचे हे विचारतरंग. इतकंच या टिपणाचं स्वरूप.

दोनशे वर्षं झालेल्या कादंबरीचं कथानक नव्याने देणं ही एक फॉर्मॅलिटी आणि कथानक देत आहे असं डिस्क्लेमर देणं ही आणखी एक. ती करतो.

१७७५च्या आसपासचं इंग्लंडमधल्या जमीनधारी उच्च आर्थिक स्तरातलं वातावरण. जमिनीच्या भाड्यातून येणारं सर्वांचं उत्पन्न. कुणाला कामधंदे करायलाच हवेत असं काही नाही. या वर्गातलं कुणी काम करत असतानाचं चित्रण कादंबरीत बहुदा अभावानेच. अशाच प्रकारच्या कुटुंबांमधल्या बेनेट दंपतीच्या पाच मुली. वयात येत असलेल्या. त्यांच्या लग्नाची काळजी बेनेट्बाईंना आहे. बेनेटबुवा तसे काळजीग्रस्त नाहीत. (इथे 'पडोसन' सिनेमातल्या ओमप्रकाशच्या "बिंदूकी माँ, जब जब जो जो होना है, तब तब सो सो होता है" या वाक्याची आठवण येते :-) ) कादंबरीच्या सुरवातीला आलेलं वाक्यच कमालीचं लोकप्रिय आणि इंग्रजी भाषेतल्या सुप्रसिद्ध वचनांपैकी एक ठरलं : "It is a truth universally acknowledged, that a single man in possession of a good fortune, must be in want of a wife." जेन ऑस्टीनच्या अप्रतिम शैलीची आपल्याला इथेच चुणूक मिळते. तर या पाच बहिणींपैकी एलिझाबेथ बेनेट ही कादंबरीची नायिका. पाचही बहिणींमधली सर्वात बुद्धीमान, शहाणी, स्वतःचं असं व्यक्तिमत्त्व असलेली, स्वतःचा आब राखणारी, स्वाभिमानी, ठसठशीत, स्पष्ट मतं असलेली (आणि पटकन मतं बनवत असल्यामुळे चुकीचे निर्णय कधीकधी घेण्याच्या धोक्यात सापडणारी - पण स्वतःच्याच विवेकामुळे त्या धोक्यांमधून बाहेरही पडणारी.) कादंबरीचा नायक फिट्झविल्यम डार्सी. याच उमराव वर्गातला. गर्विष्ठ तिरसट वाटणारा, नक्कीच घुमेपणा करणारा, अबोल, मात्र कुठल्याही प्रकारच्या खोटेपणा, दिखाऊपणापासून दूर राहाणारा, कुठल्याही प्रकारच्या फसवाफसवीवजा वर्तनापासून दूर राहाणारा. क्वचित हसणारा, तत्कालीन समाजाचा स्थायीभाव असलेल्या नृत्य आदि गोष्टींपासून फटकून वागणारा - आणि म्हणूनच एलिझाबेथला ज्याच्याबद्दल गैरसमज उत्पन्न झालेला आहे असा. या समज-गैरसमजांची कोळिष्टकं दूर होतात आणि अंतिमतः नायक नायिकेचं मीलन होतं. मग या सव्यापसव्यात अर्थातच इतर बहिणी, डार्सीचा मित्र, त्याचं एका बेनेट बहिणीबरोबर जमलेलं सूत, इतर विनोदी किंवा खलत्वाकडे झुकणारी वाटतील अशी पात्रं. असा एकंदर हिशेब.

स्पॉयलर अलर्ट इथे संपला असं समजायला हरकत नाही.

कादंबरीच्या कथानकावरून, "या अशा कथा आपण यत्ता दहावीच्या आसपास वाचत होतो" हा विचार मनात आल्यावाचून राहात नाही. जेन ऑस्टीनची लिहिण्याची शैली अप्रतिम आहे हे मात्र खरंच. मी वर कादंबरीचं पहिलंच वाक्य दिलेलं आहे. जवळजवळ सगळी कादंबरी एलिझाबेथ बेनेटच्या दृष्टीकोनातून लिहिलेली आहे. बहुतांश घटना तिच्या उपस्थितीमधे घडतात. निवेदिका म्हणून लेखिकेची वर्णनं जिथे येतात ती एलिझाबेथने केलेली आहेत असं समजून मी बहुतांश कादंबरी वाचली. (हे माझं मत ठार चुकीचं असल्यास चूभूदेघे.)

"प्राईड अँड प्रेजुडीसचं भाषासौंदर्य" यावर गेल्या २०० वर्षांत किती रीसर्च पेपर झाले असतील देवास ठाऊक. अमीर उमरावांची भाषा म्हणून ती त्या समाजाचं वास्तव चित्रण करणारी - आणि म्हणून त्या अंगाने ग्रेसफुल - ती आहेच. पण आपल्या वर्गापुरतंच मर्यादित चित्रण करताना जेन ऑस्टीनचा उपरोध, विसंगती टिपण्याची क्षमता, ती विसंगती व्याजोक्तीने, आब राखून, मिष्कील पद्धतीने एखाद्या बुद्धीमान व्यक्तीने टिपावी याची उदाहरणं पहिल्यापासून शेवटाच्या पानापर्यंत दिसतात. संवाद रचण्याचं लेखिकेचं कौशल्य अजोड आहे. बटबटीतपणा, घिसाडघाई, अप्रस्तुत बोलणं, तोल ढळणं, या प्रकाराला जेन ऑस्टीनच्या लिखाणात स्थान नाही. एकंदर जेन ऑस्टीनचं जगच बर्‍यापैकी त्या उमरावी वर्गाने बंदिस्त केलेलं. त्या जगातल्या खलप्रवृत्तीच्या वाटणार्‍या व्यक्तींची वर्णनंसुद्धा खलत्वाशी अगदीच दूरान्वयाने संबंध असलेली. फारफार तर खोटं बोलणारी माणसं ती वाईट. याहून अधिक खलत्वाचं चित्रण नाही.

आणि एकंदरच तत्कालीन कादंबरीमधे नोकर येतात, जातात त्यांचं कुठेही अर्थपूर्ण असं दर्शन नाही. जणू ते अदृष्य आहेत. कुठेही हे उमराव आणि त्यांची पिलावळ आपल्या वर्गाच्या बाहेरच्या वर्गाबाहेरच्या कुणाशी साधं बोलतानाचं चित्रण मला आठवत नाही. आपल्याच वर्गात कोण उच्च आणि कोण खालचे याची सदोदित चर्चा करणार्‍यांची चित्रणं येत राहातात. अगदी एखादा माणूस जमीनधारी उमराव नसून व्यवसाय किंवा कामधंदा करून उपजीविका करणारा असला तर - अगदी तो कितीही सुखवस्तू असला तरी - उमरावी जिभा लगेच त्याबद्दल उपहासाने वळवळणार. (अर्थात असं करणार्‍यांबद्दल आत्यंतिक उपरोधाने लेखिका लिहिते. अशा प्रकारच्या pettinessचं विसंगतीयुक्त आणि मार्मिक चित्रण ही जेन ऑस्टीनची सर्वात अधिक परिणामकारक , शक्तीमान बाजू.) कादंबरीतले जे काही संघर्ष, ताणेबाणे आहेत ते लग्नं जुळवण्यापुरते. कुठल्या व्यक्तीचे कुणाबद्दल काय समज गैरसमज झालेले असतील त्याचे. "आधी तो मला असा वाटला पण आता असा वाटतोय" अशा प्रकारची रेलचेल असलेली वर्णनं. या दृष्टीने, २०व्या शतकाच्या सुरवातीला गडकरी वगैरे लोकांनी लिहिलेल्या "सामाजिक आशयाच्या" मराठी नाटकांमधल्या नायकांची नायिका मिळवण्याकरताची धडपड असलेली कथानकं आठवतात. मात्र, गडकर्‍यांसारख्यांचा sense of Evil बर्‍यापैकी ठाशीव आणि एकंदर कथानकाला गडद रंग देणारा होता. जेन ऑस्टीनमधे म्हणजे गडद छटा जवळजवळ नाहीच! इथे एकमेकांना दुखवण्यातून फारफार तर नशीबात काय येतं ते हिरमुसलेपण. जगण्यामरण्याचा संघर्ष - किमान या कादंबरीत - विशेष असा काही नाही. post-colonial ,फेमिनिस्ट लोकांनी ऑस्टीनच्या कायकाय चिंधड्या उडवल्या असतील त्या कधीकाळी वाचायला मजा येईल. :-)

( त्याकाळी - म्हणजे अगदी २०० वर्षांपूर्वी - स्त्री पुरुषांमधे मैत्री होणं, एकमेकांशी उघडउघड गप्पा मारू शकणं, तरुण तरुणींनी नृत्यात एकमेकांचा हात मागणं, सतत पार्ट्या करणं, प्रत्यहि एकमेकांबरोबर नृत्यं करणं - हे सर्व वाचताना , आमच्या काळी मुलामुलींच्या साध्या बोलण्यावर बंदी किंवा किमान भ्रूकुटीभंगाचा धोका असल्याच्या आठवणी येऊन, तत्कालीन डार्सी आणि इतर नायकांबद्दल तीव्र मत्सर दाटला होता हे येथे प्रामाणिकपणें नमूद करणं आवश्यक आहे :-) )

Every artist or author is a product of their times. जेन ऑस्टीन त्याला अपवाद नाही. २०० वर्षांनंतर, आख्खं विसावं शतक उलटून गेल्यावर, त्या शतकामधे ब्रिटीश साम्राज्यच नव्हे तर अखिल जगाचा निरागसपणाच लयाला गेल्यासारखा झाल्यानंतर जेन ऑस्टीन वाचणं यामागे एक गमतीशीर विसंगती आहे. मात्र जेन ऑस्टीनच्याच ग्रेसफुल नजरेने आपण या - अगदी ढळढळीत असलेल्या - विसंगतीकडे दोन घटका पाहू शकतो. त्या विसंगतीला काही काळ बाजूला ठेवून एका बुद्धीमान, शैलीदार, आपल्या समाजावर आसूड न ओढणार्‍या परंतु मिष्किल नजरेने त्यावर टिप्पणी करणार्‍या, विवेकी पण तीव्र संवेदनशीलतेच्या, जेन ऑस्टीनची जणू Alter ego असलेल्या, एलिझाबेथ बेनेटच्या जगाचा एक भाग बनू शकतो. डार्सी आणि एलिझाबेथच्या नाजूक पण एकमेकांच्या हृदयीच्या तारांशी एकमेकांनी चालवलेल्या खेळामधे घटकाभर तल्लीन होऊन राहू शकतो. तशा तर अनेकानेक पलायनवादी गोष्टी आपण ऐकतो-वाचतो-पाहतो- करतो. ऑस्टीनच्या तात्कालिक सामाजिक संदर्भांनी बांधल्या गेलेल्या, त्या काळाचा अपरिहार्य भाग असलेल्या या कादंबरीला मी escapist reading म्हणणार नाही. भाषिक सौंदर्याचा नमुना म्हणून ऑस्टीन अजोड आहे. उत्तम कशीदाकाम केलेल्या एखाद्या भरजरी उंची वस्त्राला स्पर्श करावा, घटकाभर ते ल्यावं अशा धर्तीचा हा अनुभव आहे.

Thursday, March 7, 2019

कहाणी स्त्रीपुरुष समानतेची

ऐका स्त्रीपुरुष समानते तुमची कहाणी.

