Tuesday, December 9, 2008

बुकोव्स्की यांच्या एका कवितेचा अनुवाद

An Almost Made Up Poem:
see you drinking at a fountain with tiny
blue hands, no, your hands are not tiny
they are small, and the fountain is in France
where you wrote me that last letter and
I answered and never heard from you again.
you used to write insane poems about
ANGELS AND GOD, all in upper case, and you
knew famous artists and most of them
were your lovers, and I wrote back, it’ all right,
go ahead, enter their lives, I’ not jealous
because we’ never met. we got close once in
New Orleans, one half block, but never met, never
touched. so you went with the famous and wrote
about the famous, and, of course, what you found out
is that the famous are worried about
their fame –– not the beautiful young girl in bed
with them, who gives them that, and then awakens
in the morning to write upper case poems about
ANGELS AND GOD. we know God is dead, they’ told
us, but listening to you I wasn’ sure. maybe
it was the upper case. you were one of the
best female poets and I told the publishers,
editors, “ her, print her, she’ mad but she’
magic. there’ no lie in her fire.” I loved you
like a man loves a woman he never touches, only
writes to, keeps little photographs of. I would have
loved you more if I had sat in a small room rolling a
cigarette and listened to you piss in the bathroom,
but that didn’ happen. your letters got sadder.
your lovers betrayed you. kid, I wrote back, all
lovers betray. it didn’ help. you said
you had a crying bench and it was by a bridge and
the bridge was over a river and you sat on the crying
bench every night and wept for the lovers who had
hurt and forgotten you. I wrote back but never
heard again. a friend wrote me of your suicide
3 or 4 months after it happened. if I had met you
I would probably have been unfair to you or you
to me. it was best like this.

Charles Bukowski

बुकोव्स्की यांची क्षमा मागून केलेले माझे भाषांतर :

त्या कारंज्यापाशी पीत बसलेली तुला नेहमी पहाणारा मी
निळसर, इवल्याशा हातांची तू, नाही तुझे हात इवले नाहीत,
पण होते छोटेच; आणि तो कारंजाही फ्रान्समधला
जिथून तू लिहीले मला तुझे शेवटचे पत्र आणि
मी उत्तर लिहीले आणि त्यावर मला कधीच काही कळले नाही तुझ्याकडून.
जाड , ढोबळ शब्दांत खुळ्या कविता लिहायचीस तू
देव नि त्याच्या दूतांबद्दल; सगळ्या बड्या कलावंताना ओळखायचीस
नि त्यातले जवळजवळ सगळे तुझे आशक. मी लिहीले, ठीक आहे बाई,
जा त्यांच्या मागे. मी कशाला जळू - नाहीतरी भेटलोय कुठे कधी आपण.
जास्तीत जास्त जवळ आलो होतो न्यू ऑर्लीन्समधे , अर्ध्या रस्त्यावर होतो
एकमेकांच्या ; पण भेट नाही , स्पर्श नाही. त्यामुळे तू त्या बड्यांबरोबर गेलीस
नि बड्यांबद्दल लिहीत राहिलीस , आणि अर्थातच , तुला कळले होते एव्हाना
की मोठ्या लोकांना पर्वा असते आपल्या प्रसिद्धीबद्दलच,
पण त्याना शय्येमधे "ते" देणार्‍या आणि सकाळी उठून
जाड , ढोबळ शब्दांत देव नि त्याच्या दूतांबद्दल खुळ्या कविता लिहीणार्‍या
सुंदर, तरुण मुलीबद्दल त्याना काहीही देणेघेणे नाही.
देव मेलाय, आपल्या सगळ्याना तर ते ठाऊकच आहे. पण
तुझ्या कविता वाचून वाटायचे - कुणास ठाऊक ? कदाचित
त्या जाड ढोबळ शब्दांमुळे असेल, तू सर्वोत्तम कवयत्रींपैकी वाटायचीस
म्हणून मी प्रकाशकांना सांगितले : "तिच्या , तिच्या कविता छापा.
ती वेडी असेल पण तिच्यात जादू आहे. आणि तिच्यातल्या निखार्‍यांमधे
कसलेच नाही हीण." एखाद्या स्त्रीवर केवळ पत्रांवाटे ,
तिचे छोटेसे फोटो खिशात बाळगून, अस्पर्श प्रेम करणार्‍या
प्रियकराप्रमाणे होतो मी. कदाचित आपण एकाच खोलीत असताना मी
सिगारेट्स हुंगत बसताना नि बाजूच्या बाथरूममधून तुझ्या
लघवीचा आवाज ऐकताना कदाचित मी तुझ्यावर
आतापेक्षा जास्त प्रेम केलेही असते. पण ते व्हायचे नव्हते.
तुझ्या पत्रांचा सूर आर्त होत गेला - तुझ्या सर्व आशकानी तुला फसवले होते.
पोरी , मी लिहीले , सर्वच आशक फसवणूक करतात.
त्याचा काही उपयोग नाही झाला . तू म्हणालीस तुझा एक रडण्याचा बाक होता,
एका पूला शेजारी नि तो पूल होता नदीवर आणि तू त्या बाकावर रोज रात्री
तुला दुखावणार्‍या नि विसरून गेलेल्या आशकांबद्दल शोक करत बसायचीस.
मी उत्तर लिहीले पण नंतर तुझी उत्तरे थांबली.
तुझ्या आत्महत्येनंतर तीन-चार महिन्यानी
एका मित्राने त्याबद्दल मला कळवले. जर आपण भेटलो असतो
तरी मी तुला नि तू मला न्याय दिला नसताच. त्यामुळे जे झाले तेच उत्तम .

