Sunday, April 19, 2009

"लक बाय चान्स"

हा चित्रपट येऊन काही महिने उलटले तरी पहाण्याचा योग कालपर्यंत आला नव्हता. अनेक चित्रपट पाहिले जातात पण थोडेसेच लिहिण्यासारखे असतात. "लक बाय चान्स" हा त्यापैकी एक.

डिस्क्लेमर : पुढील काही परिच्छेदांत , चित्रपटाच्या कथानकादि घटकांबद्द्ल माहिती आहे. ज्यांना त्याबद्दल वाचायचे टाळायचे असेल त्यांनी वाचू नये.

हा चित्रपट एका होतकरू , चित्रपट-नायक बनू पहाणार्‍या तरुणाच्या - "स्ट्रगल"च्या दिवसांची कहाणी रेखाटतो. एका बिनचेहर्‍याच्या , बिननावाच्या अस्तित्त्वापासून पदार्पणाच्या यशापर्यंत त्याचा प्रवास कसा घडतो आणि या प्रवासादरम्यान त्याचे त्याच्या आजूबाजूच्या लोकांशी नाते कसे घडते ? हे झाले स्थूलमानाने कथानक. या सगळ्या नात्यांमधे त्याचे सगळ्यात महत्त्वाचे नाते (अर्थातच) त्याचे प्रेमपात्र असलेल्या , जवळजवळ त्याच्याइतक्याच नवी असलेल्या मुलीबरोबरचे. चित्रपटात असे वळण येते की चित्रपट या नायकाचा म्हणून सुरू तर होतो ; पण त्याच्या या प्रेयसीचा बघता बघता होऊन जातो .... मला वाटते , कथानक याच्यापेक्षा सांगणे अयोग्य होईल.

कथानक पूर्ण

चित्रपटाची संकल्पना आणि दिग्दर्शन आहे झोया अख्तरचे. झोया म्हणजे जावेदसाबांची मुलगी आणि फरहानची बहीण. सिनेमाचा नायक आहे फरहान आणि नायिका आहे कोंकोणा सेन.
झोयाबाईना हा चित्रपट सुचला सुमारे ७ वर्षांपूर्वी. या संकल्पनेला प्रत्यक्षात यायला इतकी वर्षे गेली. दरम्यानच्या काळात नायक-नायिका बदलत गेल्या. शेवटी फरहान-कोंकोणा यांनी हा चित्रपट केला.

तर अशा या चित्रपटाबद्दल मुद्दामहून लिहावे असे काय ? तर अर्थातच , चित्रपटाची , कथानकाची हाताळणी.

सर्वप्रथम सांगायचे तर हा चित्रपट पहाणे हा अतिशय आनंददायक अनुभव बनला , याचे कारण , चित्रपटाच्या टायटल्स पासून शेवटच्या प्रसंगा-फ्रेम पर्यंत जपलेली अर्थपूर्णता. (सटल्टी ला योग्य मराठी शब्द काय ?) हिंदी चित्रपट बर्‍याचदा गाळून गाळून पहावा लागतो. अर्थहीन तण कापत कापत. इथे म्हणजे प्रत्येक प्रसंग आस्वाद घ्यावा असा.

या चित्रपटाचा एक अतिशय महत्त्वाचा पैलू म्हणजे हिंदी चित्रपटसृष्टीबद्दल केलेली ही एक टिप्पणी आहे. आणि ही टिप्पणी आहे अर्थातच , नर्मविनोदी. इथल्या माणसांमधल्या , त्यांच्या व्यवहारांमधल्या विसंगती, स्पर्धा, स्वार्थ , असूया , खोटेपणा , यशापयश, नातेसंबंध, त्या संबंधांमधला तात्पुरतेपणा इ. इ. बद्दलची टिप्पणी. आणि यात कुठेही , भडक, बटबटीतपणाचा स्पर्श नाही. म्हणजे , प्रसंगी माणसे बटबटीत वागतात, ढोंगीपणा दाखवतात ; पण त्याचे चित्रण मात्र अगदी अलगदपणे केलेले आहे. किंवा एरवी ढोंगी , बटबटीत वागणार्‍या कुणाचे ठसठसते दु:ख कधीकधी व्यक्त होते. या चित्रपटाचा मला सगळ्यात आवडलेला पैलू म्हणजे , ही नजाकत. अशा छोट्या छोट्या क्षणांना शब्दबंबाळपणा किंवा आचरटपणा यांचा शाप नाही.