आटपाट नगर होतं. त्या नगरांत एक ब्राह्मण होता. तो नित्य लाईक, कमेंटी, वावाचान आणायला सोशल मिडियावर जात असे. तिथं नागकन्या देवकन्या वसा वसत होत्या. ब्राह्मणानं विचारलं,”काय ग बायांनों, कसला वसा वसतां? तो मला सांगा.” ” तुला रे वसा कशाला हवा? उतशील, मातशील, घेतला वसा टाकून देशील.” ब्राह्मण म्हणाला, “उतत नाहीं, मातत नाहीं, घेतला वसा टाकीत नाहीं.” तेव्हां त्या म्हणाल्या, “८ मार्च येईल, तेव्हां पहिल्या आदितवारीं मौन्यानं (मुकाट्यानं) उठावं, सचीळ (वस्त्रासहित) स्नान करावं, अग्रोदक पाणी आणावं. विड्याच्या पानावर रक्तचंदनाची सिमॉन दी बुव्हा काढावी. सहा रेघांचं मंडळ करावं, सहा सुतांचा तातू करावा. त्याला सहा गांठी द्याव्या. पानफूल वहावं, पूजा करावी. कल्चरल फेमिनिझमचा विडा, मार्क्सिस्ट फेमिनिझमच्या फुलांचा झेला, रॅडिकम फेमिनिझमचा धूप, लिबरल फेमिनिझमचा नैवेद्य दाखवावा, सहा मास चाळावी, सहा मास पाळावी, माघी रथसप्तमीं संपूर्ण करावं. संपूर्णाला काय करावं? इको फेमिनिझमच्या पोळ्या, ब्लॅक फेमिनिझमच्या बोटव्यांची खीर, इंडिव्हिज्युअल फेमिनिझमच्या लोणकडं तूप, मेहूण जेवूं सांगावं. असेल तर चिरचोळी द्यावी, नसेल तर जोडगळसरी द्यावी, ती नसेल तर दोन पैसे दक्षणा द्यावी आणि आपल्या वशाचं उद्यापन करावं.” असा वसा ब्राह्मणानं केला. त्याला स्त्रीपुरुष समानता प्रसन्न झाली.

ताराबाई शिंदे स्वप्नांत आली. तेव्हां राजाच्या राणीनें ब्राह्मणाला बोलावूं धाडलं, ब्राह्मण जाते वेळेस भिऊं लागला. कांपूं लागला. तेव्हां राजाच्या राणीनं सांगितलं, ” भिऊं नका, कांपू नका, तुमच्या मुली आमचे येथें द्या” “आमच्या मुली गरीबाच्या, तुमच्या घरीं कशा द्याव्या? मिसॉजिनी कराल, शोव्हेनिशम कराल, दासी बनवाल , बटकी बनवाल.” राणी म्हणाली, ” मिसॉजिनी करीत नाहीं, शोव्हेनिशम करीत नाहीं. ब्रा बर्निंग करू. स्लटवॉक करू. मुलगी झाली हो करू. ”

मार्गेश्वराचा महिना आला. ब्राह्मणानं फेमिनिष्ठांना मुली दिल्या, एक राजाचे घरीं दिली. दुसरी प्रधानाचे घरीं दिली. गेल्या पावलीं मुलींचा समाचार घेतला नाहीं. बारा वर्षांनीं समाचारास ब्राह्मण निघाला. राजाच्या घरी गेला. लेंकीनं बसायला पाट दिला, पाय धुवायला पाणी दिलं. “ बाबा बाबा, गूळ खा पाणी प्या.” गूळ खात नाहीं, पाणी पीत नाहीं. माझी कहाणी करायची आहे ती तूं ऐक.” तुझी कहाणी ऐकायला मला वेळ नाहीं. राजा अपर्णा तीर्थंकरांकडे जाणार आहे. त्याला जेवायला उशीर होईल. तोच त्याचे मनांत राग आला. तेथून निघाला प्रधानाच्या घरीं गेला. तिनं पाहिलं, आपला बाप आला. म्हणून बसायला पाट दिला; पाय धुवायला पाणी दिलं. “बाबा, बाबा, गूळ खा, पाणी प्या.” ” गूळ खात नाहीं पाणी पित नाहीं, माझी कहाणी करायची आहे, ती तूं अगोदर ऐक. ” तुझी कहाणी नको ऐकूं तर कोणाची ऐकूं?” घरांत गेली, उतरडींची सहा मोत्यें आणलीं. तीन आपण घेतलीं. तीन बापाच्या हातांत दिलीं. त्याने मनोभावें सेकंड सेक्स वाचली लेकीनं चित्तभावें ती ऐकली. नंतर जेवून खाऊन बाप आपल्या घरीं आला. बायकोनं विचारलं, ” मुलींचा समाचार कसा आहे?” जिनं कहाणी ऐकलीं नाहीं, ती राखी सावंत बनली. धिनचाक पूजा बनली. बुरसटलेपणानं व्यापली. जिनं कहाणी ऐकली होती, ती भाग्याने जगते आहे. विदा वाचून वाचून बेभान होते आहे. ज्योती म्हापसेकर झाली आहे. प्रमिला दंडवते झाली आहे. मृणाल गोरे झाली आहे. ”

इकडे राखी सावंत जी झाली होती, तिनं आपल्या लेकीला सांगितले. “मावशी घनघोर नांदत आहे, तिकडे जाऊन कांहीं दिलं तर घेऊन ये.” पहिल्या आदितवारीं पहिली मुलगी उठली, तळ्याच्या पाळीं जाऊन उभा राहिली.” अग अग दासींनों, तुम्ही दासी कोणाच्या?” ” आम्ही दासी प्रधानाच्या. प्रधानाच्या राणीला जाऊन सांगा, तुमच्या बहिणीची मुलगी आला आहे.” “कशी आली आहे? तळ्याच्या पाळीला उभी राहिली आहे.” ‘परसदारनं घेऊन या.’ परसदारानं घेऊन आल्या. न्हाऊं माखूं घातलं, साडीचोळी नेसवली, जेवू खाऊं घातलं. कोहोळा पोखरला, होनमोहोरा भरल्या. “वाटेस आपली जाऊं लागली. तों बेटी फ्रीडमन परीक्षा घेण्याकरता आली. हातींचा कोहोळा काढून नेला. घरीं गेली. आईनं विचारलं, ” काय रे बाबा, मावशीनं काय दिलं?” दैवें दिलं, कर्मानं नेलं. कर्माचं फळ पुढं उभं राहिलं. मावशीनं दिलं होतं. पण सर्व गेलं.

पुढं दुसर्‍या आदितवारीं दुसरा मुलगा गेला. तळ्याच्या पाळीं जाऊन उभा राहिला. “अग अग दासींनो, तुम्ही दासी कोणाच्या?” “आम्ही दासी प्रधानाच्या.” प्रधानाच्या राणीला निरोप सांगा. त्यांनी सांगितला. मग प्रधानाच्या राणीनं त्याला घरीं नेऊन न्हाऊं माखूं घातलं पीतांबर नेसायला दिला, जेवूं खाऊं घातलं. काठी पोखरून होनामोहोरांनीं भरून दिली. ” बाबा, ठेवूं नको. विसरूं नको. जतन करून घरीं घेऊन जा, ” म्हणून सांगितलं. वाटेंत सावित्रीबाई फुले परीक्षा घेण्याकरता आली, हातची काठी काढून घेतली. घरीं गेला, झालेली गोष्ट राणीला सांगितली. “दैवें दिलं, तें सर्व कर्मानं नेलं.”

पुढं तिसरे आदितवारीं तिसरा मुलगा गेला, तळ्याच्या पाळीं उभा राहिला. त्यालाही पहिल्यासरखं प्रधानाचे घरीं नेऊन न्हाऊं माखूं घातलं, पीतांबर नेसायला दिला, जेवूं खाऊं घातलं, नारळ पोखरून होनमोहोरांनीं भरून दिला. ” ठेवू नको, विसरूं नको.” म्हणून सांगितलं, घरीं जाताना विहिरींत उतरला. तों नारळ गडबडून विहिरींत पडला. घरीं गेला. आईनं विचारलं. ” काय रे बाबा, मावशीनं काय दिलं?” आई ग, मावशीनं दिलं, पण दैवानं तें सर्व बुडालं.”

चवच्या आदितवारी चवथा मुलगा गेला. तळ्याच्या पाळीं उभा राहिला. त्यालाही प्रधानाच्या राणीनं घरीं नेऊन न्हाऊं माखूं घातलं, पीतांबर नेसायला दिला. जेवूं खाऊं घातलं. त्याला दह्याची शिदोरी होनामोहोरा घालून बरोबर दिली. वाटेल माया अँजेलो परीक्षा घेण्याकरता आली. हातची शिदोरी घेऊन गेला. घरीं गेला. आईनं विचारलं, “काय रे बाबा, मावशीनं काय दिलं?” “आई मावसशीनं दिलं, पण दैवानं तें सर्व नेलं.”

पांचव्या आदितवारीं आपण उठली, तळ्याच्या पाळीं उभी राहिली. दासींनीं तिचा निरोप तिच्या बहिणीला सांगितला. बहिणीनं तिलाही परसदारानं घरीं नेलं. न्हाऊं घात्लं. माखूं घातलं, पाटाच बेसायला दिला. प्रधानाची राणी स्त्रीपुरुष समानतेची कहाणीकरूं लागली. ” काय वसा करतेस तो मला सांग.” बहीण म्हणाली, “अग अग चांडाळणी, पापिणी, बापाची कहाणी ऐकली नाहींस, म्हणून तुला दरिद्र आलं.” राजाच्या राणीनं विचारलं, “याला बहिणीच्या घरीं राहिली. ८ मार्च आला. सांगितल्याप्रमाणं स्त्री पुरुष समानतेची पूजा केली. इकडे राजाला भाग्य आलं. राजानं बोलावूं धाडलं. “मावशी मावशी, तुला छत्रं आलीं, चामरं आलीं, ग्लास सीलिंग फुटलं. इक्वल पे आला. स्त्रियांचं सर्व शिक्षण मोफत झालं. गर्भजल परीक्षा थांबली. स्त्रीभ्रूणहत्या थांबली. बालविवाह थांबले. रेप कल्चर गेलं. हुंडाबंदी आली. ” “मला रे पापिणीला छत्रं कोठली? चामरं कोठलीं? पाईक कोठले? परवर कोठे?” बाहेर जाऊन दाराशीं बघतात, तो राजा बोलावूं आला आहे. राजा आला तशी घरीं जायला निघाली. एकमेकींना बहिणीबहिणींनीं अहेर केले. वाटेनं जाऊं लागलीं.

दोहो बहिणींना आणि बाकी कित्येकींना कोणा डोळा मांसाचा गोळा, इतक्यांना जशी स्त्रीपुरुष समानता प्रसन्न झाली , तशी तुम्हां आम्हां होवों. ही साठां उत्तराची कहाणी, पांचां उत्तरीं सुफळ संपूर्ण.

Wednesday, January 17, 2018

A Hindi translation of an old Marathi poem by Padma Gole

The reference of this poem came up while speaking with someone. Translated it in Hindi for them. A rather impromptu and - am afraid - an uneven attempt at it. :-)

Padma Gole, the late poet had a mild demeanor and a deceivingly simple way of expressing things. In small ways reminiscent of Emily Dickinson.