बुकोव्स्की यांच्या एका कवितेचा अनुवाद

An Almost Made Up Poem:

see you drinking at a fountain with tiny
blue hands, no, your hands are not tiny
they are small, and the fountain is in France
where you wrote me that last letter and
I answered and never heard from you again.
you used to write insane poems about
ANGELS AND GOD, all in upper case, and you
knew famous artists and most of them
were your lovers, and I wrote back, it’ all right,
go ahead, enter their lives, I’ not jealous
because we’ never met. we got close once in
New Orleans, one half block, but never met, never
touched. so you went with the famous and wrote
about the famous, and, of course, what you found out
is that the famous are worried about
their fame –– not the beautiful young girl in bed
with them, who gives them that, and then awakens
in the morning to write upper case poems about
ANGELS AND GOD. we know God is dead, they’ told
us, but listening to you I wasn’ sure. maybe
it was the upper case. you were one of the
best female poets and I told the publishers,
editors, “ her, print her, she’ mad but she’
magic. there’ no lie in her fire.” I loved you
like a man loves a woman he never touches, only
writes to, keeps little photographs of. I would have
loved you more if I had sat in a small room rolling a
cigarette and listened to you piss in the bathroom,
but that didn’ happen. your letters got sadder.
your lovers betrayed you. kid, I wrote back, all
lovers betray. it didn’ help. you said
you had a crying bench and it was by a bridge and
the bridge was over a river and you sat on the crying
bench every night and wept for the lovers who had
hurt and forgotten you. I wrote back but never
heard again. a friend wrote me of your suicide
3 or 4 months after it happened. if I had met you
I would probably have been unfair to you or you
to me. it was best like this.

Charles Bukowski

बुकोव्स्की यांची क्षमा मागून केलेले माझे भाषांतर :