चित्रपटात उपरोक्त सर्वात महत्त्वाच्या दोन पात्रांशिवाय अक्षरशः डझनावारी पात्रे आहेत. ऋषि कपूर, डिंपल , जुही चावला , संजय कपूर , हृतिक रोशन आणि नवतारका इशा श्रावणी यांच्या भूमिका या दोघांच्या खालोखाल महत्त्वाच्या. यांच्या व्यतिरिक्त शाहरुखखान पासून आमीर खान पर्यंत आणि करीनाकपूर पासून बोमन इराणी पर्यंत अनेकानेक लोकांची एकेका प्रसंगापुरती हजेरी आहे. या सार्‍यांना "ओम शांति ओम" सारखे , एकाच लांबच लांब गाण्यात गुंफण्यापुरते आणलेले नाही , तर या सर्वांच्या प्रसंगांना चित्रपटाच्या "थीम" च्या संदर्भात अर्थपूर्ण स्थान आहे. या मोठ्या मोठ्या स्टार्स च्या "कॅमीओज" इतकेच महत्त्वाचे आहेत अनेक इतर , अनोळखी सहकलाकारांचे छोटे छोटे प्रसंग. मग ती एखादी नायिकेची मैत्रीण असो , नायकाचे मित्र असोत , कुणाचे पी ए असोत , एखादी नृत्यदिग्दर्शिका असो ... कोणाच्याही छोट्याशा संवादामधे आनंद घेण्यासारखे , काहीतरी नर्मविनोदी किंवा अर्थपूर्ण असे काहीतरी आहेच. सगळ्यांना आपल्या मिळालेल्या तुकड्याचे चीज करायला मिळाले आहे. संजय कपूर , ऋषि कपूर यांना माझ्या मनात फार मोठे अभिनेते म्हणून स्थान नव्हते. मात्र या चित्रपटात त्यांना मिळालेल्या महत्त्वाच्या भूमिकेत ते फिट्ट बसतात , त्यांना मिळालेले प्रसंग खरोखरच एंजॉय करण्यासारखे.

अर्थात , उपरोल्लेखित वास्तववादी चित्रण , किंवा अर्थपूर्ण हाताळणी हाच काही या चित्रपटाचा एकमेव मानबिंदू नव्हे. किंबहुना , त्याच्याइतकेच महत्त्वाचे आहेत काही असे चर्चिलेले मुद्दे जे कथानकाच्या ओघाने येत रहातात. हे मुद्दे जुने आहेत - जसे , "तकदीर की तदबीर ?" म्हणजेच , "नशीब की कर्तृत्व ?" किंवा " फेट् की चॉइस?" . मात्र चित्रपटात चितारलेल्या एकूण अनिश्चिततेच्या , उमेदवारीच्या , जीवघेण्या स्पर्धेच्या चित्रणात , एकूण कथानकात हे प्रश्न अलगदपणे गोवले जातात . म्हणूनच अर्थपूर्ण वाटतात.

जवळजवळ सगळा चित्रपट नायकाच्या पर्स्पेक्टीव्हने मांडला जातो. मात्र शेवटच्या प्रसंगात नायिकेचा नि नायकाचा जो संवाद होतो तो प्रसंग सोन्याचा. त्या एका प्रसंगाने नायिकेच्या पात्राला एका निराळ्य प्रतलावर नेऊन ठेवतो - आणि चित्रपटाच्या एकंदर परिणामालाही.

कोंकोणा सेन आणि फरहान अख्तर दोघांचीही कामे उत्तम यात वेगळे सांगायला नको. मात्र शेवटी काहीही झाले तरी हा चित्रपट झोया अख्तरचा आहे. चित्रपटाच्या संकल्पनेपासून एकेका फ्रेमवर तिचे गोंदण उमटलेले आहे. आणि एकेक पैलू निरखून पारखून घेतलेला.

इतके सगळे गुणगान गाइल्यावर अर्थातच काही न आवडलेले रहातेच. काही बाबींवर अगदी काहीच इलाज नाही. उदा. फरहान अख्तरचा आवाज. या नटाचा पडद्यावरचा वावर एकदम जबर. पण तो बोलायला लागतो आणि अर्रर्रर्रर्र.... आपण हुकतो एकदम. एखाद दोन गाणी टाळली असती तर बरे झाले असते. त्या गाण्यांच्या चालींमधेही फार काही लक्षात ठेवण्यासारखे नाही. आणि माझे चुकत नसेल तर कोंकोणाताई अंमळ "खात्या-पित्या घरच्या" दिसतात. ( यात काही चूक आहे असे नाही ; पण मला व्यक्तिशः थोडे खटकले खरे. )

असो. हा चित्रपट मला आवडला. तुम्हाला आवडेल याची शाश्वती नाही. पण कुणी पाहिला असल्यास त्यांच्या मताशी ताडून पहायला नक्की आवडेल.