Hope some of you might find this amusing.

आताशा मी नसतेच इथे
तशी अजून माझी जा-ये असली तरीही
आताशा मी नसतेच इथे

कुठे म्हणून काय विचारतां?
जसं काही तुम्हाला ठाऊकच नाही!

बाकी नसेलही म्हणा,
कारण त्या गावाच्या वाटेला
फारसं कुणी जातही नाही.

तिथे घर म्हणता?
आहे की.
इतकं मोठं, इतकं मोठं की
त्या घराला भिंतीच नाहीत
छत ना?
आहे-नाहीचं.
तसलाच उंबरठा.
त्यावरून वाहते नदी.
नदीत खेळतात चंद्र आणि चांदण्या.
मी ना?
काठाकाठाने निर्माल्य वाहतंय ना? त्यातच असते कुठेतरी
त्यात आणि निर्माल्याच्या ताज्या ताज्या स्वप्नांत.

सोबत आहे की.
आपल्या त्या .. ह्यांची.
नावही आहे त्यांना.
पण मला किनई काही आठवतच नाही.
आताशा मी नसतेच इथे

हळुहळू तुटतंय रेशीम काचणारं
आता गळा मोकळा होतोय
ओठापर्यंत आलंय गाणं
म्हणू का?

यमुनेच्या डोहात रास रंगात आला होता
तेव्हाचं गाणं
वस्त्रं केव्हाच गेलीत कदंबावर
- अंतर्पाट होण्यासाठी.
सावधान !

मी झालेय निळं गाणं
निळ्या नदीत वाहणारं
- निर्माल्याबरोबरच.

आताशा मी नसतेच इथे
आताशा मी नसतेच इथे
तशी अजून माझी जा-ये असली तरी
आताशा मी नसतेच इथे
मी नसतेच इथे .

- पद्मा गोळे
----
आजकल यहां होतीही नहीं हूं मैं
हां, मेरा आनाजाना होता ज़रूर है
आजकल यहां होतीही नहीं हूं मैं

अब इस "कहाँ" का मैं क्या जवाब दूं
ऐसे पूछतेहो जैसे तुम्हें ख़बरही ना हों

हां, शायद सचमुच मालूम ना हों
क्यूंकी उस गाँवकी ओर तो
कोई जाता भी नहीं

वहाँके घरके बारेमें पूछ रहे हो?
है ना.
इतना बडा, इतना बडा की,
उस घरको कोई दीवारही नहीं
और छत?
है-नही के बराबर
वैसीही दहलीज़
जिसपरसे गुजरती है एक नदी
नदीमें खेलते हैं चंदा और तारे
और मैं?
वो जो नदीके किनारेकिनारे बहनेवाले सूखे़ फू़ल दिख रहें हैं ना?
उनमेहीं कहीं,
उनमे, और उन मुरझाये फुलोंके ताजा़ ताजा़ ख्वा़बोंमें

साथ तो हैं वो ,
वो जो हैं ...
नाम भी तो हैं उन्हें अपना
लेकिन आजकल मुझे कुछ यादही नहीं रहता
आजकल यहां होतीही नहीं हूं मैं

धीरेधीरे रेशमके ये चुभनेवाले धागे टूट रहें हैं
गीत ज़बानतक आ पँहुंचा है
गा दूं?

जमुना किनारे जब रासलीला रचाई थी
तबका ये गीत
मेरे वस्त्र तो पहलेही कदंबकी शाख पे पंहुंच चुके हैं
विवाह के जोडे़ जो बन गए हैं

मैं अब बन गई हूं
वो नीला नीला गीत
नीली नदीमें बहनेवाला
- उन सूखे़ फुलोंके साथ साथ

आजकल यहां होतीही नहीं हूं मैं
आजकल यहां होतीही नहीं हूं मैं
हां, मेरा आनाजाना होता ज़रूर है
आजकल यहां होतीही नहीं हूं मैं
होतीही नहीं हूं मैं.

- पद्मा

Wednesday, August 30, 2017

"सप्रेम द्या निरोप, बहरून जात आहे"

साल २०००. नुकताच अमेरिकेमधे आलेलो होतो. बॉस्टनमधे असतानाची दिवाळी. रांगोळ्या, फराळ, आणि मित्रमंडळ या सर्वांमधे दिवाळी साजरी करताना दिवाळी अंक नसल्याची चुटपुट होती. दिवाळीला तब्बल महिनाभर उलटून गेल्यानंतर केव्हातरी दिवाळी अंक मिळालेले. त्यावेळी मोजकेच मागवले होते. त्यात मौजेचा. नेहमीचा. आवडीचा. "मौजे"च्या अन्य चांगल्या दर्जाच्या लिखाणामधे, दिवंगत साहित्यिक, ख्यातनाम समीक्षक आणि बडोद्याच्या आर्किटेक्चर स्कूलचे एकेकाळचे डीन माधव आचवल, यांच्याबद्दलचाही एक लेख होता. आचवलांचं निधन खरं तर १९८० च्या दशकाच्या सुरवातीचं. त्यामुळे हा त्यांच्या आठवणींवरचा लेख पुष्कळच उशीरा आलेला होता. आणि लेखाची सुरवातही तशीच होती "... हे मी सगळं आताच कां लिहितो आहे, सांगता येणं तसं कठीणच आहे." लेखकाचं नाव होतं दिलीप वि. चित्रे. यातलं मधलं "वि." हे आद्याक्षर ठळक टायपात नव्हतं पण मला मात्र ते ठळकच असल्याचं जाणवलं. दिलीप पुरुषोत्तम चित्रे ऊर्फ दिपु चित्रे म्हणजे हे नव्हेत - जरी दोन्ही दिलीप चित्रे बडोद्याचे असले तरी- हे मला त्या "वि."ने सांगितलं होतं - अगदी पहिल्याच क्षणी.

लेखाचा लेखक अमेरिकेतला होता हे लेखातल्या अनेक उल्लेखांवरून सरळसरळ दिसत होतं. लेखामधे न्यू कॅरल्टन, लॅन्हम वगैरे गावांचा उल्लेख होता. पण ही गावं कुठल्या राज्यात आहेत याचा उल्लेख नव्हता. माधव आचवलांबद्दल सुनीता देशपांडे यांनी लिहिलेला लेख नुकताच "सोयरे सकळ" या संग्रहात आलेला होताच. चित्र्यांचा हा लेखही अगदी त्याच तोडीचा, आचवलांची योग्यता पुरेपूर मांडणारा पण सुनीताबाईंच्या लिखाणापेक्षाही अधिक आचवलांचं माणूसपण, त्यातले ताणेबाणे चितारणारा. यात दिलीप चित्रे आचवलांचे आर्किटेक्चरचे विद्यार्थी होते असा उल्लेख होता. आचवलांच्या, मला अतिशय आवडलेल्या "जास्वंद" पुस्तकातले बहुसंख्य लेख चित्र्यांना त्यांनी "डिक्टेट" केल्याचा उल्लेख आला आणि एकाच वेळी मनात आदर नि मत्सर दाटून आला. लेख मी मुरवून पुरवून वाचला. त्या वर्षांमधे दिवाळी अंकामधे लेखकांचे इमेल आयडी छापले जात नसत. (आता सर्रास तसं छापतात.) त्यामुळे लेखक कोण कुठला असेल याचा अंदाज मी मिनिट दोन मिनिट बांधला असेल. तितकंच.

वर्षं सरलं आणि आमचा मुक्काम बॉस्टनहून वॉशिंग्टन डीसीच्या एका उपनगरात हलला. मुलं अजून जन्माला यायची होती. गावातल्या मराठी लोकांशी हळुहळू ओळख होत होती. गावात यशवंत देव यांच्या गाण्याचा कार्यक्रम लागला तो ऐकायला गेलो होतो. कार्यक्रमाचं आयोजन आणि एकंदर सूत्रसंचालन दिलीप चित्रे नावाच्या कुणी केलं होतं. करड्या रंगाच्या छटा असलेली, शिवाजी महाराज टाईप दाढी. साठीच्या आत बाहेरचे असावेत. ( आचवलांचे विद्यार्थी म्हणजे तेव्हढे वयाने असणार असा अंदाज मला न भेटताही आलेलाच होता.) त्यावेळी आम्ही तसे नवखे. अजून विशेष ओळखी नसलेल्या गावात, काहीशा गर्दीत तो कार्यक्रम ऐकला.

कार्यक्रम संपल्यावर खुर्च्या आवरताना चित्र्यांना मी विचारलं :
"तुम्ही चित्रे ना?"
"हो. मी दिलीप चित्रे."
ते तसे घाईत होते. मला त्यांना कटवायचं होतं असं नव्हे पण हात आवराआवरीमधे गुंतलेले. मीही एकीकडे खुर्च्याच दुमडत होतो म्हणा.
"आता तशी घाईच आहे पण एक विचारायचं होतं. जमेल तेव्हा विचारेन." - मी.
"विचारा ना."
"तो गेल्या वर्षी मौजेच्या दिवाळी अंकात आलेला आचवलांवरचा लेख लिहिलेले तुम्हीच ना?"
खुर्च्या दुमडणारे, एकंदरीत धावपळ करणारे चित्रे थांबले.
"हो. तो मीच. "
"हा तुमचा लेख मला फार आवडला."
"अच्छा. बरं". जरा थांबून थोडे संशयाने बोलल्यासारखे ते म्हणाले , "हो पण आचवलांबद्दल तुम्हाला माहिती आहे का?"

मी मनातल्या मनात हसलो. बरोबर आहे. 'याची तीशीसुद्धा आलेली दिसत नाही नि माधव आचवलांबद्दल विचारणारा नि वरतून आपलं मत देणारा उपटसुंभ कोण असावा बरे?' हा त्यांच्या मनातला "ड्वायलॉक् मी वाचला. मी माझं नाव सांगितलं. या भागात तसा नवाच आहे हे सांगितलं आणि थोडंफार वाचन असल्याचं सांगितलं. आणि हो, आचवलांच्या एक दोन पुस्तकांचा उल्लेख केला. त्यांनी आपलं काम थांबवलं. "अगं शोभा, जरा ये इकडे. बघ हा पोरगा काय म्हणतोय." अशी हाक मारली. सुरेख दिसणार्‍या आणि प्रसन्न हसणार्‍या, केसांची कडा अगदी किंचितच करडी झालेल्या एक बाई आल्या. त्यांच्या चेहर्‍यावर प्रश्नचिन्ह. "ओह तुम्ही शोभा चित्रे का?" असे शब्द माझ्या तोंडून अवचित बाहेर पडले. त्यांचं थोडं लिखाण वाचल्याची खूणगाठ पटली. आम्ही थोडे हसलो. वेळ फारसा नव्हताच. एकमेकांचे नंबर्स घेतले आणि निरोप घेतला.

पुढच्या काही दिवसांतच आमचा एकमेकांशी फोनवरचा संवाद सुरू झाला तो अगदी परवापरवापर्यंत चालू होता. तीसेक वर्षं अमेरिकेत काढलेले चित्रे माझ्यासारख्या अगदी नवख्याशी मनापासून दीर्घकाळ फोनवर बोलायला लागल्याचं नवल वाटणं साहाजिक होतं.


सुमारे पंधरासोळा वर्षं हा "फोनकॉल" चालू असल्याचा भास मला होतो.