त्या कारंज्यापाशी पीत बसलेली तुला नेहमी पहाणारा मी
निळसर, इवल्याशा हातांची तू, नाही तुझे हात इवले नाहीत,
पण होते छोटेच; आणि तो कारंजाही फ्रान्समधला
जिथून तू लिहीले मला तुझे शेवटचे पत्र आणि
मी उत्तर लिहीले आणि त्यावर मला कधीच काही कळले नाही तुझ्याकडून.
जाड , ढोबळ शब्दांत खुळ्या कविता लिहायचीस तू
देव नि त्याच्या दूतांबद्दल; सगळ्या बड्या कलावंताना ओळखायचीस
नि त्यातले जवळजवळ सगळे तुझे आशक. मी लिहीले, ठीक आहे बाई,
जा त्यांच्या मागे. मी कशाला जळू - नाहीतरी भेटलोय कुठे कधी आपण.
जास्तीत जास्त जवळ आलो होतो न्यू ऑर्लीन्समधे , अर्ध्या रस्त्यावर होतो
एकमेकांच्या ; पण भेट नाही , स्पर्श नाही. त्यामुळे तू त्या बड्यांबरोबर गेलीस
नि बड्यांबद्दल लिहीत राहिलीस , आणि अर्थातच , तुला कळले होते एव्हाना
की मोठ्या लोकांना पर्वा असते आपल्या प्रसिद्धीबद्दलच,
पण त्याना शय्येमधे "ते" देणार्‍या आणि सकाळी उठून
जाड , ढोबळ शब्दांत देव नि त्याच्या दूतांबद्दल खुळ्या कविता लिहीणार्‍या
सुंदर, तरुण मुलीबद्दल त्याना काहीही देणेघेणे नाही.
देव मेलाय, आपल्या सगळ्याना तर ते ठाऊकच आहे. पण
तुझ्या कविता वाचून वाटायचे - कुणास ठाऊक ? कदाचित
त्या जाड ढोबळ शब्दांमुळे असेल, तू सर्वोत्तम कवयत्रींपैकी वाटायचीस
म्हणून मी प्रकाशकांना सांगितले : "तिच्या , तिच्या कविता छापा.
ती वेडी असेल पण तिच्यात जादू आहे. आणि तिच्यातल्या निखार्‍यांमधे
कसलेच नाही हीण." एखाद्या स्त्रीवर केवळ पत्रांवाटे ,
तिचे छोटेसे फोटो खिशात बाळगून, अस्पर्श प्रेम करणार्‍या
प्रियकराप्रमाणे होतो मी. कदाचित आपण एकाच खोलीत असताना मी
सिगारेट्स हुंगत बसताना नि बाजूच्या बाथरूममधून तुझ्या
लघवीचा आवाज ऐकताना कदाचित मी तुझ्यावर
आतापेक्षा जास्त प्रेम केलेही असते. पण ते व्हायचे नव्हते.
तुझ्या पत्रांचा सूर आर्त होत गेला - तुझ्या सर्व आशकानी तुला फसवले होते.
पोरी , मी लिहीले , सर्वच आशक फसवणूक करतात.
त्याचा काही उपयोग नाही झाला . तू म्हणालीस तुझा एक रडण्याचा बाक होता,
एका पूला शेजारी नि तो पूल होता नदीवर आणि तू त्या बाकावर रोज रात्री
तुला दुखावणार्‍या नि विसरून गेलेल्या आशकांबद्दल शोक करत बसायचीस.
मी उत्तर लिहीले पण नंतर तुझी उत्तरे थांबली.
तुझ्या आत्महत्येनंतर तीन-चार महिन्यानी
एका मित्राने त्याबद्दल मला कळवले. जर आपण भेटलो असतो
तरी मी तुला नि तू मला न्याय दिला नसताच. त्यामुळे जे झाले तेच उत्तम .

एका इंग्रजी कवितेचे भाषांतर

खूप पूर्वी एक कविता नेटावर वाचली होती. तिचे हे भाषांतर. मूळ कवितेच्या कवीचे नाव "शेल्टन" असे आहे. केरळमधला एक माणूस.

कविता मला खूप आवडली होती - अजूनही खूप आवडते.

In the dimly lit
dusty corner of the office
a slim arrogant cigarette sits
contently smoking John.
Beyond the Alps,
a sleepy village awakens to the
sounds of an aimless football
kicking around a bunch of schoolboys.
On the merciless, mine-studded
streets of Kandahar, a piece of
American bread eats
starving, veiled women.
In distant cities,
books read scholars
bikes ride punks
films watch viewers
groceries buy shoppers
pianos play prodigies
pictures paint artists
bikinis wear babes
fires light arsonists
mountains climb daredevils
love makes couples
islands discover explorers
and the dead speak well of mourners.
While on a crowded train
speeding past coconut groves,
a stupid poem writes me.


ऑफिसच्या मंद उजेडात
एका धुळकट कोपर्‍यात
एक बारकीशी सिगारेट
पीत बसली आहे जॉनला
निवांतपणे.
तिकडे आल्प्स पर्वतापलिकडे
एक झोपाळलेले खेडे हळुहळू उठते आहे
शाळकरी पोरांना लाथाडणार्‍या
एका दिशाहीन फुटबॉलच्या आवाजात.
कंदाहारमधल्या क्रूर रस्त्यांवर
अमेरिकन ब्रेडचा तुकडा चघळतो आहे
बुरख्यातल्या एका भुकेल्या बाईला.
दूरदूरच्या नगरांमधे
पुस्तके वाचताहेत विद्वानांना
मोटारबाईक्स चालवताहेत आवारा लोकांना
सिनेमे बघताहेत प्रेक्षकांना
दुकाने खरीदताएत ग्राहकांना
पियानो वाजवताएत वादकांना
चित्रे काढत आहेत कलाकारांना
बिकिनीज घालताएत टंच पोरींना
आगी भडकवताएत घातपाती लोकांना
पर्वत चढताएत साहसवीरांना
प्रणय करतो आहे युगुलांना
बेटे शोधताहेत दर्यावर्दींना
मृतात्मे श्रद्धांजली वाहताएत शोककर्त्यांना.

... जेव्हा नारळीच्या बागांतून पळणार्‍या
एका गच्च भरलेल्या आगगाडीत
एक वेडी कविता लिहीते आहे मला.