उत्तम दर्जाचे आर्किटेक्ट, यशस्वी व्यावसायिक, आदर्श कुटुंबप्रमुख, हे सर्व तर ते होतेच पण अर्थातच आमच्या वयाचं अंतर नाहीसं करणारा दुवा होता त्यांचं साहित्यावरचं, कवितांवरचं, माणसांवरचं, आयुष्यावरचं, आयुष्याच्या प्रत्येक पैलूवरचं उत्कट प्रेम. यात त्यांनी लिहिलेल्या कविता, त्या कवितांचे बनलेले कवितासंग्रह , त्या कवितांना लावल्या गेलेल्या चाली, त्या गाण्यांवर आधारित अमेरिकेच्या गावोगावी कार्यक्रम आले. त्यामधे सत्तर-ऐंशीच्या दशकात "वॉशिंग्टनचे वार्तापत्र" या सदराखाली, एका मराठी नियतकालिकाकरता वर्षानुवर्षं लिहिलेलं सदर आलं, "एकता" सारख्या उपक्रमांमधे लिखाणापासून अन्य बाबींकरता केलेलं काम आलं. महाराष्ट्रातल्या पहिल्या दर्ज्याच्या प्रकाशनांमधे वेळोवेळी लिहिलेले लेख आले. "एनाराय लोकांची आयडेंटिटी" या गोष्टीवर पुस्तकं यायच्या आधी "कुंपणापलिकडचं शेत" या अर्थपूर्ण नावाने संपादित केलेला, एनराय मराठी माणसांनी लिहिलेल्या कथांचा संग्रह आला, पहिल्या जागतिक मराठी परिषदेमधे दिमाखाने सादर केलेलं "अलिबाबाची हीच गुहा" हे दिलीप चित्रेलिखित, डझनावारी अमेरिकास्थित मराठी स्त्री-पुरुष-मुलांसकट बसवलेलं नाटक आलं, मूळ संचात बसवलेलं आणि तेंडुलकरांसह अमेरिकेला आणलेलं "घाशीराम कोतवाल" हे तेंडुलकरांचं नाटक आलं, एकट्याच्या जीवावर, १९८० च्या दशकात अमेरिकेच्या वेगवेगळ्या गावांमधे भरवलेला मराठी चित्रपटांचा महोत्सव आला, महाराष्ट्र फाऊंडेशन या , दरवर्षी कोट्यावधी रुपयांचा निधी महाराष्ट्रात पाठवणार्‍या संस्थेच्या विश्वस्तपणाचं, दशकानुदशकं केलेलं काम आलं, त्या संस्थेकरता वीस पंचवीस वर्षं न चुकता दरवर्षी महाराष्ट्रात प्रसिद्ध होणारी उत्तम पुस्तकं निरखून पारखून त्याना पारितोषिक देण्याच्या प्रक्रियेमधे पुढाकार घेणं आलं, महाराष्ट्रातल्या मोठ्यामोठ्या साहित्यिक, कवी, नाटककार, लेखक, संपादक, सामाजिक कार्यकर्ते यांना आपल्या घरी वर्षातले जवळजवळ १२ महिने या ना त्या निमित्ताने बोलावून, त्यांचं काम लोकांपुढे आणणं आलं. "फॉर हिअर ऑर टू गो" या , एनारायांवरच्या पुस्तकाच्या संकल्पना-सिद्धीचा प्रपंच करणं आलं, "व्हॉईस ऑफ अमेरिका" या अमेरिकन सरकारी प्रसारणा संस्थेमधे मराठी संस्कृतीला स्थान मिळवून देणं आलं, वॉशिंग्टन शहरच्या सांस्कृतिक उपक्रमांमधे हिरीरीने भाग घेणं आलं, चांगलचुंगलं खिलवून (आणि हो पिलवूनसुद्धा!) मैफलींना गाजवणं आलं.

हे सर्व एकाच माणसानं एकाच जन्मात केलं असेल कां? कसं काय केलं असेल? मग असं करता करता त्यांच्या घरात जी सुमारे ३-४हजार मराठी पुस्तकं होती ती त्यांनी कधी वाचली असतील? आपल्या कुटुंबाकरताची कर्तव्यं कधी बजावली असतील? गुणी पत्नीच्या अनेकोत्तम साहित्यिक प्रकल्पांना पूर्ती मिळावी म्हणून तिला समरसून साथ कशी दिली असेल? घराचं बेसमेंट एकहाती फर्निश करण्याचा पराक्रम कधी केला असेल? शेकडो फोटो कधी काढले असतील? कविता कधी लिहिल्या असतील?

पु ल देशपांड्यांपासूनचे अनेकानेक साहित्यिक यांच्याकडे राहून गेले. सुधीर फडके, श्री पु भागवत, विजय तेंडुलकर, वसंत बापट, वसंत डहाके, व पु काळे, अमोल पालेकर, श्रीकांत मोघे .... अनेकानेक सामाजिक कार्यकर्ते .... अनिल अवचट त्यांच्याबद्दल बोलताना एकदा विनोदाने म्हणाले होते, "त्या ज्ञानेश्वरांचा जन्म थोऽडा लवकर झाला म्हणून, नाहीतर तेही चित्र्यांकडे राहून गेले असते."

ही यादी न संपणारी आहे, आणि ती अपुरी आहे. बरं त्या यादीधल्या उरलेल्या बाबी जरी कशाबशा मी पूर्ण केल्या तरी चित्र्यांचं अस्सल माणूसपण त्यामधे सामावणार नाहीच. चित्रे वॉशिंग्टननजिक ज्या भागात राहायचे त्या रस्त्याचं नाव होतं "मर्ना लेन". "जीना यहां, मर्ना यहां, इसके सिवा जाना कहां, जी चाहे जब हमको आवाज दो हम हैं वहीं हम थे जहां" या ओळींवरून आम्ही त्यांची गंमत उडवायचो पण त्या ओळी शेकडो लोकांना खर्‍या वाटल्या असतील, त्यांच्या अर्थाचा स्पर्श चित्र्यांच्या संदर्भात झालेला असेल. मीही त्यातला.
अशा रंगीबेरंगी छटा असणारा माणूस अजातशत्रू असणं अशक्य. त्यांचा फटकळ स्वभाव, त्यांचा स्वाभिमान - काही त्रयस्थ कदाचित त्याला गर्व म्हणतील - तसा त्यांच्या अंगी होता हे त्यांचे अगदी जवळचे मित्रही सांगतील. पण मैत्री इतकाच या अशा प्रकारच्या विवादांमधे जो honor असतो तो त्यांच्याकडे अगदी नक्की होता. त्यांच्याबद्दलचं हे माझं लिखाण म्हणजे आंधळी भक्ती नाही इतपत म्हणतो. त्यांच्यातल्या दोषांसकट मी त्यांच्याकडे पाहिलं. दोष असतील तर ते अगदी थोडे होते. आज इतक्या वर्षांनंतर या अशा गोष्टी त्यांच्या अफाट कर्तृत्वामधे, दाखवलेल्या प्रचंड नि नि:स्वार्थी प्रेमामधे , त्यांच्या खर्‍याखर्‍या जगण्यामधे पूर्णतया विरघळून गेलेल्या आहेत. उरल्यात प्रेमाच्या, त्यांच्या कामाच्या, काव्याच्या, रसिकतेच्या आठवणी.


कुठलेही मृत्यूलेख अपुरे असतात. त्यातही, लिखाणाचं कौशल्य असणारे लोक अधिक विस्ताराने, अधिक महत्त्वाच्या गोष्टी टिपत लिहू शकतील. मी काही तसा हातखंडा असलेला लेखक किंवा पत्रकार नव्हे. ती माझी वैयक्तिक मर्यादा. पण या वैयक्तिक मर्यादेपलिकडेही, "वो जो हम में तुम में क़रार था, तुम्हें याद हों के न याद हों" असं बेग़म अख़्तरबाई म्हणायच्या तसं , दोन व्यक्तींमधलं काहीएक वर्म असतं ते अशा लेखांमधून मांडता येणं हे कौशल्याचं नव्हे तर असामान्य प्रतिभेचं काम आहे. या लेखातून ते मी देऊ शकणार नाही हे मला ठाऊक आहे. अशा अलिखित कराराच्या, एकमेकांबद्दलच्या शब्दांच्या पलिकडल्या भावनांना शब्दांत बांधणं म्हणजे मृगजळाचं बांधकाम आहे. आणि तो प्रदेश माझ्यापलिकडचा आहे.

चित्र्यांचं माझ्या आयुष्यात आगमन अवचित झालं. तसं त्यांचं निघून जाणं सुद्धा. कसलीही कल्पना नसताना त्यांच्या मृत्यूची बातमी आली. अशी बातमी जगण्यामरण्याचे , माणसांमधल्या नातेसंबंधांचे सगळे संदर्भच उलटेपालटे करणारी. आजही ते गेले यावर विश्वास बसत नाही. अधिक काही बोलता येणं कठीण आहे. चित्र्यांच्या आयुष्याबद्दल आता विचार करतो तेव्हा आरती प्रभुंच्या या ओळी आठवतात.

तो एक वृद्ध माळी गेला पिकून आहे
निद्रीस्त शांतकाया आता पडून आहे
गुंफून शेज त्याची हळूवार पाकळ्यांनी
हा वेल मोगर्‍याचा पानीं मिटून आहे
अंगावरी कळ्यांची पसरून शाल गेला
सारा गुलाब आता रोखून श्वास आहे
जाईजुई बसून कोन्यांत दूर कोठे
अस्फुट गीत मंद हूरहूर बोलताहे
वनवेळू वाजताहे एकांतकिर्र ऐसा
माळीच की अखेरी नि:श्वास टाकताहे
वाजून मेघ जातो घननीळसा विरून
सर्वत्र तो भरून गंभीर नाद आहे
बोले अखेरचे तो: "आलो इथे रिकामा
सप्रेम द्या निरोप, बहरून जात आहे”

Thursday, November 12, 2015

संदीप खरेचं काय करायचं?


रेषेवरची अक्षरेच्या काव्यविषयक अंकाचं काम निघालं आणि गाडी लोकप्रिय कवितेवर आली. गेल्या पंधरा वर्षांचा विचार करताना असं दिसलं की संदीप खरे यांच्या कवितेला मराठी कवितेच्या प्रांतात जितकी लोकप्रियता मिळाली, तितकी अन्य कुठल्याच कवीच्या कामाला मिळालेली दिसत नाही. नव्या कादंबर्‍या आल्या. काही लेखक-लेखिका २००० सालानंतर प्रकाशात आले. काही नवी प्रकाशनं, नियतकालिकं उदयाला आली. पण लोकप्रिय कवितेच्या बाबत खरे यांच्या जवळपास जाणारं काही घडलं आहे, असं जाणवत नाही.

इथे ‘लोकप्रिय’ या विशेषणाचं महत्त्व आहे, हे वेगळं सांगायला नकोच. या विशेषणाला विशिष्ट संदर्भांमध्ये बरे आणि वाईट अर्थ आहेत हेही उघड आहे. साहित्याचा वेध घेणार्‍या कुठल्याही ठिकाणी खर्‍यांच्या कवितेचा अभ्यास सोडा, उल्लेखही येत नाही; आणि गावोगाव (आणि परदेशी) राहत असलेल्या सामान्य रसिकांना या साहित्यिक महात्मतेच्या अभावाची कसलीही क्षिती नाही. खरे यांचे (कुलकर्णी यांजबरोबरचे) मंचीय सादरीकरणाचे कार्यक्रम जोरात चालले आणि चालू आहेत.

खुद्द खरे यांच्या कवितांची खानेसुमारी किंवा समीक्षा ही कितपत महत्त्वाची आहे याहीपेक्षा, वाङ्मयीन महत्ता आणि लोकप्रियता ही जी dichotomy (द्वैत) आहे, ती थोडी अधिक जवळून समजून घेणं मला रोचक वाटतं. आता, ही dichotomy कुठे नाही? वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये ती चिरकालापासून चालत आलेली आहे. पण प्रस्तुत व्यासपीठ हे कवितेला वाहिलेलं आहे, म्हणून विचार साहित्य नि कवितेचा करायचा.

ढोबळ मानाने पाहायला गेलं, तर असं म्हणता येईल; की मर्ढेकरांनंतर जे अनेक प्रवाह निर्माण झाले, त्यांत दिलीप चित्रे, वसंत डहाके - आणि कदाचित अरुण कोलटकर (पण कोलटकर फारच स्वयंभू वाटतात. असो. तर तेही) - अशा लोकांचा 'साठोत्तरी' म्हणून गणला गेलेला एक पंथ होता. आरती प्रभू / ग्रेस / ना. धों. महानोर यांच्यासारखे मौज-पॉप्युलर प्रकाशनांनी प्रकाशात आणलेले लोक होते. आणि मग जणू भूकंप व्हावा, तसं दलित साहित्य आणि पर्यायाने विद्रोही कविता आली. ढसाळांसारख्यांनी मराठी विश्वाला गदागदा हलवलं. ग्रामीण कवितेने आपलं अस्तित्व अधोरेखित केलं. हे सर्व ढोबळमानाने सांगण्याचं कारण, की नव्वदच्या दशकात तयार झालेला जो एक पंथ होता - त्यात हेमंत दिवटे, वर्जेश सोलंकी, मन्या जोशी, अरुण काळे, सचिन केतकर आदी लोकांचा समावेश होतो - या गटातल्या लोकांमध्ये आणि संदीप खरे यांच्यामध्ये जो मोठा फरक आहे, त्या फरकाचा संबंध मी वर ज्या वाङ्मयीन महत्ता आणि लोकप्रियता यातल्या dichotomyचा उल्लेख केला तिच्याशी येऊन पोचतो. 'अभिधानंतर' या नव्वदोत्तरी लोकांच्या दृष्टीने महत्त्वाच्या मानल्या गेलेल्या अनियतकालिकाच्या अनेक लेखांतून संदीप खरे यांच्यावर प्रच्छन्न आणि उघड अशी टीका झाली. संदीप खरे यांना उद्देशून बाजारूपणासारखे शेलके शब्द वापरले गेले. गंमत अशी, की खर्‍यांनी याचा तेव्हा किंवा आता कुठे प्रतिवाद केल्याचं आठवत नाही.

यातल्या नळावरच्या भांडणांबद्दलच्या गॉसिपपेक्षा महत्त्वाचा आहे, तो नव्वदोत्तरी कवींच्या आणि खर्‍यांच्यामधला फरक; त्यांच्या भूमिकांमधला फरक, आणि ते ज्यांचं प्रतिनिधित्व करतात त्या गोष्टींमधला विरोधाभास. नव्वदनंतर भारतीय अर्थव्यवस्था बदलली आणि भारताच्या समाजावर त्याचे दूरगामी परिणाम झाले; नव्या मध्यमवर्गाचा उदय झाला; शहरीकरण आणि जागतिकीकरण या गोष्टींना प्रचंड वेग आला आणि बदलाच्या या लोंढ्यात राहणीमानाची वीण (social fabric) पार बदलली, हे सर्वज्ञात आहे. या सर्वाचा परिणाम साहित्यावर होणे हेही अपरिहार्य होते. नव्वदोत्तरी कवितांवर त्याचा प्रभाव जाणवतो. या कवितेतला निवेदक हा 'थांबताच येत नाही' असं म्हणतो (हेमंत दिवटे) किंवा 'जफर आणि माझ्यामध्ये लोक विष कालवतात' अशा प्रकारचे विचार बोलून दाखवतो (वर्जेश सोलंकी) किंवा 'लोकलच्या गर्दीत एकमेकांना स्पर्श करण्याची प्रवृत्ती अनिवार होते' अशा आशयावर बोट ठेवतो (मन्या जोशी).

याउलट याच सुमारास (किंवा थोडं पुढे) प्रकाशात आलेले खरे, हे आरती प्रभू / मंगेश पाडगांवकर/ काही किंचित सुरेश भट यांच्याकडून प्रेरणा घेतलेले दिसतात. खर्‍यांच्या कवितेतला निवेदक प्रियेच्या आठवणीने व्याकूळ होतो; किंवा आपण एकटे/कलंदर आहोत, याची खर्‍यांच्या कवितेतल्या निवेदकाला जाणीव होते (मात्र त्याच्या एकटेपणाचा तो तुटलेपणाशी (alienation) किंवा सांप्रतकालीन जगण्याच्या गोचीशी (existential conundrum) संबंध जोडताना दिसत नाही.)

सर्वात गमतीचं साम्य किंवा फरक - किंवा दोन्ही - अशा प्रकारच्या कवितांमध्ये येतो, जिथे कवी अती काम करणार्‍या महानगरी निवेदकाच्या दृष्टीने बोलू जातो. नव्वदोत्तरी निवेदक कंटाळलेला / कटकट करणारा / व्याकुळता (anxiety) व्यक्त करणारा आहे. या सार्‍यामध्ये आपली निर्मितिशीलता घुसमटते आहे, अशा स्वरूपाचे बोल त्या कवितांमधून ऐकू येतात. मात्र खर्‍यांची कविता म्हणते, 'दूर देशी गेला बाबा, माझ्याशी खेळायला येत नाही!' थोडक्यात शहरीकरण, जागतिकीकरण आणि आधुनिकीकरण यांच्या नंतरच्या जगतात राहणारे नव्वदोत्तरी नायक समाजाच्या संदर्भातलं, कुटुंबसंस्थांसारख्या गोष्टींच्या बाबतीतलं आपलं स्थान तपासतात; सामाजिक व्यवस्था आणि संकेतांबद्दल तिरकस - क्वचित जळजळीत म्हणावं इतपत धारदार - भाष्य करतात; या व्यवस्था आणि संकेत यांची आडवीतिडवी नासधूस झाल्यानंतरची असंगतता त्यांच्या कवितेतून येते. तर खर्‍यांच्या कवितेतली दु:खं ही स्वप्नरंजनात्मक आहेत, ती या मोडलेल्या ढाच्याबद्दल कुठेही बोलत नाहीत. तिथे अजूनही प्रिया भेटत नाही आणि मुलाला बाप भेटत नाही, वगैरे गुलाबी दु:खं येतात. या कृतक-रोमँटिसिझमच्या पलीकडे जात जेव्हा खरे काहीतरी मांडू जातात, तेव्हा ते अर्थातच अधिक गुणवत्तेचं आहे. परंतु त्यातही कलंदरी, कवीचं गूढरंजनात्मक अस्तित्व वगैरे काहीसे परिचित असलेले वळसे दिसतात. थोडक्यात सांगायचं तर जीवनाचं कुरूप म्हणा, विकृत म्हणा, विकट म्हणा, नाहीतर विक्राळ म्हणा, असं जे रूप आहे; त्याच्याशी कसलंही देणंघेणं नसलेलं खरे यांच्या कवितांचं जग आहे.

खर्‍यांचा विचार करताना मागील पिढीतल्या पाडगांवकर आणि विंदा आणि सुर्वे यांचा विचार येणं अपरिहार्य आहे. खर्‍यांवर टीका करताना आपण हे लक्षात घ्यायला हवं, की काव्यवाचन हा प्रकार त्यांनी आणलेला नाही. त्यांनी ती परंपरा पुढे नेलेली आहे. पाडगांवकरांवरसुद्धा लिज्जत पापडाच्या जाहिराती केल्या म्हणून टीका झाली. खर्‍यांवरच्या टीकेपेक्षा ती पुष्कळ कमी होती, पण थट्टा ही झालीच.

खर्‍यांचा विचार करता-करता आपण अपरिहार्यपणे 'मेनस्ट्रीम', 'पॉप', 'लोकप्रिय' या गोष्टींकडे येतो. हा पिढी बदलल्याचा परिणाम असावा. माझ्या मते पाडगांवकरांच्या या १ टक्का कामावर जितकी टीका नि थट्टा तेव्हा झाली, त्या टीकेचा मागमूससुद्धा आता दिसत नाही. एका अर्थाने, नव्वदनंतरच्या पंचवीसेक वर्षांत कलेच्या क्षेत्रातलं बाजारपेठेचं महत्त्व पटायला, सर्वच क्षेत्रांतल्या 'मार्केटेबल' प्रकारांकडे आपल्याला बोट दाखवता येईल. कलेच्या या मार्केट इकनॉमीमध्ये मग नोस्टाल्जिया - स्मरणरंजनालासुद्धा चांगलाच भाव आहे. राहुल देशपांडे यांच्यासारखे तरुण कलाकार, त्यांच्या कारकीर्दीला दहा-बारा वर्षे झाली तरी त्यांच्या आजोबांची गाणी, नाटकं अधिकाधिक मोठ्या प्रमाणात सादर करतात आणि त्यांना प्रचंड लोकप्रियता मिळते. काहीसा हाच मामला संदीप खरे यांच्या कवितेबद्दल होताना दिसतो. खरे कविता करताना जी उपमानं योजतात, जे मूड चितारतात; त्यांनी Déjà vu असं वाटणं अपरिहार्य आहे. त्यांच्या संग्रहामधल्या काही कविता रँडम पद्धतीने उघडून वाचताना खालील 'साम्यस्थळं' जाणवली.

संपले अवघे उत्सव आणि गर्दी पांगली
पालखी आता जिण्याची, बघ रिकामी चालली (सुरेश भट)

आता दिवाणखान्यातल्या कोपऱ्यात
जिथे अजूनही तंबोरा आहे (कोन्यात झोपली सतार सरला रंग - गदिमा)

नको करू सखी असा साजिरा शृंगार
आधीच कट्यार! त्यात जीवघेणी धार ?
(आज राणी पूर्वीची ती प्रीत तू मागू नको - वा रा कांत)

दोघांच्याही हातावर एकमेकांच्या रेषा आहेत
दोघांच्याही ओठांवर एकमेकांची भाषा आहे
दोघांच्याही मनभर एकमेकांच्या शुभेच्छा आहेत
दोघांच्याही डोक्यांवर एकमेकांचे आशीर्वाद आहेत...
झोपेच्या कागदावर जाग्रणाच्या अक्षरांनी मी कविता लिहीत असेन !
तिकडे उगाच असह्य होऊन असोशी ती पाणी पीत असेल...
रात्र होऊन जाईल चंद्र चंद्र; आणि मी जागाच असेन
तेव्हा बर्फाच्या अस्तराखाली वाहत रहावी नदी तशी तीही जागीच असेल...
मला खात्री आहे, तिला झोप आली नसेल... (आरती प्रभू)

एकटा दगडावरी बसुनी कधीच पाहतो
कैक चालून थांबले; पण मार्ग कधीचा चालतो
शून्य यात्रा वाटते ही, शून्य वाटे पंथही
शून्य वाटे साथ कोणी नाही त्याची खंतही
शून्यता ही वाटण्याला हात मग हुडकायचे
कोण जाणे कोण ऐसे मज कधी भेटायचे ? (आरती प्रभू)

मी काय तुला मागावे, अन काय तू मला द्यावे
छे सखी निराशा कसली मागणीच नव्हती कसली (सुरेश भट)

ती उन्हे रेशमी होती, चांदणे धगीचे होते
कवितेच्या शेतामधले ते दिवस सुगीचे होते (पाडगांवकर)

अशी कितीतरी उदाहरणं देता येतील.