"चैत्र"

कै. जी ए कुलकर्णी हे नाव मराठी वाचकांना एक महत्त्वाचे कथालेखक म्हणून चांगले परिचित आहे. त्यांनी लिहीलेल्या सुमारे शंभरेक मराठी कथा हा , आजही वाचक आणि अभ्यासकांकरता वाचनाचा , चिंतनाचा , अभ्यासाचा, विषय आहे.

जीएंनी त्यांच्या सुरवातीच्या काळात लिहिलेली एक कथा म्हणजे "चैत्र". या कथेवर बनविलेला एक छोटासा चित्रपट बघण्याचा योग अलिकडे आला. या चित्रपटाबद्दल थोडे आपल्या मित्रमैत्रिणिंना सांगावे म्हणून या लिखाणाचा प्रपंच. सुरवातीला मूळ कथेबद्दल.

पुढील परिच्छेदांमधे आणि त्यानंतरच्या विवेचनामधे कथानक आणि त्याचे प्रमुख धागेदोरे उघड करत आहे. ज्याना हा चित्रपट पहायचा असेल आणि पहाताना रसभंग होऊ द्यायचा नसेल त्यानी वाचू नये.

जीएंच्या , प्रसंगी लघुकादंबर्‍यांइतक्या मोठ्या आकाराच्या आणि खोलीच्या कथांच्या मानाने ही कथा खूपच छोटी आहे. आधी म्हण्टल्याप्रमाणे, कथालेखक म्हणून आपल्या संपूर्ण शक्तिनिशी लिहिण्याचा काळ अजून यायचा होता. त्या काळातली ही कथा. आयुष्यभर आपल्या लिखाणातून जी एंनी आपल्या आयुष्याबद्दल, त्याच्या अर्थाबद्दल , माणूस म्हणून जगताना भोगाव्या लागलेल्या दु:ख-वेदनांबद्दल लिहीले. लेखक म्हणून सुरवातीच्या काही वर्षांनंतर त्यांच्या कथांचे स्वरूप गुंतागुंतीचे होत गेले, त्यातील दु:खाच्या छटा जास्त जास्त गडद होत गेल्या. आणि , नियती म्हणा , भागधेय म्हणा, त्याच्या वरवंट्याखाली पिचतानाही आपला अभिमान , आपले सत्त्व न हरवणारी माणसे त्यांनी रंगवली. प्रस्तुत कथेतील कथानक हे , त्यांच्या पुढील प्रवासाच्या पाऊलखुणा दाखविणारेच आहे.

कथेचा निवेदक आहे एक साताठ वर्षांचा , गावातल्या एका गरीब (बहुदा ब्राह्मणी) कुटुंबात वाढणारा एका मुलगा. काळ : बहुदा आजपासून सत्तरेक वर्षांपूर्वीचा. कुटुंबात माणसे तीनच. आई-वडील आणि हा छोटा मधू. कथा सुरु होते तेव्हा चैत्र महिना चालू आहे आणि घराघरांमधून हळदी कुंकवाचे कार्यक्रम चालू आहेत. रोज कुठे ना कुठे कार्यक्रम असतो. या छोट्याशा गावातलीच एक बाई घराघरांमधे जाऊन "आजचे हळदीकुंकू कुलकर्ण्यांकडे , आजचे हळदीकुंकू नाईकांच्या वाड्यावर" अशी दवंडी पिटत जाते. रोज संध्याकाळी सवाष्णी एकमेकांच्या घरी आपापल्या पोरांना घेऊन जातात.

छोटा मधूही नाईकांच्या वाड्यावर आईबरोबर जातो. हा भला थोरला वाडा. मोठी मोठी जाजमे, हंड्या-झुंबरे , अत्तरांचा आणि वेण्यांचा घमघमाट. इतर बायकांबरोबर मधुची आई ओटी भरवून घ्यायला बसते. थोरामोठ्यांकडचा मोठा समारंभ. गर्दी. या गर्दीत इतर पोरांबरोबर खेळतानाही मधूचे लक्ष आईकडे आहे. नाईकबाई एका नोकराणीबरोबर फिरत सगळ्यांची ओटी भरतात. मधूच्या आईची ओटी भरायची वेळ आल्यावर त्यांना वगळून पुढे जातात. मधूची आई वाटा पाहाते आणि शेवटी मालकीण बाईंकडे जाते नि त्याना आठवण करून देते. मालकीण बाईंचा समज झालेला असतो की यांची ओटी भरलेली असतानाही , थोडे आणखी धान्य मिळण्याकरता ही बाई परत पदर पसरून बसली. ती मधूच्या आईचा अपमान करते. एक अवाक्षर न बोलता आई इतकेच म्हणते , की ओटी म्हणजे सवाष्णीचा मान आहे. तो राखण्याकरता तरी ओटी भरा - वाटले तर एक दाणा टाका. न राहवून नाईकबाईची सासूही तसे करायला आपल्या सुनेला विनविते. पण शेवटी मधू आणि आई रिक्तहस्ते घरी परततात.