वर जे विवेचन आलेलं आहे ते काहीसं स्वयंस्पष्ट आहे. माझ्या मते अधिक रोचक प्रश्न असा आहे की, इतर कवी आणि कवितांच्या रोडावलेल्या खपाच्या किंवा लोकप्रियतेच्या तुलनेत खर्‍यांची राक्षसी म्हणता येईल अशी लोकप्रियता कशी काय? ही लोकप्रियता म्हणजे वर्षानुवर्षं त्याच त्या मालिका पाहणार्‍या वर्गामधली लोकप्रियता म्हणायची की त्यापेक्षा हे वेगळं आहे? असल्यास कसं? खर्‍यांच्या बाबत जो एक मुद्दा वारंवार मांडला जातो - की त्यांनी मराठी तरुण वर्गाला कवितेकडे वळवलं - he made the Marathi poetry a cool thing among the young crowd - हे कितपत ग्राह्य मानता येईल? त्यांच्या कवितांच्या कार्यक्रमांची केवळ संख्या, त्यांच्या कवितांना वाहिलेले ब्लॉग्स, दूरचित्रवाणीवर त्यांच्या कवितांचे आणि गाण्यांचे कार्यक्रम प्रक्षेपित होणं, कॅसेट्सचा तडाखेबंद खप होणं इत्यादी पाहता, लोकप्रियतेबद्दल शंका राहू नये. आणि त्यातसुद्धा, खरे यांच्यासारख्यांचा उदय आणि त्यांची दीर्घकाल टिकलेली लोकप्रियता, म्हणजे नव्वदच्या दशकापासून विस्तारत गेलेल्या आणि आता या प्रसरणाच्या प्रक्रियेने गती पकडलेल्या आपल्या समग्र मध्यमवर्गीयांच्या आशाआकांक्षांचं पडलेलं प्रतिबिंब आहे, अशा प्रकारचं विधान आपण करू शकतो का?

मला आणखी एक मुद्दा जाणवतो. अन्य संदर्भातल्या 'विकाऊ' गोष्टींचं अस्तित्व आपल्याला जाणवत नाही, कारण ती ती क्षेत्रं जरा मोठी असतात. उदा. हिंदी सिनेमा. यात सलमान खानचे सिनेमे पाचशे कोटी रुपयांपर्यंत पोचले आहेत, याचा विशेष त्रास होत नाही; कारण त्याच वेळी इरफान खान, अनुराग कश्यप, विशाल भारद्वाज यांसारखे लोकही लक्षवेधी काम करत आहेत. याउलट मराठी कवितेच्या सुकत गेलेल्या नदीचा हाच एकमेव प्रवाह शाबूत राहिल्यावर त्याचं अस्तित्व नको तितकं जाणवतं.

कुणीतरी कवींना Failed Prophets असं म्हटलेलं आहे. म्हणजे प्रेषित होण्याचा अयशस्वी प्रयत्न करणारे. खर्‍यांमध्ये आपल्याला 'माझे दोन्ही बाहू आकाशात फेकून मी सांगतो आहे, पण कुणीही ऐकायला तयार नाही' असं प्रेषितपण दिसतं का? तर माझ्यापुरतं याचं उत्तर ‘नाही’ असं आहे. खर्‍यांमधला विद्रोह 'मी मोर्चा नेला नाही, मी संपही केला नाही' इथवर येऊन संपतो. धर्मातल्या तत्त्वांना विरोध, किंवा त्याबद्दलचे प्रश्न किंवा त्याबद्दलची मीमांसा वगैरे गोष्टींचा स्पर्श जाणवत नाही. खरं सांगायचं, तर साहित्यशास्त्रातले सिद्धांत, ठोकताळे हे जसेच्या तसे कुठल्याच कृतीला कधीच लागू होत नाहीत. अमुक एक गोष्ट अमुक काळामध्ये अस्तित्वात होती, अशी विधानंच काय ती ढोबळमानानं करता येतात.

आधुनिकतावाद - मॉडर्निझम - ही विसाव्या शतकात आलेली आणि जवळजवळ शतकभर उत्क्रांत होत गेलेली जागतिक साहित्यातली घटना आहे. ढोबळमानाने असं म्हणता येईल, की आधुनिकतेमध्ये 'तार्किक सुसंगती'ला जवळजवळ सोडचिठ्ठी दिलेली आहे. कविता ही कशाचंतरी तात्पर्य असू नये. आर्चबाल्ड मॅक्लाईश (Archibald MacLeish) म्हणून गेला, 'A poem should not mean but be'. त्याच्या या गंमतीशीर म्हणण्याचा अर्थ हा असा आहे. आणि दुसरं म्हणजे साहित्याने सांगू नये, दाखवावं. म्हणजे असं की 'मला दु:ख झालं किंवा मला भीती वाटते' यापेक्षा 'माझे हात थरथर कापू लागले' असं. विल्यम कार्लोस विल्यम्स (William Carlos Williams) या अमेरिकन कवीचं 'No Ideas But in Things.' हे वचन हे मॉडर्निझमच्या एकंदर खजिन्याची एक किल्ली गणली जातं. त्याचा अर्थ ढोबळमानाने हा असा आहे : जीवनाच्या व्यामिश्र अनुभवाचा संपूर्ण अर्थ लेखकालाही कळला असेलच हे कशावरून? तेव्हा कवीने किंवा लेखकाने जीवनानुभव सादर करावा व त्यावर भाष्य करण्याचं टाळावं हे खरं.

तर मग संदीप खर्‍यांच्या कामाला हे सिद्धांत लागू होतात का? पुन्हा एकदा, हे नमूद करतो की वरील आधुनिकतावादी तत्त्वांचा (निकष?) काटेकोरपणे कुणालाही लावावा, असं माझं म्हणणं नाही. तेव्हा, खर्‍यांना एकट्यांनाच दोष न देता असं म्हणता येईल की लोकप्रिय कवितेचा सर्व प्रवास हा यापैकी कुठल्याही गोष्टीशी?,कसलाही संबंध न ठेवता चालू आहे.

कोलटकरांसारख्या कवीला 'बिनाटेलिफोनचा कवी' असं गमतीने म्हटलं जायचं. कारण म्हणे त्यांच्या जवळजवळ पूर्ण आयुष्यात त्यांच्याकडे टेलिफोन नावाचा प्रकार नव्हता. जनसंपर्काचा विषय निघाल्यावर जी. ए. कुलकर्णींची आठवण येणं अपरिहार्य आहे. संदीप खरे आणि त्यांच्यासारख्या परफॉर्मन्सवरच उपजीविका करणार्‍यांच्या या संदर्भातल्या प्रकाराकडे, याही एका दृष्टीकोनातून पाहता येईल.

Wednesday, May 15, 2013

"गावाकडची अमेरिका"

डॉ. संजीव चौबळ यांचं "गावाकडची अमेरिका" हे पुस्तक माझ्या हाती लागलं आणि दोनशे-सव्वादोनशे पानी असलेलं हे पुस्तक पटकन् वाचून झालंसुद्धा. अमेरिकेतल्या मराठी जीवनाची चित्रणे करणार्‍या कथा/कादंबर्‍या/प्रवासवर्णने (आता यात दैनिक सकाळ मधल्या मुक्तपीठ सदरातलं लिखाणही आलंच!) , "फॉर हिअर ऑर टू गो?" सारखी इमिग्रंट-स्टडी ची पुस्तकं आता मराठीमधे रुळली आहेत. या सर्व पुस्तकांचा कमी अधिक फरकाने दृष्टिक्षेप हा, अमेरिकेत येऊन राहिलेल्या मराठी लोकांवर आहे. त्यांमधली अमेरिकेची वर्णने येतात ती इमिग्रंटस् च्या संदर्भातली असतात. अमेरिकेत साठी-सत्तरीमधे आलेले डॉक्टर-आर्किटेक्ट्स असोत की नव्वदीनंतर आलेले आयटी कर्मचारी असोत, त्या सार्‍यांचं वास्तव्य बहुतांशी शहरांमधलं. शहरी वस्त्यांमधे काम करतानाचे सहकर्मचारी , उपनगरी वास्तव्यादरम्यान मुलांच्या मित्रमैत्रिणींचे पालक , डॉक्टरादि व्यावसायिक इत्यादि घटकांमार्फत दिसलेली अमेरिका आता वाचकांना काहीशी परिचित झालेली आहे.

प्रस्तुत पुस्तक लिहिलं आहे अमेरिकास्थित मराठी माणसानेच. मात्र डॉ. चौबळ आणि त्यांचं कुटुंब दाटीवाटीच्या मराठी वस्तीमधे क्वचितच राहिलं. त्यांचं वास्तव्य बहुतांशी राहिलं आयोवातल्या एका अतिशय छोट्या लोकवस्तीच्या ठिकाणी. आयटीच्या नोकर्‍यांची लाट आली त्या काळात अमेरिकेत ते आले खरे, परंतु पशुवैद्यकीच्या डॉक्टरकीची पदवी घेऊन. गावात जेमतेम दोन भारतीय कुटुंबे आणि जे दुसरं कुटुंब होतं ते काही कालावधीत गाव सोडून गेलेलं.

चौबळांच्याच शब्दांत सांगायचं तर "न्यूयॉर्क, वॉशिंग्टन, लॉस एंजेलिस, शिकागो म्हणजेच काही अमेरिका नाही. या मोठ्या, अतिप्रगत शहरांच्या अल्याड-पल्याडदेखील दुसरी एक अमेरिका विखुरलेली आहे. साधंसुधं जीवन जगणारी, शेतात राबणारी, शहरी जीवनाचा वारा न लागलेली, देवभोळी – प्रसंगी कर्मठ धार्मिक – अशी ही ग्रामीण अमेरिका. "

मला स्वतःला चौबळांचं हे छोटेखानी पुस्तक विशेषतः अन्य इमिग्रंट राईटींगच्या संदर्भात अधिक आवडलं याचं प्रमुख कारण म्हणजे चौबळांची चौकस दृष्टी, एकंदर ग्रामीण व्यवस्थेचं वर्णन करताना दिलेली आकडेवारी , त्या आकडेवारीमधून निर्देशित केलेले वास्तवाचे निरनिराळे पैलू, त्या आकडेवारीपलिकडच्या छोट्या छोट्या गोष्टीसुद्धा. या खंडप्राय देशातल्या प्रचंड मोठ्या प्रदेशातल्या ग्रामीण भागात फक्त १८ टक्के जनता कशी राहाते, तिथलं जीवनमान कसं आहे, कुठली राज्ये शेतीप्रधान आहेत, शेती करण्याच्या प्रक्रियेमधे क्रमाक्रमाने बदल कसे होत गेले, तंत्रज्ञानाने नक्की कसा फरक पडला, आधुनिक अमेरिकन शेती आणि पशुपालनाचं स्वरूप , त्यातल्या खाचाखोचा , समस्या आणि त्यावरच्या वर्तमानकालीन आणि भविष्यातल्या उपाययोजना असा एकंदर सांगोपांग आढावा यात आहे.