घरी आल्यावर रात्री एकही शब्द न बोलता आई मधू आणि त्याच्या वडिलांना जेवायला घालते. दुसर्‍या दिवशी ती आपले काही दागिने काढून मधुच्या वडिलांना देते आणि त्याचे पैसे करून एका मोठ्या हळदी कुंकवाची तयारी करायला सांगते. वडील काहीही न विचारता हो म्हणतात. आई त्यांना विचारतेही : "तुम्हाला का असा प्रश्न नाही पडला ?" वडील शांतपणे म्हणतात : "स्वतःकरता कधीही काहीही न मागणारी तू काहीतरी करायला सांगते आहेस. त्यामागे नक्की काहीतरी आहे. मी कशाला विचारू ? उद्या तू म्हणालीस की निखार्‍यावरून चालत जा तर तेही करेन." हे सारे मधू पहातो , नोंदवतो.

दुसर्‍या दिवशी मधूकडे आजवर झाले नसेल इतके मोठे हळदीकुंकू. गावभर दवंडी गेलेली असते - नाईकांकडेही. समारंभ खूप वेळ चालतो. एरवी घराचे मालक असणारे मधूचे बाबा त्या संध्याकाळपुरते घराबाहेर. मधूची आई सगळ्यांची रितीने ओटी भरते , विचारपूस करते. सगळ्या बायकांच्या नजरेत तिच्याबद्दल आदर आणि प्रेम आहे. आईची एक नजर अर्थातच दाराकडे. सगळ्या येऊन गेल्या ; पण नाईक बाई नाहीत. शेवटी खूप उशीरा सासू नि सून आपल्या बग्गीतून हजर होतात. मधूच्या छोट्याशा घरातल्या सजावटीने , आदबशीर , घरंदाज आतिथ्याने भारल्यासारख्या होऊन जातात. भरपूर मोठी ओटी भरून घेताना नाईक सूनबाई इतकेच म्हणते "तुमच्याकडे होते होय हळदीकुंकू ? मला कल्पना नव्हती." दोघी निघतातच.

बग्गीत सून बसलेली असताना सासू क्षणभर आईपाशी येते नि म्हणते : बाई, मनात तळपट धरू नकोस. आता माझं राज्य नाही घरात. नवीन माणसं आली. मी झाल्या प्रकाराने लाजलेले आहे. जमेल तेव्हा याची भरपाई करेन.यावर मधुची आई जे म्हणते ते अगदी साधेच - पण सोन्याच्या अक्षरांनी लिहून ठेवण्यासारखे. ते सांगते : " मी तर झाला प्रकार केव्हाच विसरले. मला त्याचे काहीच महत्त्व नाही. पण त्यावेळी माझा मुलगा समोर होता. त्याला झालेल्या प्रसंगाची आठवण नेहमी राहील. हा हळदीकुंकू सोहळा त्याच्यासाठी. " दूर अंधारात मधू हे सर्व पहातो. बग्गी हलते.

वर्ष उलटते. पुन्हा चैत्र येतो. मधूच्या घरासमोर एके दुपारी बग्गीचा आवाज आल्यावर आई पटकन आत जायला वळते. मधूला सांगते : "नाईकबाई येतील. त्यांना सांग मी न्हाणीघरात आहे. जे सांगतील ते फक्त ऐक. जाताना फक्त करंडा दे कुंकवाचा त्यांना. " मिनिटाभरात सासूबाई दारात येतातच. मधू त्यांना ठरल्याप्रमाणे सांगतो. त्या आलेल्या असतात हळदीकुंकवाचे निमंत्रण द्यायला - जातीने , सर्वात पहिल्या घराचा मान द्यायला. निरोप देतात , कुंकू लावून निघून जातात.

मधू आत येतो. आई त्याला म्हणते : "मधू , आयुष्यात चालताना आपण शक्यतो चिखल टाळावा. शिवाय आपल्या साध्या चालण्याने इतरांवरही तो उडणार नाही याची काळजी घ्यावी. " मधूला काही उमगत नाही. माजघराच्या अंधारात उभ्या आईला म्हणतो : "म्हणजे आपले बाबा गेले हे त्यांना कळू द्यायचे नव्हते होय ?" आणि इतका वेळ आपल्या गंभीर , ताठ चेहर्‍याने वावरणार्‍या आईला हुंदका येतो.

कथानक भाग संपूर्ण

हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे क्रांती कानडे यांनी. आईची भूमिका केली आहे सोनाली कुलकर्णी यांनी. नाईक सासूचे काम लालन सारंग यांचे.

संपूर्ण चित्रपटाची हाताळणी मूळ कथेशी इमान राखणारी , त्या कथेच्या घरंदाजपणाशी इमान राखणारी झाली आहे. कुठेच भडक, बटबटीतपणा नाही. झालेला अपमान , त्याची केलेली भरपाई , साताठ वर्षाच्या मुलावर नकळत घडलेले संस्कार या सगळ्या गोष्टी उत्तम रीतीने टिपल्यात. आई वडीलांमधील शालीन , घरंदाज स्नेहाचे चित्रण , कोसळलेल्या संकटाला धीराने सामना देताना इतरांवर आणि स्वतःवर "चिखल उडू न देण्याची " घेतलेली काळजी आणि हे यच्च्यावत टिपणारे एक बालमन. सत्तर वर्षांपूर्वीच्या ब्राम्हणी घरातले वातावरण , पेहराव , हंड्या-झुंबरे. एकही सैल , अनावश्यक संवाद नाही. मी कानडे यांना सलाम करतो. पालेकरांनी त्यांच्याकडून खूप शिकावे अशातली गत. सोनाली कुलकर्णी यांच्याबद्दल मला थोडी शंका होती. बट शी हॅज नेल्ड द रोल.

हा , केवळ ३० मिनिटांचा चित्रपट दृष्ट लागण्यासारखा झाला आहे.

"वर्जेश ईश्वरलाल सोलंकीच्या कविता"

अलिकडे काही नवीन कवींच्या आंतरजालावर वाचत होतो. एका कवितेपाशी आलो नि वाटले , काहीही झाले तरी या माणसाच्या कविता वाचल्याच पाहिजेत. कवीचे नाव : वर्जेश सोलंकी. सुदैवाने यांचा काव्यसंग्रह हाताशी लागला. कवितासंग्रहाच्या बाबतीत असे क्वचितच घडते की पहिली कविता वाचायला सुरवात करावी नि शेवटची कधी आली ते कळूच नये. प्रस्तुत संग्रहच निव्वळ ६०-६५ पानांचा आहे म्हणून असेल; पण एका बैठकीत वाचून झाला सुद्धा.

१९९० च्या दशकात भारताची व्यवस्था कूस पालटत होती. येणार्‍या नव्या युगाबरोबर नवे प्रश्नही आलेच. शासनाच्या, अर्थव्यवस्थेच्या, समाजव्यवस्थेच्या बदलांची स्पंदने नव्वदीच्या दशकातल्या तरुण कवींच्या रचनांमधे ऐकू यायला लागली. वर्जेश सोलंकी याच पीढीचे कवी. एखाद दोन कवितांचा आस्वाद आपण घेण्याचा प्रयत्न करूया.

शीर्षक : व्हॅक्युमक्लीनर
पसरलो हॉलभर
सुगंधित स्प्रेच्या वासाबरोबर
म्हणून लक्षात नाही आली कुणाला
मोज्यातली दुर्गंधी.

मित्रानं दाखवली
एकेक खोली
कीचन
कोठेच खिडकी नसलेली
आली ऐकू
एक्झॉस्ट् फॅनची संथ घरघर
कण्हल्यासारखी
ताटंबिटं ग्लासंबिसं बशाकप डबेबिबे
नावं लेबलासहित
व्यवस्थितपणे मांडून फडताळावर.

हॉलमधल्या भिंतीच्या रंगाला
मॅचिंग असलेलं सागवानी फर्निचर
बोन्सायची झाडं शोभेच्या वस्तू
गणपतीची कलात्मक फ्रेम
एकंदर सगळं छानच.

आपण त्यात मिसमॅच की काय ?
या विचारानं मी एसीकंटेन्ड रूममधे
घामाघूम.
मित्र म्हणाला:
खिडकीतून पाऊस छानच दिसतो
आणि चंद्र
नुकताच पेंट दिलेल्या बंगल्यासारखा. उजळ.

मी जेवलो
सवय नसताना
काटेचमच्यातून
ताटाभोवती खरकटं पडू न देण्याची खबरदारी घेत.