मात्र हे पुस्तक निव्वळ आकडेवारीत अडकलेलं नाही. चौबळांची कंट्री म्युझिकची - अगदी शून्यापासून - विकसित झालेली आवड, त्यांनी आजूबाजूच्या परिसरात पाहिलेल्या प्राणिसृष्टी आणि ग्रामीण जीवनाचे कॅमेर्‍यावाटे टिपलेले क्षण , आणि हो - खुद्द चौबळांनीच काढलेली प्राण्यांची रेखाचित्रेही. यात मधे मग थँक्सगिव्हिंग सेल मधे झालेल्या धावपळीची - आणि फजितीची गमतीदार गोष्ट येते, "रूट ६" या आवडत्या रस्त्याशी जडलेल्या नात्यावरचं एक प्रकरण येतं. चौबळांनी अमेरिका पाहिली ती निव्वळ डोळ्यांनीच नव्हे. इथल्या लोकांचे रीतीरिवाज, त्यांची धार्मिकता यांकडे त्यांनी डोळसपणे पाहिले आहे. या देशात रहात असताना, हा देश कसा बदलत गेला त्याचं ऐतिहासिक भान चौबळांच्या लिखाणातून प्रतीत होतं.

एवढं सगळं करून, आपल्याला अमेरिका समजली असा लेखकाने कुठेही दावा केला नाही. नैसर्गिक वैविध्याने संपन्न असलेला हा खंडप्राय देश इतका प्रचंड आहे की निव्वळ ग्रामीण जीवन लक्षांत घेतलं तरी चौबळांचं लिखाण सर्वसमावेशक नाही आणि ते त्यांनी अगदी सहजपणे मान्य केलेलं आहे.

या पुस्तकाचा सहजपणा, वेगळेपणा आणि कुठलाही आव न आणता , मात्र अचूक निरीक्षण आणि योग्य ते विश्लेषण यांची जोड देऊन केलेले परिणामकारक वर्णन म्हणून हे छोटेखानी पुस्तक मला विशेष आवडले.

पुस्तकाचे शीर्षक : "गावाकडची अमेरिका"
लेखक : डॉ. संजीव चौबळ
प्रकाशक : मराठीसृष्टी, ठाणे
किंमत : रुपये ३५०

अमेरिकेत हे पुस्तक ऑनलाईन ऑर्डर करून मिळण्याकरताचे दुवे :

http://www.bookganga.com/eBooks/Book/4644779470285255546.htm
http://kharedi.maayboli.com/shop/home.php

Wednesday, November 23, 2011

दिवाळी अंकांचा लेखाजोखा

२०११ सालची दिवाळी आली आणि गेली. दिवाळीशी संबंधित उत्सवाइतकंच तिच्या सांस्कृतिक संदर्भाचंही महत्व वेगळं सांगायला नको. फटाके, कपडेलत्ते, फराळ, स्नेहसंमेलनं यांच्या जोडीने रांगोळी , संगीताच्या मैफली आणि अर्थातच दिवाळी अंक हे येणारच. प्रस्तुत लेखात यंदाच्या दिवाळी अंकांबद्दल जी मतेमतांतरे बनत आहेत त्याबद्दल बोलावे असे वाटले म्हणून हा लिखाणाचा प्रपंच.

मराठी आंतरजालावरही दिवाळी अंकांची परंपरा चांगलीच जोम धरते आहे. बहुतेक सर्व सुप्रसिद्ध मराठी स्थळांचे दिवाळी अंक प्रसिद्ध झालेले आहेत. प्रस्तुत लेखात मात्र, अनेक दशकांची परंपरा असलेल्या छापील मराठी दिवाळी अंकांबद्दल थोडं बोलेन म्हणतो.

दिवाळी उलटून पंधरा-वीस दिवस झाले तरी पोस्टाने मागवलेले अंक पोचायचं चिन्ह नव्हतं. शेवटी एकदाचे पोचले. आल्याआल्या सर्वच्या सर्व अंक एकामागोमाग एक चाळले. मुखपृष्ठ, आतील मजकूराचं स्वरूप , त्याची छपाई , सजावट , आणि मुख्य म्हणजे एकेका अंकाचा सूरताल समजून घेण्याचा प्रयत्न केला. थोडक्यात , एखादं गुर जसं समोर ठेवलेल्या गवताच्या अनेक भार्‍यांना सुरवातीला चिवडतं आणि मग एकेका भार्‍यातल्या "माला"ला तोंडात भरून नंतर सावकाश रवंथ करतं त्यातला प्रकार.

अजून सर्वच्या सर्व दिवाळी अंक अथ पासून इतिपर्यंत वाचून व्हायचे आहेत. ही प्रक्रिया पूर्ण व्हायला अनेक आठवडे जावे लागतील. मात्र आतापावेतो काही "फर्स्ट इम्प्रेशन्स" झालेली आहेत. अनेक ठिकाणी निव्वळ चाळायला सुरवात झाली आणि एखादं लिखाण पूर्ण वाचल्याशिवाय थांबता आलं नाही. समग्र वाचन झाल्यानंतर कदाचित संपूर्णत्वाचं कलम भागेल, परंतु , ताज्या ताज्या लिखाणातली मजा जाईल. म्हणून हा लेखाजोखा आताच मांडावा असं वाटलं.

असो. माझ्याकडे खालील अंक आलेले आहेत :
मुक्तशब्द, मौज , अक्षर, प्रहार , चिन्ह , इत्यादि, संपूर्ण अनुवाद , लोकमत-दीपोत्सव , मटा, लोकसत्ता, साप्ताहिक सकाळ , कालनिर्णय , लोकप्रभा, पद्मगंधा , साधना.

काही निरीक्षणं/मतं मांडतो. विरोधी मतं , अधिक, वेगळी माहिती या सर्वांचं अर्थातच स्वागत आहे.

अजून खरं म्हणजे असं विधान एकदम करणं धाडसाचं होईल , पण "मुक्तशब्द"च्या प्रेमात मी सध्या आहे आणि मला हा अंक सर्वात अधिक आवडलेला आहे. प्रस्तुत वार्षिक प्रकाशन माझ्या माहितीप्रमाणे गेली पाचेक वर्षेच प्रसिद्ध होतं आहे. या पाच वर्षांत या प्रकाशनाने जमा केलेले लोक , त्यांनी केलेलं लिखाण , त्याची गुणवत्ता , या सार्‍याबद्दल मला अत्यंत आदर वाटतो. मुंबईचे श्री येशू पाटील या अंकाचे सर्वेसर्वा आहेत (संपादकपदीही तेच आहेत. ) सुरवातीला मेघना पेठेंनी यांचं संपादकत्व निभावलं होतं. त्यानंतर मुकुंद कुळे यांनी. आता श्री पाटीलच संपादकाच्या पदावर दिसतात. दर वर्षी कुठलं ना कुठलं "फीचर" हा अंक करतो. गेल्या वर्षी ( की दोन वर्षांमागे ) "प्रत्येक क्षेत्रातले खलनायक" असा विषय होता. त्यावेळी उद्योगक्षेत्रातल्या मुकेश अंबानी पासून ते साहित्यातल्या भालचंद्र नेमाडे यांच्या पर्यंतच्या अनेकांच्या कारकिर्दीवर कठोर प्रहार करणारं लिखाण आलेलं होतं. यंदाची "थीम" होती "विचारतुला" , अर्थात, विचारांची तुलना. विविध क्षेत्रांमधले दोन मान्यवर घेऊन त्यांच्यावर लिहिण्याचा उपक्रम. या फीचरमधल्या लेखाची यादीच देतो म्हणजे त्याच्या वैविद्ध्याची कल्पना येऊ शकेल.

"श्रीकृष्ण/जरासंध" - रविंद्र गोडबोले
"ज्ञानेश्वर/चक्रधर" - मुकुंद कुळे
"न्यूटन/लिब्नीझ" - अच्युत गोडबोले
"नेहरू/आंबेडकर " - नामदेव ढसाळ
"पलुस्कर/भातखंडे" - श्रुति सडोलीकर
"भीमसेन/कुमार" - मुकुंद संगोराम
"सॉमरसेट मॉम /गी द मोपासा" रेणु गावस्कर
"इरावती कर्वे/दुर्गा भागवत" - ज्ञानदा देशपांडे
"भालचंद्र नेमाडे/विलास सारंग" - नितीन रिंढे
"जयवंत दळवी/पु ल देशपांडे" - मुकुंद टाकसाळे
"नामदेव ढसाळ/राजा ढाले" - राहुल कोसंबी
"कुमार केतकर/ अरुण टिकेकर" - मुकुंद टाकसाळे
"अंतोनिओनी/बर्गमन" निखिलेश चित्रे
"ग्रेस/महानोर" रणधीर शिंदे
"विजया मेहता/सत्यदेव दुबे" - शफाअत खान
"धीरुभाई अंबानी/नारायण मूर्ती" - नितीन पोतदार
"नसीर/ओम पुरी" - श्रीकांत बोजेवार
"पतौडी/सौरभ गांगुली" - द्वारकानाथ संझगिरी

याखेरीज मुक्तशब्द हा अंक मला विशेष आवडण्याचं कारण म्हणजे रमेश इंगळे उत्रादकरांसारख्यांच्या कविता, जीके ऐनापुरे , कृष्णात खोत यांच्या सारख्यांच्या कथा, यांचा परिचय या अंकामुळे मला झाला. यंदासुद्धा ही परंपरा चालू आहेच. त्याशिवाय अनुवादित कथांचा वेगळा विभागही यंदा आहे. या सर्वांच्या दर्जाबद्दल दुमत होणे शक्य आहे परंतु हा सर्व , साहित्याच्या क्षेत्रातल्या नव्या लोकांमधल्या उत्तम लोकांपर्यंत पोचण्याचा , त्यांच्या कडून लिहवून घेण्याचा एका गंभीर पातळीवरचा प्रयत्न आहे या बद्दल माझ्या मनात शंका नाही.

वादग्रस्त होण्याचा धोका स्वीकारून मला हे विधान करावेसे वाटते की, प्रस्तुत घटकेला या अंकाकडे वैचारिक नेतृत्व आल्यासारखे वाटते आहे. पन्नाशीच्या दशकात सत्यकथा आणि मौज प्रकाशनाने ज्या प्रकारे नवीन लोकांना एकत्र आणून नवं घडवण्याचा प्रयत्न केला त्या जातीचं काम चालू आहे असं मला वाटतं. असो.