इतपत सर्व ठीक होतं.
मात्र मित्राच्या बायकोनं कपाटातून व्हॅक्युमक्लीनर काढला
तेव्हा
लटपटलोच
निघालो घाई-घाई करत फ्लॅटबाहेर
वाटलं आता ओढला जाईन की काय ?
फोलपटासारखा
फरशीवरल्या धुळीबरोबर.
----------------------------------------------------------
कविता वाचली आणि त्यातील विनोदाने हसायला आलेच ; पण त्यात टिपलेली विसंगती , आपल्या आयुष्यातील साध्यासुध्या गोष्टींमधे माणसांपेक्षा वस्तूंना आलेले महत्त्व या गोष्टी नजरेआड कशा होतील. मुख्य म्हणजे अगदी नेहमीच्या आयुष्यातल्या संवादांसारखी कविता. ना त्यात कसला अभिनिवेश ना प्रतिमा-उपमांचा सोस.

दुसरी कविता तुमच्यापुढे मांडतो.

शीर्षक : आपण कविता लिहाव्यात का ?

आपण कविता लिहाव्यात का ?
की न लिहाव्या
की लिहाव्याच
आपल्या लिहीण्या न लिहीण्यानं कोठे
फारसा फरक पडणारेय ?
उदा: पेरली जातील काय क्रांतीची बीजं
फ्रस्ट्रेटेड युवा पीढीच्या मनात
क्रीएट होईल काय एखादा पॉझीटीव्ह अप्रोच वगैरे
की आपलं लिहीणं म्हणजे
बापाच्या शब्दात
एकंदर भिकारचोटगिरीची प्राथमिक लक्षणं
की
कपाटामागं उंदरानं सोडलेल्या लेंड्या
की
उगाच आतलाबितला आवाज/हुक्की / उत्कटता
की
शब्दांचा उभाआडवा कीस/फापटपसाराकीफलाणा-ढिकाणा.
------------------------------------------------------------------------

"नो कंट्री फॉर् ओल्ड् मेन्"च्या निमित्ताने

काल रात्री "नो कंट्री फॉर् ओल्ड् मेन्"हा यंदाचा ऑस्करविजेता सिनेमा पाहिला. चित्रपट परिणामकारक वाटला असे सांगितले तर आश्चर्य वाटायला नकोच. (उलट "यात तुम्ही काय नवीन सांगताय् राव ! " अशी कुणी खिल्ली उडवेल ; आणि ती योग्यच ठरेल ! असो. )

थोडी चित्रपटाची ओळख करून देतो. पुढील परिच्छेदामधे आणि त्यानंतरच्या विवेचनामधे कथानक आणि त्याचे प्रमुख धागेदोरे उघड करत आहे. ज्याना हा चित्रपट पहायचा असेल आणि पहाताना रसभंग होऊ द्यायचा नसेल त्यानी वाचू नये.चित्रपट १९८० सालातील पश्चिम टेक्सास मधे घडतो. अमली पदार्थाच्या व्यापारातील एका मेक्सिकन गॅंगमधे एका व्यवहारामधे भीषण हिंसा घडलेली आहे. लुआलिन् मॉस् या नावाचा , एकेकाळच्या व्हिएतनाम युद्धात भाग घेतलेला , पण आता अगदी दरिद्री परिस्थितीमधे रहाणारा एक टेक्सास-कर (!) माणूस शिकार करत असताना हा घटनाप्रसंग घडून गेल्यावर घटनास्थळी पोचतो. मेलेल्या अवस्थेतल्या माणसांच्या आणि त्यांच्या गाड्यांच्या सान्निध्यात त्याला मिळते एक काळी बॅग्, ज्यात २० लाख डॉलर्स आहेत. त्याच ठिकाणी त्याला या घटनेतला शेवटचा बळी आचके देताना दिसतो. अर्थातच , मॉस ती बॅग उचलतो , जखमी माणासाची पर्वा न करता तडक घरी येतो.

कथानकाच्या दुसर्‍या धाग्यात अन्त्वान् चिरग् या नावाच्या , एका थंड रक्ताच्या हिंस्त्र खुनी मारेकर्‍याची ओळख प्रेक्षकाना दोन प्रसंगातून करून दिली जाते. हा सैतान एका पोलीस अधिकार्‍याचा आणि वाटेतल्या एका निरपराध वाहनचालकाचा निर्घृण खून करतो.