इतर काही अंकांकडे वळतो. "चिन्ह" या , चित्रकलेला - खरे सांगायचे तर फाईन आर्टस् असं म्हणायला हवं - वाहिलेल्या प्रकाशनाचा बरेच महिने गाजत असलेला अंक या दिवाळीला प्रसिद्ध झालेला आहे. दृष्यकलेमधल्या विचारांना मराठीतून वाव मिळावा, नामवंत लोकांचं काम आणि त्यांचे विचार मराठीतून मांडले जावेत म्हणून श्री. सतीश नाईक हा अंक गेलं दशकभर (की अधिक ?) काढत आहेत. हे प्रकाशन वार्षिक आहे आणि त्यांचा प्रत्येक अंक संग्राह्य असतो. प्रभाकर कोलते , सूझा , आरा , गायतोंडे अशा आंतराष्ट्रीय ख्यातीच्या कलावंतांच्या कामाची ओळख , प्रसंगी प्रदीर्घ मुलाखती आणि प्रत्येक वार्षिक अंकात भरगच्च आर्टप्लेट्स. पाश्चात्य देशात आणि भारतातल्या इंग्रजी माध्यमामधे जो प्रकार मोठ्या प्रमाणावर होतो त्या दर्जाचं काम मराठीतून होणं , ते आपल्याला पहायला मिळ्णं ही एक अत्यंत आनंदाची बाब आहे असं मानतो. "चिन्ह"चा यंदाचा अंक नग्नतेबद्दल आहे आणि या प्रकाराची परंपरा , या प्रकाराचे भारतीय संदर्भ, त्या प्रकाराला जोडून आलेली वादग्रस्तता, हुसैन सारख्यांचा अपरिहार्यपणे येणारा विषय , भारतीय चित्रकारांनी या क्षेत्रांत पूर्वी आणि आता केलेले काम , त्यातल्या नैतिक/सामाजिक/राजकीय गुंतागुंती या सार्‍यांचा उत्तम आर्टप्लेट्स सकट दिलेला एक श्रीमत् अनुभव म्हणजे चिन्ह. चिन्ह बद्दल - किंबहुना मी उल्लेख करत असलेल्या प्रकाशनांपैकी अनेकांबद्दल - स्वतंत्र लेख लिहिणे योग्य होईल. ते जमेल न जमेल म्हणून सध्या इतपत माहिती देतो आहे.

२०११ चे दिवाळी अंक वाचताना , एकंदरीत अलिकडच्या वर्षांमधल्या दिवाळी अंकांच्या ट्रेंड्स बद्दल विचार करताना काही गोष्टी जाणवल्या.

अ. ललित वाङ्मयाचा घसरलेला टक्का : एकंदरीत सर्व सुप्रतिष्ठित अंकांवर नजर टाकली असतां हे सहजच कळतं की नॉन-फिक्शन ने ६०, ७०, ८० टक्के - आणि "साधना"सारख्यांच्या संदर्भात बोलायचे तर १०० टक्केसुद्धा - मजकूर व्यापलेला आहे. यातून अनेक शक्यता नोंदवता येतील.
१. दर्जेदार ललितलिखाणाचा अभाव
२. ललित लिखाणाला अलिकडच्या काळात सातत्याने सोसावी लागलेली घसरत्या लोकप्रियतेची झळ
३. एकंदरीतच , माहिती, ज्ञान , इत्यादि गोष्टींचे ललितकृतींवर झालेले वर्चस्व.

या सर्वांबाबत मला एकट्याला निश्चित मतप्रदर्शन करता येईलच असे नाही. पण "द रायटिंग इज ऑन द वॉल" हे खरं.

ब. छापील माध्यमांनी ऑनलाईन मराठी लिखाणाची अतिशय स्पष्टपणे घेतलेली दखल : छापील आणि ऑनलाईन प्रकाशनांमधल्या लोकांचा एकमेकांच्या सदर्भातला सवतासुभा नवा नाही. छापीलवाले ऑनलाईन वाल्यांकडे गांभीर्याने पाहात नाहीत आणि ऑनलाईनवाल्यांना छापीलवाले सरंजामशाही सारखे , उच्चभ्रू , रटाळ , एकदिशीय वाटतात. यंदा मात्र प्रहार , अक्षर यांच्या सारख्यांनी ऑनलाईन माध्यमाची दखल निश्चित घेतलेली आहे. रामदास आणि चिंतातुर जंतू यांचे ऑनलाईन माध्यमातल्या मराठी लिखाणासंबंधातले लेख प्रहार ने छापलेले आहेत. अक्षरने सुद्धा एक संपूर्ण विभाग या बाबत दिलेला आहे. या लिखाणांमधून ऑनलाईन माध्यमातल्या लोकांच्या शक्तीस्थानांची , या माध्यमाच्या भविष्यकालीन अधिकाधिक मोठ्या सहभागाची नोंद घेतलेली तर आहेच. अभिजित ताम्हाणेंसारख्या ज्येष्ठ पत्रकाराने "अधिक गुणी मराठी ब्लॉग असावेत, अधिकाधिक प्रगल्भ लोकांनी मराठी ब्लॉग लिहावेत अशी अपेक्षा व्यक्त केलेली आहे". विश्राम गुप्तेंनी आपल्या एका लेखात "ब्लॉगलिखाण म्हणजे निव्वळ बडबड" अशी टिप्पणीही केल्याचं दिसतं आहे. थोडक्यात अजून अढी पूर्ण संपलेली नाही. अनेक दिवाळी अंकांमधल्या लेखाच्या अखेरीस लेखकाचा इमेल पत्ता दिला गेलेला आहे. (एका दिवाळी अंकात फक्त इमेल पत्ताच दिला आहे. बाकी डिटेल्स नाहीतच. )

क. कलेची गुणवत्ता आणि मार्केटेबिलिटीचा घातला गेलेला मेळ : या संदर्भात वेगवेगळ्या दिवाळी अंकांनी वेगवेगळे मार्ग चोखाळलेत असं म्हणायला हवं. साधनाचा गेल्या वर्षीचा दिवाळी अंक अर्थातच वाचनीय होता. परंतु इतरांपेक्षा बराच जाड असलेल्या या अंकात जाहिराती बेसुमार होत्या. यंदा या अंकाचा साईज जरा नॉर्मल आहे. पण तरी जाहिरातींचा टक्का मोठाच दिसतो. महाराष्ट्र टाईम्स ने वर म्हण्टल्याप्रमाणे , मुखपृष्ठसुद्धा स्पॉन्सर केल्यासारखे दिलेले आहे (त्यात सिरियलचं बॅनर नाही इतकंच ). मार्केटिबिलिटीचा मुद्दा केवळ जाहिरातीपुरता मर्यादित नाही, हा मुद्दा "लोकमत"च्या दिवाळी अंकातून उत्तम रीतीने देता येईल. या अंकाचे अतिथिपद शोभा डेंकडे आहे. त्याच्या मुखपृष्टावर डे बाईंबरोबर अमिताभ बच्चन, करीना कपूर , नीता अंबानी (!) यांच्या सारख्यांच्या नावाची जंत्रीच आहे. संपूर्ण दिवाळी अंक महागड्या ग्लॉसी पेपरवर छापला गेलेला आहे. अर्थात आतमधे उपरोल्लेखित चमकदमकत्या नावांखेरीज रामचंद्र गुहा यांच्या सारख्यांचेही (प्रसंगी अनुवादित) लेख देऊन बॅलन्स साधण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे. मेघना ढोके या तरुण पत्रकाराचा या अंकात प्रदीर्घ लेख आहे आणि एक स्वतंत्र लेख म्हणून तो या अंकातला सर्वात चांगला ठरावा. शोभा डें नी केवळ "मी माहेरला आलेले आहे" अशा स्वरूपाचे मांगल्यवाचक गोऽड टिपण लिहिले आहे इतकाच त्यांचा सहभाग. बाकी बच्चन, अंबानी, कपूर यांचा संपर्क साधून देणे इतकंच काम केलेलं दिसतं. बच्चन , अंबानी , कपूर यांचे "लेख" अर्थातच भाषांतरित तर आहेतच पण ते मूळ लेख सुद्धा त्यांनी "लिहिलेले" नाहीत, शब्दबद्ध केलेले आहेत. या अंकाच्या दहा दहा हजाराच्या चार एडीशन्स खपल्या आहेत असं मला कळलं. किंमत केवळा शंभर रुपये - जी अर्थातच पेपर क्वालिटी लक्षांत घेता अत्यंत कमी आहे. याचा अर्थ सर्व पैसे जाहिरातीतून . ब्रँड च्या मार्केटीबिलिटीचं याहून उत्कृष्ट उदाहरण दिवाळी अंकांच्या संदर्भात मला सापडणं प्रायः अशक्य आहे.



दिवाळी अंकांबद्दलची प्रस्तुत चर्चा पहिली नाही. इतरांनीही या विषयाबद्दल लिहिलं आहे. प्रस्तुत ब्लॉग एंट्रीचं उदाहरण पहा. हा लेख यंदाच्या दिवाळी आधी आलेला होता.
http://ramjagtap.blogspot.com/2011/09/blog-post_17.html

उपरोल्लेखित लेखाबद्दल :

"दिवाळी अंकांचा दर्जा घसरला आहे" अशा स्वरूपाची मते असणे सहज शक्य आहे. तशी मते मांडण्यालाही हरकत नाही. बरीच नावं घाऊक प्रमाणात घेतली गेली आहेत. हे सर्व ग्राह्यतेच्या कक्षेत यायला कसलीच ना नाही. मात्र "अमुक लेखक/लेखिकांनी आता लिहू नये" असं म्हणणं काहीसं रोचक आहे. मला व्यक्तिशः अशा स्वरूपाची विधाने आवडत नाहीत खरी.

दिवाळी अंकाना - आणि एकंदर सांस्कृतिक पर्यावरणामधे - मांद्य आलेले आहे. ही सद्दी सुमारांची आहे अशा स्वरूपाची मते अधून मधून मांडली जात असतात. माझ्यामते या सर्व चक्रमेनिक्रमेण घडणार्‍या गोष्टी आहेत. काही क्षेत्रांमधे काही काळ एकंदर अ‍ॅक्टिव्हिटीज् कमी होतात. काही काळ तेजीचा असतो. "सध्याचा काळ मोठा वाईट आला" अशा स्वरुपाच्या विधानांमधे स्मरणरंजनपर चुका तर होत नाहीत ना ? "जुने ते हिरण्मय, नवे ते टाकाऊ" अशी एकांगी भूमिका आपण घेत नाही आहोत ना ? हे तपासून पहाणे महत्त्वाचे. ज्या काळात आपण जगतो त्या काळाचे मूल्यमापन त्याच चालू क्षणी करू शकणे हे कठीण काम आहे. जगतापांनी "अमुकांचे लिखाण वाईट होते. यांनी थांबावे" असं म्हणताना लेखकांची जंत्री दिली आहे. त्याबरोबर त्यांनी नव्या जोमाच्या किंवा अनेक वर्षं लेखन करतानाही नवनवीन वाटा धुंडाळणार्‍या व्यक्तींची नावे लिहिली असती तर बरे झाले असते. आपण हे विसरता नये की, आसाराम लोमटे, समर खडस, जयंत पवार, निखिलेश चित्रे, जयदेव डोळे, कृष्णात खोत, यांच्यासारखे लेखक आपल्याला अलिकडच्या दिवाळी अंकांमार्फतच भेटलेले आहेत. या सर्वांनीही आपल्या लेखण्या मोडाव्यात असे त्यांचे म्हणणे आहे काय ? :)

असो. जगतापांनी टाकलेले क्षकिरण साठीच्या दशकातल्या अशोक शहाण्यांपासून अलिकडे हर्डीकरांपर्यंत अनेकांनी टाकलेले आहेत आणि अशा स्वरूपाचा रिअ‍ॅलिटी चेक चांगलाच. मात्र, सुक्याबरोबर ओल्यालाही जाळणे, "throwing the baby out with the bath water" या संदर्भातला रिअ‍ॅलिटी चेक क्षकिरणाच्या उपकरणांनी करायला हरकत नाही :)