इकडे मॉसभाऊ आपल्या घरी २० लाखांच्या शेजेवर झोपलेले असताना अचानक त्याना पापक्षालनाचा झटका येतो. आचके देत असलेल्या जखमी माणसाकरता पाणी घेऊन महाशय घटनास्थळी पोचतात. रात्रीच्या अंधारात त्याला दिसते की तो शेवटचा माणूस मेलाय्. आणि नेमके तेव्हाच घटनास्थळी गॅंगचे इतर सभासद २० लाख डॉलर्सचा छडा लावायला आलेले असतात. अन्त्वान् चिरगवर २०लाख डॉलर्सचा छडा लावायची कामगिरी गॅंगकडून दिली गेलेली असते. मॉसवर हल्ला होतो, त्याचा पाठलाग केला जातो. यातून तो सुटतो आणि पळायला लागतो. चिरग् त्याच्या मागेमागे. साक्षात् मृत्युरूपी असे चिरग साहेब आपल्या मालकांवरही प्राणाघातक हल्ला करून त्याना यमसदनास धाडतात. मॉस आणि चिरग् यांचा पाठलागाचा एक प्रमुख धागा.

या चित्रपटातला तिसरा आणि आणखी एक महत्त्वाचा धागा म्हणजे पोलिसांचा म्होरक्या, शेरीफ एड् टॉम् बेल्. फौजदार वास काढत काढत या पाठलागाचा मागोवा घेत रहातो ; आणि एकूण अमली पदार्थातील भीषण हिंसेने, विशेषतः चिरगने केलेल्या कत्तलीने दिड्.मूढ होत रहातो. पण पाठलाग करतच रहातो.
वाटेतल्या प्रत्येकाला मारत मारत चिरग् शेवटी एका अपघातामधे जखमी होतो. पण पोलिसाना न सापडता सहीसलामत सुटतो. मॉस गॅंगच्या इतर सभासदाकडून मारला जातो. शेरीफ आपल्या कर्तुम्-अकर्तुमच्या मानसिक तिढ्यामधे शेवटी निवृत्त होतो. चित्रपट संपतो.

कथानक भाग संपूर्ण

काही ठळक बाबी :
हा एका अर्थाने "पीरीयड् मूव्ही" - एका ऐतिहासिक कालखंडामधे घडाणारा चित्रपट आहे. फक्त हा कालखंड केवळ २५ वर्षे जुना आहे. (कलादिग्दर्शकाने ही एक थोडी बाब काहीशी आव्हानत्मक आहे असे म्हण्टले आहे. ऐतिहसिक चित्रपट बनवण्याची तंत्रे , आडाखे ठरलेले असतात. केवळ २५ वर्षे जुना कालखंड चितारताना म्हण्टले तर "सेट्स्" आणि कृत्रिम "प्रॉप्स्" चा वापर करायला नको ; पण हवासुद्धा ! ८०च्या काळाच्या गाड्या, वेषभूषा या सगळ्या गोष्टी अर्थातच अत्यंत विश्वसनीय रीत्या चितारल्या गेल्यात.)

कथानकाच्या एकंदर सारांशावरून हा एक निव्वळ ठराविक अंगाने जाणारा पाठलागाचा आणि हिंसेचा पट आहे असे कुणालाही वाटेल. आणि या चित्रपटाचे हे दोन प्रमुख घटक आहेतही. पण या व्यतिरिक्त चित्रपट नियती, जगण्या-मरण्याचे स्वातंत्र्य , योगायोग , भागधेय, मनुष्यस्वभाव, नीतीमूल्ये , कर्तुमकर्तुम् यांच्यातला संदेह या गोष्टीना स्पर्श करतो.

चिरगचे पात्र दहशत वाटावे असे झाले आहेच. पण त्याच्याबद्दल निव्वळ घृणा वाटावी अशा एकजिनसी काळ्या रंगात तो रंगविला गेलेला नाही. एका अर्थाने त्याला मृत्यूचे प्रतीक या अर्थाने पहाता येईल. मृत्यूइतक्याच अटळपणे तो आपल्या रस्त्यात येणार्‍याना टिपतो. क्वचित् कधीतरी तो आपल्या सावजाला नाणेफेक करून जगण्या-मरण्याची संधी देतो.

एकूणच , दिग्दर्शकाचा सगळा हेतू मुळी एक निर्णायक असा शेवट चितारण्याकडे नाहीच, हे अगदी स्पष्ट आहे. असल्या टोकाच्या परिस्थितीमधे माणासातल्या आदिम प्रवृत्ती कशा कार्यरत होतात हे त्याना दाखवायचे होते. स्थलकालाचे चित्रण, घटना आणि पात्रे यांच्या अत्यंत घट्ट अशा वीणीतून दिग्दर्शकद्वय नीतीमूल्यांची रिलेटिव्हीटी (मराठी शब्द) , मनुष्यस्वभाव आणि नियती यांच्यातील नाट्य चितारतात.